निकाल
दिनांक- 28.10.2014
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष )
तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे, तक्रारदा हे महाराष्ट्र शासन सहकारी संस्थेचे अधिनियमानुसार नोंदणीकृत सहकारी संस्था आहे. सदर संस्थेची नोंद जिल्हा उद्योग केंद्र बीड कार्यालय येथे केलेली आहे. सदर संस्थेचा मुख्य उददेश अंडी उत्पादन करणे, कोंबडया उबवणे, शासनानुसार पशूखात्र खरेदी करणे, शासनाने सोपविलेल्या मालाचे वाटप करणे असे आहे. संस्थेचे चेअरमन बबनराव घोरपडे हे आहेत.
सामनेवाले क्र. 1 व 2 हे महाराष्ट्र शासनाचे लोकसेव व प्रतिनिधी असून त्यांचे अधिपत्याखाली शासनाच्या विविध योजना राबवल्या जातात.
शासनाच्या योजनेनुसार तक्रारदार संस्थेने सामनेवाले क्र. 3 जिल्हा पुरवठा अधिकारी बीड यांचेकडे दि.31.11.2011 रोजी मानवास खाण्यास अयोग्य परंतु पशुखाद्य खाणेस योग्य असलेला गहू 145 क्विंटल व तांदुळ 1207.50 व 482.51 क्विंटल धान्य मिळणेस मागणी केली होती. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र. 3 यांचेकडे आवश्यक त्या सर्व कागदपत्राची पुर्तता केली. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र. 3 यांना पशुखात्र घेण्यास योग्य असलेल्या धान्याची सामनेवाले क्र. 1 व 2 यांचेकडून परवानगी आल्यानंतर वितरीत करण्याची हमी दिली. सामनेवाले क्र. 3 यांनी दि.15.12.2011 रोजी तक्रारदार यांना शासकीय गोदाम बीड व वडवणी येथील चिंचवण गोदामातून पशूखाद्य खाण्यास योग्य असलेले धान्य उचलणेस मंजूरी दिली. तसेच किंमत तात्काळ शासकीय कोषागारात भरणा करावी असे सूचित केले. त्यांचा तपशील खालीलप्रमाणे,
अ.क्र. | तालुकयांचें नांव | गोदामाचे नांव | धान्याचा प्रकार | धान्याचा दर क्विंटल | धान्य क्विंटल | भरणा रक्कम |
1 | बीड | बीड | गहू | 352.15 | 145.00 | 51,062/- |
2 | बीड | बीड | तांदुळ | 484.27 | 1207.50 | 5,84,760/- |
3 | वडवणी | चिंचवण | तांदूळ | 516.18 | 482.51 | 2,49,065/- |
| | | | | एकूण | 8,84,887/- |
तक्रारदार यांनी दि.17.12.2011 रोजी शासकीय खजाण्यात चलनाद्वारे रक्कम रु.8,84,887/- स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा बीड येथे रोख भरणा केले. तसेच दि.17.12.2011 रोजी माल उचलणे बाबत करारनामा लिहून दिला. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे पशूपक्षास खाण्यास योग्य असलेले धान्य मिळण्यासाठी मागणी केली होती. सामनेवाले यांनी सदरील करार करते वेळेस धान्य पशूपक्षास खाण्यास योग्य असल्या बाबत प्रयोगशाळेतून तपासून त्यांची प्रत तक्रारदार यांना देणे बंधनकारक आहे. सामनेवाले यांनी त्या बाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. दि.24.12.2011 रोजी सामनेवाले क्र. 2 यांनी तक्रारदार संस्थेस मंजर केल्याप्रमाणे धान्य आठ दिवसांत गोदामातून उचलून घेऊन जाणे असा आदेश दिला. तक्रारदार यांना सदरील पत्र दि.26.12.2010 रोजी प्राप्त झाले. तक्रारदार यांनी वडवणी गोदामातील माल उचलला. तक्रारदार हे गोदामातील संपूर्ण माल उचलण्यास गेले असता गोदामामध्ये फक्त 62 क्विंटल गहू उपलब्ध होता. तक्रारदार यांनी 165.11 क्विंटल तांदूळ साठयाचा माल उचलला. बीड धान्य गोदामात सर्व धान्य पशुपक्षास खाण्यास अयोग्य असल्याने व त्यापासून पशूपक्षाचे जिवीतास धोका असल्याने तक्रारदार यांने तो माल उचलला नाही. सामनेवाले यांनी कराराप्रमाणे पशूपक्षास खाण्यास योग्य असलेला माल पूरवणे बंधनकारक होते. तक्रारदार यांनी करारानुसार 145 क्विंटलचे गव्हाच्या साठयापैकी 62 क्विंटल गहू व एकूण 1207.50 क्विंटल तांदूळ साठयापैकी फक्त 165.15 क्विंटल तांदूळ साठा उचलला आहे. उर्वरित माल निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे दि.10.1.2012 रोजी तक्रारदार यांनी तो उचलण्यास असमर्थता दर्शवली. तक्रारदार यांनी दि.10.1.2012 रोजी भरणा केलेल्या रक्कमेपैकी रु.5,34,007.28 परत मिळणेची मागणी केली.
तक्रारदार यांनी पूढे असे कथन केले आहे की, बीड येथील शासकीय गोदामातील तांदूळ पशूपक्षांना खाण्यास अयोग्य असल्याचे कारणावरुन दि.10.10.2011 रोजी सामनेवाले क्र. 3यांनी डॉ.लिंबाजीराव मुक्ताराम पानसंबळ ता. सहकारी दूध संघास सदरचा माल विक्री करणेस प्रस्तावित केले होते. परंतु सदरचा माल निकृष्ट व अयोग्य असल्याने तो उचलणेस नकार दिला होता. सामनेवाले क्र.3 यांनी सामनेवाले क्र. 1 व 2 यांना सदरील तांदूळ निकृष्ट दर्जाचा असल्याचा अहवाल दि.10.10.2011 रोजी दिला होता. या सर्व बाबीची माहीती सामनेवाले यांना असतानाही त्यांची तक्रारदार यांना जाणीव न देता तक्रारदार यांची फसवणूक केली आहे. सदरील माल पशूपक्षास खाण्यास योग्य की अयोग्य आहे यांची शहानिशा अधिकृत पशुरोग अन्वेषण विभागाकडून करुन घेणे बंधनकारक होते. तसेच सदरील तांदूळ अधिकृतरित्या तपासणीस पाठविला होता. सहआयूक्त पशुसंवर्धन पशुरोग अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दि.15.3.2013 रोजी तहसीलदार बीड यांना दिला होता. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली आहे. तक्रारदार यांनी सदरील रक्कम परत मिळणेकामी सामनेवाले यांचेकडे पाठपूरावा करुनही सामनेवाले यांनी त्यांची दखल घेतली नाही. सबब, तक्रारदार यांना सदरील तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. सबब, तक्रारदार यांनी अशी विनंती केली आहे की, सामनेवाले यांनी रु.5,34,007/- तक्रारदार यांना परत देण्याचा आदेश देण्यात यावा, त्या रककमेवर व्याज मिळावेख् मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळावी व तक्रारीचा खर्च मिळावा.
सामनेवाले क्र. 1 ते 3 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी नि.11 अन्वये लेखी कैफियत हजर केली. सामनेवाले यांचे कथन की, तक्रारदार यांनी न उचललेला माल पशूपक्षाना खाण्यास योग्य होते. सामनेवाले यांनी सदरील माल वितरीत करणे पूर्वी पशू संवर्धन सह आयुक्त, रोग अन्वेषन विभाग, महाराष्ट्र राज्य औंध, पूणे यांचेकडून तपासणी अहवाल मागितला होता. सदरील अहवालानुसार सदरील तांदूळ हा पशूपक्षाना खाण्यास योग्य असल्या बाबत अहवाल दि.21.12.2010 रोजी प्राप्त झाला होता. तक्रारदार यांनी दि.24.12.2011 रोजी वडवणी येथील शासकीय गोदामातील संपूर्ण माल उचललेला आहे. बीड येथील गोदामामध्ये पशूपक्षास खाण्यास योग्य असलेला 145 क्विंटल गहू शिल्लक होता. सदरील गहू पूरविण्यास सामनेवाले तयार आहेत. तांदूळ साठयातील माल पशूपक्षास खाण्यास अयोग्य आहे हे तक्रारदार यांचे म्हणणे खोटे आहे. सामनेवाले यांचे करारा अन्वये माल पूरविण्यास तयार असतानाही तक्रारदार यांनी तो उचलला नाही. सामनेवाले यांनी दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली नाही. तक्रारदार संस्थेने मुदतीत माल न उचलल्याने सदरील माल खराब झाला होता. दि.15.3.2013 रोजी सदरील धान्याचे निष्कर्ष प्राप्त झाला त्यामध्ये सदरील माल पशुपक्षास खाण्यास अयोग्य असल्या बाबत निष्कर्ष देण्यात आला. सदरील नुकसान हे तक्रारदार यांनी मुदतीत माल न उचलल्यामुळे झाले आहे त्यास सामनेवाले जबाबदार नाही. तक्रारदार यांची तक्रार रदद करण्यात यावी.
तक्रारदार यांनी नि.4 सोबत एकूण 27 दस्त हजर केले आहेत. तक्रारदार यांनी स्वतःचे शपथपत्र नि.13 वर दाखल केले आहे. सामनेवाले क्र. 1 ते 3 मार्फत जिल्हा पुरवठा अधिकारी श्री.चंद्रकांत व्ही. सूर्यवंशी यांचे शपथपत्र नि.12 वर हजर केले आहे.तक्रारदार यांचे वकील श्री. पळसोकर यांचा यूक्तीवाद ऐकला. सामनेवाले यांचे वकील श्री. वाघीरकर यांचा यूक्तीवाद ऐकला. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. तक्रारदार यांनी न उचललेले धान्य पशूपक्षाना खाण्यास अयोग्य
होते ही बाब तक्रारदार यांनी शाबीत केली आहे काय ? होय
2. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली आहे
ही बाब तक्रारदार शाबीत करतात काय ? होय
3. तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? होय
4. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमिंमासा
मुददा क्र.1 ते 3 ः-
तक्रारदार यांचे वकील श्री. पळसोकर यांनी असा यूक्तीवाद केला की, तक्रारदार यांनी शासकीय गोदामातून पशूपक्षाना खाण्यास योग्य असलेलया धान्याची मागणी केली होती. सामनेवाले क्र.3 यांनी शासकीय गोदाम बीड व चिंचवण यांचे धान्य पशूपक्षाना खाण्यास योग्य असल्याने ते उचलण्यास मंजूरी दिली. तक्रारदार यांनी रु.8,84,887/- सामनेवाले यांचेकडे चलनाद्वारे भरले व माल उचलणे बाबत करारनामा लिहून दिला. सदरील धान्य पशूपक्षाना खाण्यास योग्य असल्या बाबत ते प्रयोगशाळेकडून तपासून घेण्याची जबाबदारी सामनेवाले यांचेवर होती. सामनेवाले यांनी कोणतीही तपासणी न करता बीड गोदामातील सर्व तांदूळ हा पशूपक्षाना खाण्यास अयोग्य असल्याचे आढळून आले. त्यामुळे सदरील धान्य तक्रारदार यांनी उचलले नाही. सामनेवाले यांनी सदरील धान्य हे पशूपक्षाना खाण्यास योग्य आहे यांची खात्री करुनच विक्री बाबत प्रस्ताव ठेवणे गरजेचे होते. सामनेवाले यांनी सदरील बाब लपवून ठेवली. तक्रारदार यांनी 62 क्विंटल गहू व 165 क्विंटल तांदूळ उचलला आहे. उर्वरित धान्य हे पशूपक्षाना खाण्यास अयोग्य असल्यामुळे ते उचलला नाही. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे वेळोवेळी भरलेल्या रक्कमेपैकी उचललेल्या धान्याची रक्कम वजा जाता रक्कम रु.5,34,007/- ची मागणी केली आहे. सामनेवाले यांनी ती देण्यास टाळाटाळ करुन सेवेत त्रूटी ठेवली आहे.
सामनेवाले हे जरी सरकारी यंत्रणा असली तरी तक्रारदार यांना सेवा देण्याचे कार्य करतात. सामनेवाले यांनी निकृष्ट माल तक्रारदार यांना देण्याचे ठरवून सेवेत त्रूटी ठेवली आहे. सबब, तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत.
सामनेवाले यांनी नि.14 वर लेखी यूक्तीवाद देऊन असे कथन केले आहे की, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदयाचे अंतर्गत सदरील प्रकरण चालविण्याचा अधिकार या मंचाला नाही. तक्रारदार यांनी सदरहू मालाचे उचल वेळेत केली नाही. तक्रारदार यांनी सदरील मालाची गुणवत्ता यांची संपूर्ण माहीती होती. त्या बाबत तक्रारदार यांनी प्रामाणिक प्रयत्न केले नाही. मुदतीत धन्य न उचलल्यामुळे शासनाचे नुकसान झाले होते. सदरील धान्य पशूपक्षाना खाण्यास योग्य आहे किंवा नाही या बाबत अहवाल पशू संवर्धन सह आयुक्त, रोग अन्वेषन विभाग, महाराष्ट्र राज्य औंध, पूणे यांचेकडून मागितला होता. सामनेवाले यांनी दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली नाही.
तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र व दस्ताऐवज तसेच सामनेवाले यांचे शपथपत्र व दस्त यांचे अवलोकन केले असता तक्रारदार हे नोंदणीकृत सहकारी संस्था आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे पशूपक्षाना खाण्यास योग्य असलेला गहू व तांदूळ मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्या अनुषंगाने सामनेवाले यांनी बीड मधील शासकीय गोदामातील व चिंचवण यांचे शासकीय गोदामातील गहू व तांदूळ सामनेवाले यांनी देण्याचे ठरवून त्यांची किंमत ठरवली. तक्रारदार यांनी सदरील किंमतीपोटी रक्कम रु.8,84,887/- सामनेवाले यांचेकडे चलनाद्वारे भरले. तक्रारदार यांनी वडवणी गोदामातील गहू व तांदूळ धान्य दि.17.12.2011 रोजी करारनामा लिहून देऊन दि.24.12.2011 रोजी धान्य उचलले. तक्रारदार हे बीड गोदामातील धान्य उचलण्यास केला असता सदरील धान्य हे पशूपक्षाना खाण्यास अयोग्य असल्याचे निदर्शनास आले म्हणून ते धान्य त्यांनी उचलले नाही. तक्रारदार यांनी सदरील बाब सामनेवाले यांचे निदर्शनास आणून दिले. सामनेवाले यांनी सदरील तांदूळ व गहू यांची प्रत ठरविण्यासाठी प्रयोगशाळेकडे पाठविला. पशू संवर्धन सह आयुक्त, रोग अन्वेषन विभाग, महाराष्ट्र राज्य औंध, पूणे यांनी सदरील धान्य पशूपक्षाना खाण्यास अयोग्य असल्या बाबत अहवाल दिला. सदरील दस्ताऐवज तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केले आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी बीड यांनी मा.अवर सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय विस्तार,मुंबई यांना दि.10.10.2011 रोजी पत्र पाठविला त्या पत्रामध्ये पावसाचे पाणी गोदामामध्ये शिरल्यामुळे तांदूळ पूर्णपणे खराब झाल्याचे व पशूपक्षाना खाण्यास अयोग्य असल्या बाबत डॉ. लिंबाजीराव मुक्ताराव पानसंबाळ तालुका सहकारी दुध संघ मर्यादित यांनी तो घेण्यास असमर्थता दर्शविली. तसेच नि.7 वर पशू संवर्धन सह आयुक्त, रोग अन्वेषन विभाग, महाराष्ट्र राज्य औंध, पूणे यांचा अहवाल दाखल केलीा आहे. सदरील अहवाल यांचे निरीक्षण करता पशूपक्षाना खाण्यास तांदूळ साठा व गहू साठा अयोग्य असल्या बाबत स्पष्ट उल्लेख केला आहे. सामनेवाले यांचा यूक्तीवाद की, तक्रारदार सदरील माल घेण्याचे अगोदर प्रतवारी व गुणवत्ते बाबत माहीती करुन घेणे गरजेचे होते. तसेच तक्रारदार यांनी मुदतीत माल उचलला नाही म्हणून तो खराब झाला असे नमूद केलेले आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेले दस्ताऐवज पाहता तक्रारदार यांनी व सामनेवाले यांचेमध्ये दि.15..12.2011 रोजी सामनेवाले क्र.3 यांनी सदरील माल उचलण्यास परवानगी दिली. दि.07.12.2011 रोजी तक्रारदार यांनी चलनाने पैसे भरले. दि.26.1.2.2010 रोजी तक्रारदार यांनी वडवणी गोदामातील माल उचलला व ते बीड गोदामातील माल घेण्यास गेले असता तो माल पशूपक्षाना खाण्यास अयोग्य असल्याचे आढळून आले. वर नमूद केलेल्या दिनांकाचा विचार करता तक्रारदार यांनी माल उचलण्यास विलंब केला आहे असे म्हणता येणार नाही. सामनेवाले यांनी केलेला पत्रव्यवहार लक्षात घेतला असता सदरील धान्य तक्रारदार यांना विकण्याचे अगोदर दूस-या संघास विकण्याचा प्रस्ताव संमत झाला आहे परंतु धान्य खराब असल्यामुळे संबंधीत संस्थेने तो माल उचलला नाही. तदनंतर तक्रारदार यांना तो माल विकण्याचे प्रस्तावित करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक अखाद्य-2199/498/प्र.क्र.4932/ना.पु.17, मंत्रालय विस्तार,मुंबई दि.28 ऑक्टोबर 1999 च्या परिपत्रकाप्रमाणे अखाद्य धान्याची विल्हेवाट लावल्या संबंधी नियम विहीत केलेले आहेत. गोदाम संहितेच्या परिच्छेद -5.3.2 मध्ये विहीत केल्याप्रमाणे थप्पीतील धान्य क व ड प्रतवारीचे किंवा त्या प्रतवारीपेक्षा कमी दर्जाचे आढळल्यास तेव्हा त्या धान्याचे 500 ग्रँम वजनाचे तीन सारखेच प्रातिनिधीक नमूने एकाचवेळी खालील तीन प्रयोगशाळाना पाठवावे. सदरील धान्य मानवास खाण्यास योग्य आहे किंवा अयोग्य आहे या बाबतचे प्रमाणपत्र घ्यावे. सहसंचालक, पशुसंवर्धन रोग, पुणे-7 या प्रयोगशाळेतून नमून्यांचे परिक्षण करुन सदरहू धान्य पशूपक्षानी खाण्यास योग्य आहे किंवा अयोग्य आहे याविषयी प्रमाणपत्र घ्यावे. प्रयोगशाळेकडून प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर अखाद्य धान्य विक्रीची किंमत निश्चित करुन सहकारी संस्थाना विक्री करावी. सदरील शासन परिपत्रक यांचे अवलोकन केले असता पशूपक्षाना खाण्यास धान्य योग्य असल्या बाबत प्रमाणपत्र घेऊनच पूढील कार्यवाही करावी लागते. सामनेवाले यांनी त्या बाबत कार्यवाही केल्याचे आढळून येत नाही. सामनेवाले यांनी दि.31.1.2013 रोजी धान्याचे नमूने प्रयोगशाळेत पाठवून अहवाल मागितला आहे. सदरील अहवाल दि.15.03.2013 रोजी सामनेवाले यांना प्राप्त झाला आहे. सदरील धान्य पशूपक्षाना खाण्यास अयोग्य असल्या बाबत प्रयोगशाळेने निष्कर्ष काढला आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना धान्य वितरण करण्याचे अगोदर सदरील मालाची प्रत प्रयोगशाळेत तपासून घेणे गरजेचे आहे. सदरील माल पशूपक्षाना खाण्यास योग्य आहे असा निष्कर्ष प्रयोगशाळेतून आल्यानंतरच त्यांची विल्हेवाट लागणे कामी पूढील कार्यवाही करणे उचित झाले असते. सामनेवाले यांनी तसे न करता तक्रारदार यांना सदरील माल वितरीत करण्या बाबत प्रसतावित केले. तक्रारदार यांनी सदरील माल हा पशूपक्षाना खाण्यास योग्य आहे असे समजून तो घेण्यास संमती दर्शवली प्रत्यक्षात तो माल पशूपक्षाना खाण्यास अयोग्य होता. सामनेवाले यांना सदरील बाबीची पूर्ण कल्पना होती असे असतानाही त्यांनी तो माल तक्रारदार यांना विकण्याचा प्रस्ताव मांडला व त्यांची विक्री केली. ज्या कारणासाठी तक्रारदार यांनी माल घेतला आहे त्या कारणासाठी तो जर वापरला जाऊ शकत नसेल तर तक्रारदार यांना सदरील करार रदद करता येतो. सामनेवाले यांनी जरी असे कथन केले आहे की, तक्रारदार यांनी सदरील माल विकत घेताना प्रतवारी बाबत खात्री करुन घ्यावयास पाहिजे होती. परंतु प्रत्यक्षात शासकीय परिपत्रकानुसार सामनेवाले यांचेवर जबाबदारी होती. तो माल प्रयोगशाळेतून तपासून पशूपक्षाना खाण्यास योग्य असल्या बाबत निष्कर्ष प्राप्त करणे. सामनेवाले यांनी तसे केले नाही व सदरील माल तक्रारदार यांना विकला. तक्रारदार यांनी वेळोवेळी पत्र पाठवून सदर माल हा पशूपक्षाना खाण्यास अयोग्य असल्या बाबत सामनेवाले यांचे निदर्शनास आणून दिलेले आहे. सबब, या मंचाचे मत की, सामनेवाले यांनी तक्रारदार यांना पशूपक्षाना खाण्यास अयोग्य माल विक्री करुन दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली आहे. तक्रारदार यांनी चिंचवण शासकीय गोदामातील संपूर्ण माल उचलला व शासकीय गोदाम बीड येथील माल उचलणेस गेले असता सदरील माल पशूपक्षाना खाण्यास अयोग्य असल्यामुळे तो उचलण्यास नकार दिला. तक्रारदार यांनी 62 क्विंटल गहू व 165.15 क्विंटल तांदूळ जो पशूपक्षाना खाण्यास योग्य होता तो उचललेला आहे. त्यांची रक्कम वजा जाता तक्रारदार यांनी जी अधिक रक्कम सामनेवाले यांचेकडे भरली आहे ती परत मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत. तक्रारदार हे रक्कम रु.5,34,007/- मिळण्यास पात्र आहेत.
तक्रारदार यांनी सदरील रककमेवर द.सा.द.शे 18 टकके व्याजाची मागणी केली आहे. तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्ये झालेला व्यवहार लक्षात घेता व कालावधी लक्षात घेता तक्रारदार हे सदरील रककमेवर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज मिळण्यास पात्र आहेत. तसेच झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु.3,000/- व तक्रारीचा खर्च रु.1,000/- मिळण्यास पात्र आहेत.
मुददा क्र.1 ते 3 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2)
3)
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्री.रविंद्र राठोडकर श्रीमती मंजूषा चितलांगे श्री.विनायक लोंढे,
सदस्य सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड