निकाल
दिनांक- 11.02.2014
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार संगिता भाऊसाहेब जाधव यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला क्र.2 यांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवली आहे, म्हणून नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे, तक्रारदार हया मौजे बोरोडी ता.आष्टी जि.बीड येथील रहिवाशी आहेत. तक्रारदार यांचे पती भाऊसाहेब बबन जाधव हे दि.01.02.2012 रोजी मोटार अपघातात मयत झाले. तक्रारदार यांचे पती हे व्यवसायाने शेतकरी होते त्यांचे नावे मौजे बोरोडी येथे गट नं.86/1 मध्ये शेती नोंदलेली होती. तक्रारदार यांचे पतीचे अपघात झाल्याने अपघाताबाबत माहिती आष्टी पोलीसस्टेशनला देण्यात आली. पोलीसांनी गुन्हयाची नोंद केली, घटनास्थळाचा पंचनामा केला. तक्रारदार यांचे पतीचे प्रेतावर इन्क्वेस्ट पंचनामा करण्यात आला व शवविच्छेदन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व शेतक-याकरता शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना लागू केलेली आहे. त्या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने शेतक-यांचा विमा काढलेला आहे. अपघातात शेतकरी मयत झाल्यास त्याचे वारसांना सामनेवाला क्र.2 इन्शुरन्स कंपनी यांचेकडून रक्कम रु.1,00,000/- मिळणे क्रमप्राप्त होते. तक्रारदार यांनी त्यांचे पती मयत झाल्यानंतर सर्व कागदपत्र सामनेवाला क्र.3 यांच्याकडे सुपूर्द केली. सामनेवाला क्र.3 यांनी सदरील कागदपत्र सामनेवाला क्र.1 यांच्याकडे पाठविले. सामनेवाला क्र.1 यांनी सदरील कागदपत्र सामनेवाला क्र.3 यांच्याकडे मंजूरीसाठी पाठविले. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांचा क्लेम मंजूर केलेला नाही. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांचा क्लेम नामंजूर करुन सेवेत त्रुटी ठेवलेली आहे.सबब तक्रारदार यांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत सामनेवाला क्र.2 यांना रक्कम रु.1,00,000/- देण्याचा आदेश व्हावा व तक्रारदार यांना झालेल्या शारिरिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/- मिळावा अशी विनंती केली आहे.
सामनेवाला क्र.1 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी निशाणी 12 अन्वये आपले लेखी म्हणणे सादर केले. सामनेवाला क्र.1 यांचे कथन की, ते मध्यस्थ म्हणून काम करतात. सामनेवाला क्र.3 यांच्याकडून आलेला प्रस्ताव ते विमा कंपनीकडे पाठवितात. त्यासाठी ते कोणत्याही प्रकारची फी अथवा मोबदला घेत नाही. सामनेवाला क्र.1 हे शासन आदेश आणि त्रिपक्षीय करार यांच्यात नमुद केलेल्या बाबी विषयी ते कार्य करतात, ते कोणतीही सेवा तक्रारदार यांना पुरवित नाही.
सामनेवाला क्र.2 हयांना नोटीस प्राप्त झाली परंतू ते मंचासमोर हजर झाले नाही. म्हणून सामनेवाला क्र.2 यांच्या विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला.
सामनेवाला क्र.3 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी निशाणी 10 अन्वये आपले लेखी म्हणणे सादर केले. सामनेवाला क्र.3 यांचे कथन की, तक्रारदार यांनी त्यांचे पतीचे वाहन अपघातात निधन झाल्याने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कम रु.1,00,000/- मिळणे बाबतचा अर्ज तालुका कृषी अधिकारी आष्टी यांचे मार्फत दि.07.08.2012 रोजी विमा सल्लागार कंपनी यांच्याकडे पाठविला. सामनेवाला क्र.3 यांच्याकडे कोणताही प्रस्ताव प्रलंबित नाही. सामनेवाला क्र.3 यांनी सेवेत त्रुटी ठेवलेली नाही.
तक्रारदार यांनी स्वतःचे शपथपत्र निशाणी 14 अन्वये दाखल केले आहे. तक्रारदार यांनी निशाणी 4 सोबत शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत क्लेम फॉर्म, तलाठयाचे प्रमाणपत्र, 7/12चा उतारा, मृत्यूचे प्रमाणपत्र, हक्काचे नोंद वहीचे फेरफार पत्रक, गुन्हयाची पहिली खबर, घटनास्थळ पंचनामा, शवविच्छेदन अहवाल दाखल केलेला आहे. तक्रारदार यांचे वकील श्री.पावसे यांचा युक्तीवाद ऐकला. सामनेवाला क्र.1 व 3 युक्तीवादाचे वेळेस गैरहजर आहेत. तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्राचे अवलोकन केले. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर 1) सामनेवाला क्र.2 यांनी शेतकरी व्यक्तीगत
अपघात विमा योजनेअंतर्गत तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे, ही बाब
तक्रारदार यांनी शाबीत केली आहे काय? होय.
2) तक्रारदार हया शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा
योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे. होय.
3) आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुददा क्र.1 ते 3 ः- तक्रारदार यांचे वकील श्री.पावसे यांनी या मंचाचे लक्ष तक्रारीसोबत दाखल केलेल्या दस्तऐवजावर वेधले व असा युक्तीवाद केला की, सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा क्लेम नामंजूर केला आहे. क्लेम नामंजूर करताना सामनेवाला क्र.2 यांनी असे कळविले की, अपघात घडण्याचेवेळेस मयत भाऊसाहेब जाधव हे मद्यधुंद अवस्थेत होते व त्यामुळे अपघात झाला. तक्रारदार यांचे वकीलांनी असा युक्तीवाद केला की, कोणत्याही दस्तामध्ये भाऊसाहेब जाधव हे दारु प्यायलेले होते असे लिहीलेले नाही. तसेच सामनेवाला क्र.2 यांनी या मंचासमोर कोणताही दस्त हजर केलेला नाही. सबब सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांचा क्लेम कोणत्याही संयुक्तिक कारणाशिवाय नाकारलेला आहे.
तक्रारदार यांनी दाखल केलेल्या दस्तऐवजाचे अवलोकन केले. तक्रारदार यांचे पती भाऊसाहेब जाधव हे दि.01.02.2012 रोजी मोटार अपघातात मयत झाले. पोलीसांसमोर दिलेल्या प्रथम खबर चा विचार केला असता तक्रारदार यांचे पती मोटार सायकल चालवित होते, त्यांच्यासोबत गावातील इतर व्यक्ती ही दुस-या मोटार सायकलवर जात होते. रात्री 11.10 मिनिटाचे सुमारास तक्रारदार यांचे पतीच्या मोटार सायकलला कुत्र्याची धडक बसली. त्यामुळे त्यांचा तोल जाऊन ते खाली पडले, त्यात त्यांना गंभीर जखमा झाल्या व उपचारादरम्यान ते मयत झाले. तक्रारदार यांचे पतीचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालाचे अवलोकन केले असता तक्रारदार यांच्या पतीच्या पोटामध्ये कोणत्याही प्रकारची दारु सदृश वास येणारा द्रव आढळून आला नाही. जर तक्रारदार यांचे पती दारु प्यायले असते तर, शवविच्छेदनामध्ये डॉक्टरांनी तशी नोंद घेतली असती. सामनेवाला क्र.2 यांनी क्लेम नाकारताना असे म्हटले आहे की, त्यांचे पॅनल डॉक्टरांनी मेडिकल पेपरचे अवलोकन केले, त्यांना असे आढळून आले की, भाऊसाहेब जाधव हे दारु प्यायलेले होते. सदरील बाब सिध्द करण्यासाठी सामनेवाला क्र.2 हे या मंचासमोर हजर झाले नाही अगर त्यांनी त्यांच्या डॉक्टरचा अभिप्राय ही या मंचासमोर हजर केला नाही. या मंचासमोर आलेल्या कागदपत्रावरुन तक्रारदार यांचे पती भाऊसाहेब हे दारु पिऊन गाडी चालवित होते ही बाब सिध्द झालेली नाही. तक्रारदार यांचे पती हे व्यवसायाने शेतकरी होते. शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कम रु.1,00,000/- मिळण्यास ते पात्र आहे. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांचा क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवलेली आहे. सबब तक्रारदार हे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कम रु.1,00,000/- सामनेवाला क्र.2 यांचेकडून मिळण्यास पात्र आहे. तसेच तक्रारदार यांना झालेल्या शारिरिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1500/- मिळण्यास पात्र आहे. सबब मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2) सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारास शेतकरी व्यक्तीगत अपघात
विमा योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम रु.1,00,000/-(अक्षरी रु. एक
लाख) निकाल कळाल्यापासून 30 दिवसाचे आत द्यावी. सदर रक्कम
विहीत मुदतीत न दिल्यास संपूर्ण रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून
वसूल होईपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज द्यावे.
3) सामनेवाला क्र.2 यांनी, तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरिक
त्रासापोटी रक्कम रु.3,000/- व तक्रारीचा खर्च रु.1500/-द्यावे.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य अध्यक्ष