निकाल
दिनांक- 02.07.2014
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार गंगाबाई लहुदास गिते यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवली आहे म्हणून क्लेम व नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे, तक्रारदार हया मौजे मलकापूर ता.परळी (वै) जिल्हा बीड येथील रहिवाशी आहे. तक्रारदार हया शेती व्यवसाय करुन आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. तक्रारदार यांचे पती लहूदास नागोराव गिते हे व्यवसायाने शेतकरी होते. तक्रारदार यांचे पती रल्वे अपघातात दि.30.06.2012 रोजी मयत झाले. रेल्वे अपघाताची खबर पोलीसांना देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळावर जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. तक्रारदार यांचे पतीचे प्रेतावर शवविच्छेदन करण्यात आले व प्रेत तक्रारदार यांचे ताब्यात देण्यात आले. तक्रारदार यांचे पतीच्या नावे मौजे परळी वै.येथे गट नं.338 मध्ये शेतजमीन नोंदलेली आहे.
महाराष्ट्र शासनाने कल्याणकारी योजनेअंतर्गत शेतक-यांसाठी शेतकरी जनता अपघात विमा योजना सुरु केलेली आहे. महाराष्ट्र शासनाने विम्याची रक्कम सामनेवाला क्र.2 इन्शुरन्स कंपनीकडे अदा केलेली आहे. शेतक-यांचा अपघाती मृत्यू झाल्यास सदरील योजनेअंतर्गत क्लेम तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांचे मार्फत ब्रोकर्स इन्शुरन्स कंपनीकडे पाठविला जातो, तो क्लेम तदनंतर विमा कंपनीकडे मंजूरीसाठी पाठविला जातो. तक्रारदार यांनी त्यांचे पती मयत झाल्यानंतर शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत क्लेम मिळण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांचे मार्फत क्लेम दाखल केला. क्लेम सोबत आवश्यक त्या सर्व कागदपत्राची पुर्तता केली. पॉलीसी कालावधीत तक्रारदार यांचे पतीचा मृत्यू झाला आहे. इन्शुरन्स कंपनीला दावा प्राप्त झाल्यानंतर एक महिन्याच्या आत त्यावर निर्णय घेणे गरजेचे आहे. सामनेवाला क्र.2 इन्शुरन्स कंपनीने तक्रारदार यांचा दावा पॉलीसीच्या शर्ती व अटीचा भंग झाला या कारणास्तव नामंजूर केला आहे. तक्रारदार यांचा क्लेम इन्शुरन्स कंपनीने अनधिकृतपणे नाकारलेला आहे. तक्रारदार यांचे पती रेल्वे अपघातात मयत झालेले आहे. तक्रारदार हे शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास पात्र आहे. सबब तक्रारदार यांनी अशी विनंती केली आहे की, सामनेवाला क्र.2 इन्शुरन्स कंपनी यांनी शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत क्लेम देण्याचे निर्देश देण्यात यावे तसेच तक्रारदार यांना सदरील तक्रार दाखल करावी लागली त्याचा खर्च देण्यात यावा, व तक्रारदार यांना झालेला मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई देण्यात यावी.
सामनेवाला क्र.1 डेक्कन इन्शुरन्स व ब्रोकर्स लिमिटेड हे या मंचासमोर हजर झाले व त्यांनी निशाणी 10 अन्वये आपले लेखी म्हणणे सादर केले. सामनेवाला क्र.1 यांचे कथन की, ते ब्रोकर्स म्हणून सेवा देण्याचे काम करतात, सामनेवाला क्र.1 हे विमा कंपनी यांचे मध्यस्थ म्हणून काम करतात, सामनेवाला क्र.1 हे सेवा म्हणून कोणताही मोबदला घेत नाही, सामनेवाला क्र.1 यांचेकडे क्लेम प्राप्त झाल्यानंतर काही अपुर्तता असल्यास त्याची पुर्तता करुन ते क्लेम इन्शुरन्स कंपनीकडे मंजूरीसाठी पाठविण्याचे सेवा प्रदान करतात. सामनेवाला क्र.1 यांनी सेवेत त्रुटी ठेवलेली नाही. सबब सामनेवाला क्र.1 विरुध्द क्लेम नामंजूर करण्यात यावा.
सामनेवाला क्र.2 हे या मंचासमोर हजर झाले व त्यांनी निशाणी 16 अन्वये आपले लेखी म्हणणे सादर केले. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांचे तक्रारीत नमुद केलेल्या बाबी स्पष्टपणे नाकारलेल्या आहेत. सामनेवाला क्र.2यांचे कथन की, अपघाताचे स्वरुप पाहता मयत लहूदास यांच्या चुकीमूळे अपघात झालेला आहे. मयत लहूदास याने कायदा व नियम याचा भंग केलेला आहे. सदरील अपघात हा त्याने स्वतःवर ओढवून घेतलेला आहे. त्यामुळे पॉलीसीच्या शर्ती व अटींचा भंग झाला आहे. सामनेवाला यांनी रास्त कारणासाठी तक्रारदार यांचा क्लेम नाकारलेला आहे. क्लेम नाकारुन सामनेवाला क्र.2 यांनी सेवेत त्रुटी ठेवलेली नाही. सबब तक्रारदार यांची तक्रार रदद करण्यात यावी.
सामनेवाला क्र.3 यांना मंचाची नोटीस प्राप्त झाली ते मंचासमोर हजर झाले नाही अगर लेखी म्हणणे सादर केले नाही.
तक्रारदार यांचे वकील श्री.पावसे यांचा युक्तीवाद ऐकला. सामनेवाला क्र.2 यांचे वकील श्री.साळवे यांचा युक्तीवाद ऐकला. तक्रारदार यांनी दाखल केलेले दस्त, शपथपत्र व सामनेवाला यांनी दाखल केलेले शपथपत्र यांचे अवलोकन केले. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1) सामनेवाला क्र.2 इन्शुरन्स कंपनी यांनी
तक्रारदार यांचा क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवली आहे,
ही बाब तक्रारदार यांनी शाबीत केली आहे काय ? होय.
2) तक्रारदार हे शेतकरी जनता अपघात विमा
योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास पात्र आहे काय? होय.
3) आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 ते 3 ः- तक्रारदार यांचे वकील श्री.पावसे यांनी या मंचाचे लक्ष तक्रारीसोबत निशाणी 4 अन्वये दाखल केलेल्या दस्तावर वेधले व असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांचे पतीचा मृत्यू हा रेल्वे अपघातात झाला आहे. तसेच तक्रारदार यांचे पतीचे नावे शेतजमीन नोंदलेली आहे, ते व्यवसायाने शेतकरी होते. तक्रारदार हया मयत यांच्या पत्नी आहे. शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत क्लेम मिळण्यास ते पात्र आहे. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांचा क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवलेली आहे. सबब तक्रारदार यांची तक्रार मंजूर करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
सामनेवाला क्र.2 यांचे वकील श्री.साळवे यांनी असा युकतीवाद केला की, अपघाताचे स्वरुप पाहता सदरील अपघात हा तक्रारदार यांचे पतीच्या चुकीमूळे झाला आहे असे निदर्शनास येते. तसेच तक्रारदार यांचे पतीने आत्महत्या केली असावी असेही निदर्शनास येते. त्यामुळे विमा पॉलीसीच्या शर्ती व अटींचा भंग झाला आहे. सामनेवाला यांनी कायदेतज्ञाचे मत मागविले, त्यानुसार मयत हा रेल्वे ट्रॅकवर चालत होता. मयताने कायदा व नियम मोडले आहे व त्याच्या चुकीमूळे अपघात झाला आहे असे नमूद केले आहे. म्हणून सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांचा क्लेम नाकारला आहे.
वर नमुद केलेला युक्तीवाद लक्षात घेतला व तक्रारदार यांनी दाखल केलेले दस्त लक्षात घेतले असता या मंचाचे असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांचे पतीचा मृत्यू रेल्वे अपघातात झाला. पोलीस पेपरचे अवलोकन केले असता तक्रारदार यांचे पतीने रेल्वेखाली आत्महत्या केली असे निदर्शनास येत नाही. तक्रारदार यांचे पती रेल्वे रुळाच्या बाजूने जात होते त्यांना रेल्वेचा धक्का बसला व ते मयत झाले. सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे पतीच्या चुकीमूळे अपघात झाला आहे असा युक्तीवाद मांडला, त्या युक्तीवादाचे समर्थनार्थ कोणताही दस्त या मंचासमोर हजर केला नाही अगर पुरावा सादर केला नाही. सामनेवाला यांनी कायदेतज्ञांचे जे मत घेतले आहे ते मत देतांना पंचनामा व मयताचे रिपोर्ट या बाबी लक्षात घेतलेल्या आहेत. पंचनामा हा घटना घडल्यानंतर तयार करण्यात आला आहे. तक्रारदार यांचे पती रेल्वे ट्रॅक वरुन प्रवास करत होते हे सांगण्यासाठी कोणत्याही व्यक्तीचे पोलीसांनी जबाब घेतल्याचे दिसून येत नाही. तसेच रेल्वे ड्रायव्हर व रेल्वे स्टेशनवर काम करणारे कर्मचारी यांचे जबाब घेतलेले दिसत नाही. कोणत्या पुराव्याचे आधारे तक्रारदार यांचे पती रेल्वे लाईनवरुन प्रवास करत होते असा निष्कर्ष काढला, याबाबत बोध होत नाही. संपूर्ण परिस्थितीजन्य पुराव्याचा विचार केला असता व अपघात ज्या ठिकाणी घडला त्याचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांचे पतीचा मृत्यू रेल्वे अपघातात झालेला आहे. तक्रारदार यांचे पती व्यवसायाने शेतकरी होते. सामनेवाला यांच्याकडे विहीत नमुन्यात अर्ज व दस्तऐवज पाठविण्यात आले होते. सामनेवाला क्र.2 यांनी कोणत्याही संयुक्तिक कारणाशिवाय क्लेम नाकारलेला आहे. सबब या मंचाचे मते तक्रारदार हया शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास पात्र आहे. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांचा क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवलेली आहे. म्हणून मुददा क्र.1 ते 3 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2) सामनेवाला क्र.2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदार यांना शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) निकाल कळाल्यापासून 30 दिवसाचे आत दयावेत, सदर रक्कम विहीत मुदतीत न दिल्यास त्यावर तक्रार दाखल तारखेपासून संपूर्ण रक्कम वसूल होईपर्यत द.सा.द.शे.9 टक्के व्याज द्यावे.
3) सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांना झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.3,000/- (अक्षरी रुपये
तीन हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1500/- (अक्षरी
रुपये एक हजार पाचशे) दयावेत.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील
कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला
परत करावेत.
श्री.रविंद्र राठोडकर, श्री.विनायक लोंढे,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड