निकाल
दिनांक- 26.06.2014
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार देवराव रंगराव उबाळे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवली आहे म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे, तक्रारदार हे मौजे च-हाटा जिल्हा बीड येथे राहतात. तक्रारदार हे वयोवृध्द असून शेती व्यवसाय करुन आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. तक्रारदार यांची पत्नी तारामती यांचा मृत्यू दि.04.03.2012 रोजी जळाल्यामुळे झाला. सदरील घटना घडल्यानंतर तक्रारदारांनी बीड ग्रामीण पोलीस स्टेशनला खबर दिली पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व प्रेत शवविच्छेदनासाठी पाठविले. मयत तारामती यांच्या नावे गट नं.28 मौजे च-हाटा या गावी नोंदलेली आहे. मयत तारामती हया व्यवसायाने शेतकरी होत्या. महाराष्ट्र शासनाने शेतकरी कल्याण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व शेतक-यांसाठी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना सुरु केलेली आहे, त्या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने प्रत्येक शेतक-यांचा विमा काढलेला आहे. शेतक-यांचा अपघाती मृत्यू झाल्यास शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांचे मार्फत मागणी अर्ज व दस्त देऊन पुढील कार्यवाही करावयाची असते. कृषी अधिकारी हे ब्रोकर्स यांच्याकडे प्रस्ताव पाठवून नंतर तो प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठविते.
तक्रारदार यांनी त्यांची पत्नी मयत झाल्यानंतर सामनेवाला यांच्याकडे रितसर अर्ज सर्व कागदपत्रासह दाखल केला. सामनेवाला क्र.3 यांनी सदरील अर्ज सामनेवाला क्र.1 मार्फत सामनेवाला क्र.2 यांच्याकउे पाठविला, सदरील अर्ज सामनेवाला यांना प्राप्त होऊनही त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. सबब तक्रारदार यांना सदरील तक्रार दाखल करावी लागली. तक्रारदार यांनी अशी मागणी केली आहे की, सामनेवाला क्र.2 इन्शुरन्स कंपनीने सेवा देण्यास त्रुटी ठेवली म्हणून विमा क्लेम रक्कम रु.1,00,000/- व त्यावरील व्याज देण्याचे आदेश व्हावे. तक्रारदार यांना झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई देण्यात यावी.
सामनेवाला क्र.1 हे या मंचासमोर हजर झाले व त्यांनी निशाणी 9 अन्वये आपले लेखी म्हणणे सादर केले. सामनेवाला क्र.1 यांचे कथन की, महाराष्ट्र शासनाने त्यांची ब्रोकर्स म्हणून नियुक्त केले आहे व ते सेवा देण्याचे काम करतात. सामनेवाला क्र.1 हे सेवा प्रदान करण्यासाठी कोणतेही वेतन स्विकारत नाही. सामनेवाला क्र.1 यांना प्राप्त झालेला क्लेम ते इन्शुरन्स कंपनीकडे पाठवतात. इन्शुरन्स कंपनीने दावा स्विकारला किंवा नामंजूर केला याबाबत सामनेवाला क्र.1 यांना जबाबदार धरता येणार नाही. सबब तक्रारदार यांची तक्रार सामनेवाला क्र.1 विरुध्द रदद करण्यात यावी.
सामनेवाला क्र.2 हे या मंचासमोर हजर झाले व त्यांनी निशाणी 14 अन्वये आपले लेखी म्हणणे सादर केले. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांनी तक्रारीत केलेले कथन स्पष्टपणे नाकारलेले आहे. सामनेवाला क्र.2 यांचे कथन की, तक्रारदार यांची पत्नी अपघातामुळे मयत झालेली नाही. तक्रारदार यांच्या पत्नीने आत्महत्या केलेली आहे. त्यामुळे सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांचा क्लेम नामंजूर केलेला आहे. सामनेवाला क्र.2 यांनी सेवेत त्रुटी ठेवलेली नाही. सबब तक्रारदाराची तक्रार रदद करण्यात यावी.
सामनेवाला क्र.3 हे या मंचासमोर हजर झाले व त्यांनी निशाणी 8 अन्वये आपले लेखी म्हणणे सादर केले. सामनेवाला क्र.3 यांचे कथन की, शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत प्रस्ताव दि.15.09.2012 रोजी प्राप्त णाला होता सदरील प्रस्ताव डेक्कन इन्शुरन्स कंपनी यांच्याकडे दि.26.09.2012 रोजी सादर केला. तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत त्यांनी कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही. सबब तक्रारदार यांची तक्रार रदद करण्यात यावी.
तक्रारदार यांनी तक्रारीसोबत निशाणी 4 अन्वये दस्त हजर केले आहे. त्यामध्ये क्लेम फॉर्म, प्रतिज्ञापत्र, वारसाचे प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, बँक पासबूक, 8अ व 7/12 चा उतारा, फेरफार नोंद, गाव नमुना 6 क, दवाखान्याचे पत्र, पोस्टमार्टम रिपोर्ट, तक्रारदार यांनी स्वतःचे शपथपत्र दाखल केले. सामनेवाला क्र.2 यांनी सक्षम अधिकारी यांचे शपथपत्र दाखल केले. तक्रारदार यांचे वकील श्री.पावसे आणि सामनेवाला क्र.2 इन्शुरन्स कंपनी यांचे वकील श्री.साळवे यांचा युक्तीवाद ऐकला. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1) मयत तारामती हया अपघातात मृत्यू पावल्या,
ही बाब तक्रारदार यांनी शाबीत केली आहे काय ? नाही.
2) सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या
सेवेत त्रुटी ठेवली आहे, ही बाब तक्रारदार यांनी
शाबीत केली आहे काय? नाही.
3) आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 ते 3 ः- तक्रारदार यांचे वकील श्री.पावसे यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांची पत्नी तारामती हया घरात झोपलेल्या असताना घरास आग लागली त्यामुळे त्या शंभर टक्के भाजल्या त्यात त्यांचा मृत्यू झाला. मयत तारामती हया व्यवसायाने शेतकरी होत्या. महाराष्ट्र शासनाने शेतकरी कल्याणकारी योजनेअंतर्गत शेतकरी जनरता अपघात विमा योजना सुरु केलेली आहे. शेतक-यांचा अपघाती मृत्यू झाल्यास विमा कंपनीकडे प्रस्ताव दाखल करुन रक्कम रु.1,00,000/- देण्याची तरतुद केलेली आहे. तक्रारदार यांनी क्लेम सामनेवाला यांच्याकउे दाखल केला, सामनेवाला यांनी तो क्लेम कोणत्याही संयुक्तिक कारणाशिवाय नाकारलेला आहे. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवलेली आहे. सबब तक्रारदार यांची तक्रार मंजूर करण्यात यावी.
सामनेवाला क्र.2 तर्फे वकील श्री.साळवे यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांची पत्नी तारामती ही अपघातात मृत्यू पावलेली नाही त्यांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून स्वतः पेटवून घेतलेले आहे व आत्महत्या केलेली आहे. त्यामुळे शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास तक्रारदार पात्र नाही. सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा क्लेम योग्य व संयुक्तिक कारणासाठी नाकारलेला आहे. सबब तक्रारदार यांची तक्रार रदद करण्यात यावी.
सामनेवाला क्र.2 यांचे वकीलांनी शासन निर्णय कृषी व पशूसंवर्धन विभाग क्रमांक पीएआयएस-1207/प्र.क्र.266/ 11-ए दि.14 ऑगस्ट 2007 चे सहपत्र व प्रपत्र ड यावर या मंचाचे लक्ष वेधले व असा युक्तीवाद केला की, अपघाताचे स्वरुप हे सदर प्रपत्रात नमुद केलेल्या बाबीमुळे झालेला नाही, त्यामुळे तक्रारदार हे क्लेम मिळणेस पात्र नाही.
वर नमुद केलेला युक्तीवाद लक्षात घेतला असता या मंचासमोर महत्वाचा मुददा उपस्थित होतो की, तक्रारदार यांची पत्नी तारामती यांचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला, तक्रारदार यांच्या पत्नीचा मृत्यू प्रपत्र ड मध्ये ज्या अपघाताचे स्वरुप दिलेले आहे, त्या स्वरुपात झाला असल्यास तक्रारदार लाभ मिळण्यास पात्र आहे, जर तक्रारदार यांच्या पत्नीने स्वतःहून आत्महत्या केली असेल तर तक्रारदार हे लाभ मिळण्यास पात्र नाही. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या संपूर्ण कागदपत्राचे काळजीपूर्वक अवलोकन केले. उध्दव नारायण उबाळे यांनी दि.04.03.2012 रोजी पोलीस ठाणे अंमलदार पोलीस स्टेशन ग्रामीण यांच्याकडे खबर दिली, ती खबर वाचता असे लक्षात येते की, तक्रारदार यांच्या पत्नीला मानसिक आजार होता व त्यामुळे त्यांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले होते. पोलीसांनी केलेल्या पंचनाम्याचे अवलोकन केले असता त्या ठिकाणी तक्रारदार यांची पत्नी जळून पडलेली होती, त्या ठिकाणी रॉकेलची कॅन पडलेली होती व तो पोलीसांनी जप्त केला. पोलीसांनी पंचनामा तयार केला त्यावेळेस तक्रारदार यांनी पत्नीचे प्रेत ओळखले व पोलीसांनी दिलेली माहिती त्यामध्ये नमुद केली त्याचे अवलोकन केले असता सुमारे 12 वर्षापासून मयत तारामती हया मानसिक आजाराने ग्रस्त झालेल्या होत्या व त्या आजारास कंटाळून स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांनी पेटवून घेतले व त्यामध्ये त्या शंभर टक्के जळाल्या असे नमुद केले आहे. संपूर्ण पोलीस कागदपत्राचे अवलोकन केले असता या मंचाचे निदर्शनास असे येते की, तक्रारदाराची पत्नी तारामती यांनी मानसिक आजारामुळे स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटून घेतले व त्यात त्यांचा मृत्यू झाला. सदरील कारणास्तव मृत्यू झाला असल्यास शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास पात्र नाही सबब सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा क्लेम योग्य व वाजवी कारणासाठी नाकारलेला आहे. तक्रारदार हे शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास पात्र नाही. तक्रारदाराची तक्रार रदद होणेस पात्र आहे. म्हणून मुददा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदार यांची तक्रार रदद करण्यात येत आहे.
2) खर्चाबददल आदेश नाही.
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्री.रविंद्र राठोडकर, श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड