निकाल
दिनांक- 16.06.2014
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार श्रीमती सुशिला श्रीमंत फड यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला क्र.1 यांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत क्लेम देण्यास टाळाटाळ करुन सेवेत त्रुटी ठेवली आहे म्हणून विमा रक्कम व नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे, तक्रारदार हया मौजे दौंडवाडी तालुका परळी जिल्हा बीड येथे राहतात. तक्रारदार यांचे पती मयत श्रीमंत फड हे व्यवसायाने शेतकरी होते. त्यांचे नावे मौजे दौंडवाडी येथे गट नं.125 मध्ये 36 आर जमीन नोंदलेली आहे.
दि.12.10.2007 रोजी तक्रारदार यांचे पती श्रीमंत फड हे मोटार सायकल नं.एम.सएच 24-8397 वर माणिकराव दौंड यांचे सोबत दौंडवाडीकडे जात होते. मोटार सायकलच्या पाठीमागून अंबाजोगाई येथून दौंडवाडी या रस्त्याने एस.टी.बस क्र.के.एच.38 एफ – 358 येत होते सदरील बसचे ड्रायव्हर यांनी वाहन निष्काळजीपणाने वेगात चालवित होते. सदरील बसने मोटार सायकलला पाठीमागून जोरात धडक मारली. तक्रारदार यांचे पती हे मोटार सायकलवरुन खाली पडले. तक्रारदार यांचे पती यांना अंबाजोगाई येथे उपचारासाठी नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी विवेकानंद हॉस्पीटल येथे पाठविले. तक्रारदार यांचे पती अपघातामध्ये जबर जखमी झाल्यामुळे ते मयत झाले. सदरील अपघाताची खबर पोलीस स्टेशन यांना देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तक्रारदार यांचे पतीचे शव शवविच्छेदनासाठी पाठविले.
महाराष्ट्र शासनाने शेतकरी कल्याणकारी योजनेअंतर्गत शेतक-यांचा अपघाती मृत्यू झाल्यास शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना सुरु केलेली आहे. महाराष्ट्र शासनाने सदरील शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत सामनेवाला क्र.1 यांच्याकडे विमा रक्कम भरलेली आहे. शेतकरी अपघातात मृत्यू झाल्यास क्लेम मिळणेकामी सामनेवाला क्र.3 यांचे मार्फत अर्ज करुन तो क्लेम इन्शुरन्स कंपनीला पाठविला जातो. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे रितसर अर्ज व सोबत सर्व दस्त दाखल केले. सामनेवाला क्र.2 यांनी दि.27.12.2007 रोजी तक्रारदार यांना पत्र पाठवून काही कागदपत्र अपूर्ण आहेत, त्याची पुर्तता करावी याबाबत कळवले. तक्रारदार यांनी सदरील दस्त सामनेवाला यांना मुदतीत पाठविले. तक्रारदार यांनी संपूर्ण कागदपत्र पाठवूनही सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा क्लेम मंजूर केला नाही. तक्रारदारांनी वेळोवेळी सामनेवाला यांच्याकडे विचारणा केली असता त्यांना खोटी आश्वासने दिली. तक्रारदार यांनी सामनेवाला यांना पत्र पाठवून क्लेम बाबत कळवले. सामनेवाला यांनी जाणुनबूजून तक्रारदार यांचा क्लेम मंजूर करण्यास विलंब लावला. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे. सबब तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांना शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कम रु.1,00,000/- देण्याचे आदेश व्हावे. तक्रारदार यांना शारिरिक व मानसिक त्रास झाला त्याबददल नुकसान भरपाई देण्यात यावी व तक्रारीचा खर्च देण्यात यावा अशी मागणी केलेली आहे.
सामनेवाला क्र.1 यांना नोटीसची बजावणी झाली. ते या मंचासमोर हजर झाले नाही म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला.
सामनेवाला क्र.2 हे या मंचासमोर हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे सादर केले. सामनेवाला क्र.2 यांचे कथन की, तक्रारदार यांचा क्लेम दि.05.12.2007 रोजी तहसिलदार कार्यालय परळी यांच्याकडून त्यांना प्राप्त झाला सदरील प्रस्ताव दि.14.02.2008 रोजी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी येथे पाठविला. सबब सामनेवाला क्र.2 यांनी द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवलेली नाही.
सामनेवाला क्र.3 यांना नोटीस प्राप्त झाली. त्यांनी तालुका कृषी अधिकारी परळी यांना या मंचासमोर हजर होण्याचे निर्देश दिले, तालुका कृषी अधिकारी परळी हे या मंचासमोर हजर झाले नाही.
तक्रारदार यांनी स्वतःचे शपथपत्र दाखल केले. तसेच तक्रारीसोबत दस्त हजर केले. तक्रारदारांनी लेखी युक्तीवाद दाखल केला त्याचे अवलोकन केले. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1) सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार यांचा क्लेम
मंजूर करण्यास टाळाटाळ करुन सेवेत त्रुटी ठेवली
आहे, ही बाब तक्रारदार यांनी शाबीत केली
आहे काय ? होय.
2) तक्रारदार हे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा
योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास पात्र आहे काय? होय.
3) आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 ते 3 ः- तक्रारदार यांनी दाखल केलेले दस्त याचे अवलोकन केले. तक्रारदार यांचे पती दि.07.10.2007 रोजी मोटार सायकल क्रमांक एम.सएच 24-8397 वरुन अंबाजोगाई येथून दौंडवाडीकडे जात होते, मोटार सायकलच्या पाठीमागून बस क्रमांक के.एच.38 एफ – 358 येत होती. सदरील बस ड्रायव्हरने बस निष्काळजीपणाने व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन चालविली. तक्रारदार यांचे पती ज्या मोटार सायकलवरुन जात होते, त्या मोटार सायकलला पाठीमागून धडक दिली त्यात तक्रारदार यांचे पती गंभीर जखमी होऊन मयत झाले. पोलीस पेपरचे अवलोकन केले असता सदरील अपघात हा बस ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे झालेला आहे. बस ड्रायव्हर यांच्या विरुध्द परळी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीसांनी घटनास्थळावर जाऊन घटनास्थळ पंचनामा तयार केला तसेच तक्रारदार यांचे पतीचे शव शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. तक्रारदार यांचे पती मोटार अपघातात मयत झाले ही बाब तक्रारदार यांनी सिध्द केली आहे. तक्रारदार यांचे पतीचे नावे मौजे दौंडवाडी येथे गट नं.125 नोंदलेला आहे. तक्रारदार यांचे पती व्यवसायाने शेतकरी होते. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या दस्तावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांचे पती मयत झाल्यानंतर त्यांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी क्लेम तहसिलदार परळी यांचे मार्फत इन्शुरन्स कंपनीला पाठविला होता, तक्रारदार यांनी क्लेम सोबत दस्त हजर केले होते. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांना काही कागदपत्र हजर करण्याबाबत कळवले होते. तक्रारदार यांनी सदरील कागदपत्र सामनेवाला यांच्याकडे पाठविल्याचे निदर्शनास येते. तक्रारदार यांनी क्लेम मिळणेकामी आवश्यक ते सर्व कागदपत्रे सामनेवाला यांच्याकडे पाठविलेले आहे ते दस्त मिळूनही अद्याप पावेतो सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार यांच्या क्लेम मंजूर अगर नामंजूर केल्याबाबत कळविलेले नाही. महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक- सअवि208- प्रक्र.187- 11 ए 6 सप्टेंबर 2008 अन्वये सामनेवाला यांना क्लेम प्राप्त झाल्यानंतर त्यावर एक महिन्याच्या आत निर्णय घेऊन नुकसान भरपाई देण्याबाबत निर्देश दिलेले आहे. सामनेवाला क्र.1 यांनी सदरील निर्देशाची अंमलबजावणी केल्याचे दिसून येत नाही. तक्रारदार यांनी शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी सर्व कागदपत्र सामनेवाला यांच्याकउे देऊनही तक्रारदार यांचा क्लेम मंजूर केलेला नाही. सबब सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे असे या मंचाचे मत आहे. तक्रारदार हे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास पात्र आहे. सबब मुददा क्र.1 ते 3 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2) सामनेवाला क्र.1 रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदार यांना शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) निकाल कळाल्यापासून 30 दिवसाचे आत दयावेत, सदर रक्कम विहीत मुदतीत न दिल्यास त्यावर तक्रार दाखल तारखेपासून संपूर्ण रक्कम वसूल होईपर्यत द.सा.द.शे.9 टक्के व्याज द्यावे.
3) सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार यांना झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.3,000/- (अक्षरी रुपये
तीन हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1500/- (अक्षरी
रुपये एक हजार पाचशे) दयावेत.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील
कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला
परत करावेत.
श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड