निकाल
दिनांक- 15.07.2014
(द्वारा- श्रीमती मंजुषा चितलांगे, सदस्य)
तक्रारदार राधाबाई जनार्धन गुटटे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी सेवेमध्ये कसूर केल्याबाबत नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे, तक्रारदाराचा मुलगा अनिल जनार्धन गुटटे हा सामनेवाला क्र.1 यांच्या पॅनकार्ड क्लब्ज लिमिटेड यांच्या कार्यालमधून बीड जिल्हयासाठी नेमलेल्या मार्केटिंग प्रतिनिधी रॅन्ककोड एस आर/1013-01-2543 सामनेवाला क्र.2 यांचे मार्फत पर्सनल अॅक्सिडेंट डेथ इन्शुरन्स दि.20 सप्टेंबर 2011 रोजी जिवन विमा पॉलीसी नं.121700/48/2011/11015 घेतली आहे. सदर पॉलीसीचा फॉर्म सामनेवाला क्र.2 यांनी भरुन घेतला. तक्रारदार यांनी सदर पॉलीसी करता सामनेवाला क्र.1 यांना विमा हप्त्यापोटी आर.एन.पी.पेड रु.10,800/- दिले आहे. सामनेवाला क्र.1 यांनी सदर रक्कम स्विकारुन अनिल जनार्धन गुटटे यांचे जिवीताचे रु.1,00,000/- ची हमी घेतली आहे. दि.17.10.2011 रोजी अनिल जनार्धन गुटटे याचा राष्ट्रीय महामार्ग क्र.222 मादळमोही पाडळसिंग दरम्यान रात्री 07.30 वाजताच्या दरम्यान अपघात झाला. अपघातानंतर अनिल जनार्धन गुटटे यास जिल्हा रुग्णालय बीड येथे उपचारासाठी नेण्यात आल असता तेथील डॉक्टरांनी उपचार चालू असता दि.18.10.2011 रोजी अनिल जनार्धन गुटटे यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर तक्रारदार यांनी आवश्यक कागदपत्रासह सामनेवाला क्र.1 यांच्याकडे पॉलीसीच्या रकमेची मागणी केली असता सदर अपघात हा दि.17.10.2011 रोजी झाला असल्यामुळे मुदतपूर्व क्लेम या कार्यालयास स्विकारता येत नाही असे सांगून सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदाराचा प्रस्ताव स्विकारला नाही. वास्तविक पाहता अनिल जनार्धन गुटटे याचा मृत्यू दि.18.10.2011 रोजी झाला असल्यामुळे सामनेवाला क्र.1 यांनी दिलेल्या पॉलीसीवर तक्रारदार हा विमा रक्कम रु.1,00,000/- मिळण्याचा अधिकार आहे. तक्रारदार यांनी दि.30.04.2012 रोजी सामनेवाला क्र.1 यांचे हेड ऑफीस मुंबई येथे वकीलामार्फत नोटीस पाठविली, सदर नोटीसचे उत्तर दि.26.08.2012 रोजी दिले. तक्रारदार यांनी सदर प्रस्ताव हा अहमदनगर येथील शाखेकडे पाठविण्याचे नोटीसचे उत्तरमध्ये कळवले. दि.31.08.2012 रोजी सामनेवाला क्र.3 यांचेकडून पत्र प्राप्त झाले त्यामध्ये सदर मयत अनिल जनार्धन गुटटे यांचा पॉलीसी कालावधी दि.21.10.2011 पासून सुरु होत असल्यामुळे संबंधित प्रस्ताव मंजूर करता येणार नाही असे कळवले. सामनेवाला क्र.1 व 3 यांनी पॉलीसीची मुदत ही दि.18.10.2011 पासून सुरु होत असल्याचे तक्रारदारास कळवले, सदर बाब ही सामनेवाला क्र.1 यांनी दिलेल्या पॉलीसी प्रमाणपत्रामध्ये उल्लेख केलेला आहे.
सामनेवाला क्र.1 यांच्या मार्फत उतरविलेल्या विम्याची हमी सामनेवाला क्र.3 यांनी घेतली आहे. सामनेवाला क्र.2 हा सामनेवाला क्र.1 यांनी नेमलेल्या बीड जिल्हयासाठी मार्केटिंग प्रतिनिधी आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून विमा हमी रक्कम रु.1,00,000/-, शारिरिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/-, तक्रारीचा खर्च रक्कम रु.10,000/- मिळण्याची विनंती केलेली आहे.
सामनेवाला क्र.1 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी निशाणी 13 अन्वये आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. सामनेवाला क्र.1 यांचे कथन की, सदर तक्रार ही मा.मंचासमोर चालविण्यास पात्र नाही, तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक नाही. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारीतील मजकूर स्पष्टपणे नाकारलेला आहे. सामनेवाले क्र.1 यांचे कथन की, त्यांनी विम्याच्या संबंधी कोणतीही सेवा आम्ही तक्रारदारास दिली नाही. सेवा देण्यात त्रूटी ठेवली असे म्हणता येणार नाही. सामनेवाले क्र.3 वैयक्तीक अपघाती मृत्यूची विमा पॉलिसी आहे. सदर विमा हप्ता हा सामनेवाले क्र.3 देण्यात येतो. आम्ही सामनेवाले क्र. 3 यांच्याकडे विमा प्रस्ताव सादर केला. विमा प्रस्तावाची कार्यवाहीची जबाबदारी ही सामनेवाले क्र.3 ची आहे. सामनेवाले, तक्रारदार यांने सदर पॅनकार्ड हा सभासद Delight Holiday म्हणून स्विकारलेला आहे आणि विम्याचे फायदे दिले आहे. तक्रारदाराचा मयत मुलगा हा दि.18.10.2011 रोजी मयत झाला त्याबाबत दाखल केलेले कागदपत्र चुकीचे आहे. सामनेवाले क्र. 1 यांनी सामनेवाले क्र.3 यांच्याकडे प्रस्ताव दिला आहे. विम्याची रक्कम देण्याची जबाबदारी सामनेवाले क्र.3 ची आहे. सामनेवाले क्र.1 हे सदर मंचाच्या अधिकार क्षेत्रात नाही. शर्ती व अटीच्या नुसार सदर प्रकरण हे मुंबई येथे चालविण्याचा अधिकार आहे. सबब, सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांच्या मयत मुलाकडून कोणत्याही प्रकारचा मोबदला स्विकारलेला नाही. सबब, तक्रारदार हा आमचा ग्राहक होऊ शकत नाही. विम्याची रक्कम देण्याची जबाबदारी सामनेवाला क्र.1 ची नाही, सामनेवाला क्र.1 यांनी सेवा देण्यात कसूर केला आहे असे म्हणता येणार नाही. सबब, तक्रारदाराची तक्रार रदद करण्यात यावी.
सामनेवाले क्र.2 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे निशाणी क्र. 15 अन्वये दाखल केले आहे. सामनेवाले क्र.2 हे सामनेवाले क्र. 1 चे मार्केटींग प्रतिनिधी आहे. सामनेवाला क्र.2 हे ज्या व्यक्तीस पॉलिसी काढायची आहे त्यांचा पॉलिसी फॉर्म भरुन घेतो व त्यांचे कडून आवश्यक भरणा रक्कम घेऊन सदर फॉर्म व रक्कम ही सामनेवाले क्र.1 यांचे कार्यालयामध्ये जमा करण्याचे काम करतो. तक्रारदार यांना नुकसान भरपाई देण्यास सामनेवाले क्र.2 जबाबदार नाही. सबब तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात यावी.
सामनेवाले क्र.3 हे मंचासमोर हजर झाले त्यांनी आपले लेखी निवेदन निशाणी क्र.17 अन्वये सादर केले आहे. सामनेवाले क्र.3 यांचे कथन की,तक्रारदाराचा मयत मुलगा यांला सामनेवाले क्र.1 मार्फत विमा पॉलिसी घेतली आहे. सदर पॉलिसी ही वैयक्तीक अपघात मृत्यूची आहे. सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारीतील उर्वरित मजकूर स्पष्टपणे नाकारला आहे. सामनेवाले क्र. 3 यांचे कथन की, त्यांनी सामनेवाले क्र.1 यांचा क्लब मध्ये निर्देशीत केलेल्या सभासदांसाठी सदर पॉलिसी काढली आहे. पॉलिसीचा कालावधी हा दि.21.10.2011 ते 17.03.2012 आहे. पोलिस पेपर नुसार तक्रारदार यांचे मयत मुलाचा मृत्यू हा दि.17.10.2011 ला झाला आहे. तक्रारदार यांनी कोणतेही कागदपत्र दाखल केले नाही की त्यांच्या मूलाचे मृत्यू हे दि.18.10.2011 रोजी झाला आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र. 3 यांना विम्याचा प्रस्ताव व त्याबददल माहीती ही दि.6.8.2012 म्हणजे 292 दिवसानंतर दिली आहे. सबब, सामनेवाले यांनी दि.31.8.2012 रोजी सदर पॉलिसी मध्ये तक्रारदार यांच्या मयत मुलाची विमा रक्कम समाविष्ट होत नाही. विम्याच्या पॉलिसीची अमंलबजावणी होत नाही. शर्ती व अटीनुसार घटनेची माहीती ही 60 दिवसांच्या आंत देणे गरजेचे असते. परंतु तक्रारदार यांनी सदर माहीती 292 दिवसानंतर दिली. शर्ती व अटीचा भंग केला आहे. सबब, तक्रारदाराचा प्रस्ताव योग्य कारणासाठी नाकारलेला आहे. सबब, सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदारास सेवा देण्यात कसूर केला असे म्हणता येणार नाही. सबब, तक्रारदाराची तक्रार रदद करण्यात यावी.
तक्रारदार यांनी नि.5 सोबत कागदपत्र हजर केले आहे. तसेच तक्रारदाराचे शपथपत्रनि.20 अन्वये दाखल केले आहे. सामनेवाले क्र.1 यांनी प्रशांत तोनापे यांचे शपथपत्र नि.12 अन्वये सादर केले आहे. सामनेवाले क्र.2 यांनी कालीदास नवनाथ आघाव यांचे शपथपत्र नि.16 अन्वये सादर केले आहे. सामनेवाले क्र.3 यांनी नि.18 अन्वये कागदपत्र हजर केले आहे. तक्रारदार व सामनेवाला यांनी दाखल केलेले जबाब व पुराव्याचे शपथपत्राचे अवलोकन केले. दोन्ही पक्षाचा यूक्तीवाद ऐकला. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवा
देण्यास त्रूटी ठेवली आहे ही बाब तक्रारदार
शाबीत करतात काय? नाही.
2. तक्रारीतील मागणी मिळण्यास तक्रारदार
पात्र आहेत काय? नाही.
3. काय आदेश? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2ः-
तक्रारदार यांचे वकील श्री.महाजन यांनी यूक्तीवाद केला की, तक्रारदार यांचे मयत मुलाने सामनेवाले क्र.1 कडून पॅनकार्ड क्लब लि. कडून सामनेवाले क्र.2 मार्फत दि.20.9.2011 रोजी वैयक्तीक अपघात मृत्यू विमा काढलेला आहे. त्यासाठी तक्रारदाराच्या मयत मुलाने सामनेवाले क्र.1 यांस रु.10800/- आर.एन.पी. म्हणून दिले आहे. सदर सामनेवाले क्र. 1 यांनी तक्रारदाराच्या मयत मुलाची रु.1,00,000/- विमा पॉलिसी काढली आहे. दि.17.10.2011 रोजी तक्रारदाराचा मुलगा अनिल जनार्दन गुटटे यांचा अपघात झाला तदनंतर दि.18.10.2011 रोजी तक्रारदाराचा मुलगा अनिल जनार्दन गूटटे यांचा मृत्यू झाला. तक्रारदार यांनी मुलाच्या निधनानंतर सामनेवाले क्र.1 यांच्याकडे संपूर्ण कागदपत्रासह सामनेवाले क्र.2 मार्फत विमा पॉलिसीच्या रक्कमेची मागणी केली असता सामनेवाले क्र. 1 यांनी सदर अपघात दि.17.10.2011 रोजी म्हणजे पॉलिसीच्या घेण्याचे पूर्वी झाल्यामुळे क्लेम स्विकारता येत नाही असे कळविले. तक्रारदार यांनी युक्तीवादात सांगितले की, तक्रारदाराच्या मुलाचा मृत्यू हा दि.18.10.2011 रोजी झाला असल्यामुळे तक्रारदारास विमा रक्कम रु.1,00,000/- मिळण्याचा अधिकार असताना सुध्दा सामनेवाले यांनी तक्रारदारास अद्यापपर्यत रक्कम रु.1,00,000/- दिली नाही व देण्याची तयारी दर्शविली नाही. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 यांच्या मुख्य कार्यालयाला वकिलामार्फत नोटीस पाठविली. सदर नोटीसचे सामनेवाले यांनी उत्तर दिले तसेच सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदारास विम्याची रक्कम न देऊन सेवेत त्रूटी ठेवली आहे त्यामुळे तक्रारदारास आर्थिक व शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. सबब, तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात यावी.
सामनेवाले क्र. 1 यांनी युक्तीवादात सांगितले की, तक्रारदाराची वैयक्तिक अपघात मृत्यूची पॉलीसी उतरविली आहे, पॉलीसी विकत घेतली नाही, तक्रारदाराच्या मयत मुलाचा मृत्यू दि.17.10.2011 ला झाला. पॉलीसी ही दि.18.10.2011 पासून सुरु होते. तक्रारदाराचा मयत मुलगा हा पॉलीसीच्या कालावधीत त्याचा विमा येत नाही. तक्रारदार हा आमचा ग्राहक नाही. तसेच तक्रारदाराच्या मयत मुला सोबत झालेल्या कराराप्रमाणे सदर तक्रार ही मा. मंचाच्या कार्यक्षेत्रात येत नसल्यामुळे चालविण्याचा अधिकार नाही. तक्रारदारांनी दाखल केलेला मृत्यू बाबतचे कागदपत्र चुकीचे व खोटे आहे. तक्रारदारास विम्याची रक्कम देण्याची जबाबदारी ही आमची नसून सामनेवाले क्र. 3 विमा कंपनीची आहे. आम्ही कोणतीही विमा रक्कम देण्याची सेवा पूरवित नाही. सबब, आम्ही सेवेत त्रूटी ठेवली असे म्हणता येणार नाही. सामनेवाले क्र. 1 हे एक क्लब असून त्या मार्फत वेगवेगळया योजनेत ते सर्व साधारणतः सभासदास योग्य सेवा देण्याचे काम करते. सामनेवाले क्र. 1 यांचा यूक्तीवाद असा की, विम्याची रक्कम देण्याची जबाबदारी ही सामनेवाले क्र. 3 म्हणजे विमा कंपनीची आहे. सामनेवाले क्र. 1 यांनी सेवा देण्यात कोणतीही त्रूटी ठेवली नाही. सबब, तक्रारदाराची तक्रार खर्चासह रदद करण्यात यावी.
सामनेवाले क्र. 2 यांच्या युक्तीवादात सांगितले की, सामनेवाले क्र. 1 च्या प्रतिनिधी सामनेवाले क्र. 1 मार्फत पॉलिसी काढायची काम करतो. त्यासाठी आवश्यक फार्म भरुन व आवश्यक रक्कम घेऊन ते सामनेवाले क्र. 1 यांच्याकडे जमा करतो सबब सामनेवाले क्र. 2 हे नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाही.
सामनेवाले क्र. 3 यांचा युक्तीवाद ऐकला. युक्तीवाद करत असताना सांगितले की, तक्रारदाराची ही वैयक्तीक अपघात मृत्यू विम्याची पॉलिसी आहे. सदर पॉलिसीचा कालावधी हा दि.21.10.2011 ते 20.10.2012 आहे. तक्रारदार यांचा मयत मुलगा हा दि.17.10.2011 रोजी मयत झाला आहे. युक्तीवाद करत असतांना पोलिस पेपर मध्ये नमूद केलेल्या बाबीचा उल्लेख केला आहे. तसेच तक्रारदार यांनी सदर अपघाताच्या घटनेची माहीती ही सामनेवाले क्र. 3 यांना दि.6.8.2012 रोजी कळविली आहे. म्हणजे 292 दिवसानंतर आम्हास सदर घटनेची माहीती मिळाली. पॉलिसीच्या अटी व शर्ती नुसार तक्रारदार यांने 60 दिवसांच्या आंत घटनेची माहीती कळविली पाहिजे. तक्रारदार यांचे मयत मुलाच्या पॉलिसीचा कालावधी दि.21.10.2011 ते 20.10.2012 आहे व तक्रारदार यांचा मुलगा दि.17.10.2011 रोजी मयत झाला आहे. तक्रारदार यांने पॉलिसीच्या शर्ती व अटीचा भंग केला आहे. तक्रारदाराच्या मागणीस सामनेवाले क्र. 1 हे जबाबदार आहे. सामनेवाले क्र. 3 यांनी तक्रारदारास सेवा देण्यात कोण्ताही कसूर केला नाही. सबब, तक्रारदाराची तक्रार रदद करण्यात यावी.
तक्रारदार यांचे वकिलांनी केलेला यूक्तीवाद लक्षात घेतला. तक्रारदार यांनी दाखल केलेला पुरावा व कागदपत्र यांचे अवलोकन केले. सामनेवाले यांनी दाखल केलेल्या कागदपत्राचे अवलोकन केले. तसेच युक्तीवादामध्ये नमूद केलेल्या बाबी लक्षात घेतल्या आहेत. तक्रारदार यांच्या मयत मुलाने सामनेवाले क्र. 1 कडून पॅनकार्ड क्लबची सभासद म्हणून नोंदणी केलेली आहे. तक्रारदार यांने दाखल केलेल्या कागदपत्राचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांने सामनेवाले क्र. 1 कडून पॅनकार्ड क्लबचे सभासदत्व स्विकारलेले आहे. त्यासाठी तक्रारदाराच्या मयत मुलाने Delight Holiday ची योजना म्हणून स्विकारलेले आहे. त्यासाठी सामनेवाले क्र. 1 च्या वेगवेगळया योजना राबवितात. त्यात तक्रारदाराच्या मयत मुलाने त्यासाठी सामनेवाले क्र. 1 कडे रु.10,900/- जमा केले आहे व सामनेवाले क्र. 1 यांनी त्या योजनेत तक्रारदाराच्या मयत मुलाची सामनेवाले क्र. 3 मार्फत वैयक्तीक अपघात विम्याच्या रक्कमेची जबाबदारी घेतली आहे असे निदर्शनास येते. तक्रारदाराच्या कथनेनुसार तक्रारदार यांचा मुलगा हा दि.18.10.2011 रोजी मयत झाला आहे. त्यासंबंधीत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पोलिस पेपरचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, मयत अनिल जनार्दन गूटटे यांचा मृत्यू दि.17.10.2011 रोजी अपघाताच्या दिवशीच जागीच झाला आहे. तसेच घटनास्थळ पंचनामा यांचे अवलोकन केले असता त्यामध्ये सुध्दा अनिल जर्नादन गूटटे हे अपघाताच्या दिवशी जागीच मयत झाले आहे. यावरुन मयत अनिल जनार्दन गूटटे यांचा मृत्यू हा दि.17.10.2011 रोजी झाला ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांने शवविच्छेदन अहवाल व इन्क्वेस्ट पंचनामा इत्यादी कागदपत्र दाखल केले नाहीत. तक्रारदार यांनी दाखल केलेले पॅनकार्ड क्लबचे प्रमाणपत्र यांचे अवलोकन केले. त्यामधील insurance coverage चा रकाना नमूद केलेल्या माहीती प्रमाणे तक्रारदार यांचा विमा कव्हर होतो पण केव्हा हे पाहणे गरजेचे आहे. त्यांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, सदर पॉलिसी ही वैयक्तीक अपघात मृत्यूची पॉलिसी आहे. सदर पॉलिसीचा नंबर 121700/48/2011/11015 असे आहे. सदर विमा हा रक्कम रु.1,00,000/- चा उतरविलेला आहे असे निदर्शनास आले. तदनंतर त्यामध्ये स्पष्ट पणे नमुद केलेले आहे की, तक्रारदार यांने दि.18.10.2011 रोजी किंवा त्यानंतर विमा प्रस्ताव दाखल करणे योग्य आहे. परंतु सदर तकारीत तक्रारदार यांचा मयत मुलगा अनिल जनार्दन गूटटे याचा मृत्यू दि.17.10.2011 रोजी झाला आहे. तसेच तक्रारदार यांनी दाखल केलेले मृत्यू प्रमाणपत्र यांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, त्यामध्ये नमूद केलेली तारीख ही उपरीलेखन केल्या सारखी दिसत आहे. सदर प्रमाणपत्राचे छायांकित प्रत दाखल केली आहे. तक्रारदार यांने मृत्यू प्रमाणपत्राचे मुळ प्रत दाखल केली नाही. सबब सदर दस्त हे विश्वासपात्र नाही. सामनेवाले क्र.3 यांनी दाखल केलेले पॉलिसी यांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, मयत अनिल जनार्दन गूटटे यांचे विमा पॉलिसीची कालावधी हा दि.21.10.2011 ते दि.17.0.3.2012 च्या मध्यरात्रीपर्यत आहे असे नमूद केले आहे. सबब सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदाराचा विमा प्रस्ताव हा तक्रारदार यांचा मयत मुलाची हा विमा पॉलिसीची अमंजबजावणी ही दि.21.10.2011 पासून अंमलात आली आहे व तक्रारदाराचा मयत मुलगा यांचा मृत्यू हा पॉलिसीची अंमजबजावणी होण्याआधीच मयत झाला आहे. म्हणजेच दि.17.10.2011 रोजी मृत्यू झाला आहे. सबब सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदाराचा विमा प्रस्ताव नाकारला आहे. तक्रारदाराचा मयत मुलगा हा विमा पॉलिसीच्या शर्ती व अटीनुसार विम्याची रक्कम मिळण्यास पात्र नाही. सबब विम्याची रक्कम देता येत नाही. सबब, सामनेवाले क्र.2 यांनी सेवा देण्यात त्रूटी ठेवली आहे असे म्हणता येणार नाही.
यावरुन मंचाचे असे मत आहे की, तक्रारदार यांच्या मुलाचा मृत्यू हा दि.17.10.2011 रोजी झाला आहे. सबब तक्रारदार हा सामनेवाले यांच्याकडून विम्याची रक्कम मिळण्यास पात्र नाही. सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदाराचा विमा प्रस्ताव योग्य व रास्त कारणासाठी नाकारला आहे. त्यामुळे सामनेवाले यांनी सेवा देण्यात कसूर केला आहे असे म्हणता येणार नाही.सबब तक्रारदाराची तक्रार रदद होण्यास पात्र आहे. म्हणून मुददा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदार यांची तक्रार रदद करण्यात येत आहे.
2) खर्चाबददल आदेश नाही.
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्री.रविंद्र राठोडकर, श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड