सौ.मंजुश्री खनके, सदस्या यांचे कथनांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांक – 10 एप्रिल, 2015)
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ही ग्रा.सं.का. 1986 अंतर्गत कलम 12 अन्वये कलम 12 अंतर्गत दाखल केली असून, तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा थोडक्यात आशय असा आहे की, तक्रारकर्ती ही नागपूर येथील राहिवासी असून, तिने 12 मे, 2013 रोजी तिचे पती व मुलगी यांच्या समवेत सेवाग्राम एक्सप्रेस गाडी क्र. 1239 बी-2 बोगीने मुंबई ते नागपूर असे तिकिट 11 मे, 2015 रोजी तात्काळ पध्दतीने काढले. त्या तिकिटाचा पीएनआर क्र. 850048 व बर्थ क्र. अनुक्रमे 1, 4 व 8 असा होता. दि.12 ते, 2013 रोजी तक्रारकर्तीने आपल्या पती व मुलीसोबत प्रवासास सुरुवात केली. त्यानंतर गाडी कल्याण येथे पोहोचल्यानंतर बर्थ क्र. 5 वर एक प्रवासी चढले. त्यांचे विनंतीवरुन तक्रारकर्त्याने मधला बर्थ टाकून त्यांच्या विनंतीनुसार त्यांना झोपण्यास मान्यता दिली. तक्रारकर्तीने बर्थ क्र. 4 वर आपल्या मुलीसोबत झोपण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर साधारणतः 4 ते साडेचार तासानंतर बर्थ क्र. 5 वरील प्रवासी टॉयलेटला गेले. त्यानंतर काही क्षणातच मधल्या बर्थचा उजव्या बाजूचा हूक कडीमधून निसटला व तक्रारकर्तीच्या डोक्यावर उजव्या बाजूला आदळला. अचानक झालेल्या या आघातामुळे तक्रारकर्तीने जोराने किंकाळी मारली व त्या आवाजाने तिचे पती धावून आले. सुदैवाने तक्रारकर्तीच्या मुलीचा जीव वाचला. त्यामुळे तक्रारकर्तीस जखम होऊन गंभीर दुखापत झाली व चेह-यावर सुज आली. या घटनेनंतर तक्रारकर्तीच्या पतीने बोगीचे टी.सी. श्री. गावडे यांचेकडे धाव घेऊन घडलेल्या घटनेची माहिती दिली व त्याबाबत तक्रार केली. संबंधित परिस्थितीची पाहणी केल्यानंतर टी.सी.ने तक्रारकर्तीस भुसावळ येथे दवाखान्यामध्ये भरती करण्याचा सल्ला दिला. तक्रारकर्तीसोबत तिची 7 वर्षे वयाची मुलगी व सामान असल्याने तक्रारकर्तीच्या पतीने टी.सी.कडे प्रथमोपचाराची मागणी केली. त्यानुसार श्री. गावडे टी.सी. यांनी भुसावळ रेल्वे कार्यालयाशी संपर्क साधून डॉक्टर उपलब्ध करुन देण्याचा व तातडीने वैद्यकीय मदत मिळावी अशी मागणी केली. त्यावेळी देखील तक्रारकर्तीने भुसावळ येथे तक्रार नोंदविण्याचा आग्रह धरला, तेव्हा तिला तुम्ही याआधीच टी.सी.कडे तक्रार नोंदविल्यामुळे पुन्हा वेगळी तक्रार भुसावळ येथे नोंदविण्याची गरज नाही असे सांगितले. नागपूर रेल्वे स्थानकावर घटनेची माहिती देऊन प्रथमोपचार घेण्यास सांगितले. त्यानंतर भुसावळ स्थानकावर रेल्वेचे डॉक्टरांना पाचारण केले. त्यांनी उपचारादाखल तक्रारकर्तीस केवळ एक वेदनाशामक गोळी दिली व त्याचे शुल्क रु.40/- तक्रारकर्तीस मागितले आणि त्याची पावती मागितली असता रेल्वे डॉक्टरांनी नकार दिला. तसेच तक्रारकर्तीने केलेल्या तक्रारीचा क्रमांक मागितला असता तो देण्यास नकार दिला व डॉक्टरांचे नाव विचारले असता ते सांगण्यास नकार दिला व टी.सी. भुसावळ रेल्वे स्थानकावर उतरुन गेले. यापुढे तक्रारकर्ती नमूद करते, रेल्वे डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा परिणाम झाला नाही आणि असह्य वेदनेमुळे चेह-यावरील सूज वाढत राहीली व त्यामुळे तक्रारकर्ती रात्रभर झोपू शकली नाही आणि तिला प्रवासात कुठलाही उपचार मिळाला नाही. शेवटी 13 मे, 2013 रोजी सकाळी नागपूर रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतरही वि.प.क्र.1 यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते कार्यालयात उपलब्ध नव्हते. तसेच तक्रारकर्तीची तक्रार नोंदविली असूनही तिला रेल्वे प्रशासनामार्फत कुठलीही वैद्यकीय मदत मिळाली नाही. शेवटी रेल्वे प्रशासनाकडून मदत न मिळाल्याने नाईलाजाने तक्रारकर्तीने डॉ. सुब्रमण्यम, अजनी चौक, नागपूर अस्थीरोग तज्ञ यांचेकडे उपचार घेण्यासाठी धाव घेतली व नंतर त्यांच्या सल्यानुसार नाक, कान व घसा तज्ञ यांचे उपचार घेण्याकरीता गेली असता तेथे त्यांना सीटी स्कॅन करावे लागले. तक्रारकर्तीच्या कानाजवळ फ्रॅक्चर झालेले होते. त्याकरीता 20 दिवसांचा उपचार केल्यानंतर बरे न झाल्यास डॉक्टरांनी शस्त्रक्रीया करण्याचा सल्ला दिला. तसेच डेंटल व आय हॉस्पीटल यांचेकडे उपचार घ्यावा लागला. या सर्व प्रकारात तक्रारकर्तीस औषधोपचारासाठी खर्च करावा लागला. तसेच मानसिक व शारिरीक त्राससुध्दा झाला. सर्वात महत्वाचे म्हणजे तक्रारकर्तीच्या लहान मुलीचे मानसिक स्वास्थ्य तक्रारकर्तीच्या औषधोपचारामुळे खालावले. या काळात सर्व वि.प.सोबत पत्रव्यवहार करण्यात आला. परंतू त्यातून तक्रारकर्तीचे उपचाराबाबत समाधान झाले नाही, म्हणून शेवटी नाईलाजाने तक्रारकर्तीने मंचासमोर तक्रार दाखल करुन उपचाराबाबत आलेला खर्च, मानसिक त्रासाबाबत भरपाई, कार्यवाहीचा खर्च व तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत.
तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीचे पुष्टयर्थ प्रवासाचे तिकिट, दि.25.05.2013 चे पत्र व पोचपावत्या, वि.प.क्र. 1 चे त्यास उतर, स्मरणपत्र, वि.प.क्र. 4 व 1 चे उत्तर, स्मरणपत्र, वैद्यकीय उपचाराची कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
2. सदर तक्रारीची नोटीस वि.प.क्र. 1 ते 5 वर बजावण्यात आली असता वि.प.क्र. 1 ते 5 यांनी तक्रारीस संयुक्तपणे आपले लेखी उत्तर दाखल केले.
3. वि.प.क्र. 1 ते 5 यांनी आपल्या लेखी उत्तरात नमूद केले की, तक्रारकर्तीने तक्रारीत कथन केलेल्या पी.एन.आर.चे अनुषंगाने घेतलेल्या तिकिटावर तक्रारकर्ती आपल्या कुटुंबासमवेत मुंबई ते नागपूर प्रवास करीत होती. वि.प.ने आपल्या लेखी उत्तरात हे मान्य केले की, श्री. आर. एन. कुलकर्णी यांचे नावाने आरक्षित असलेला बर्थ क्र. 5 वर ते झोपले होते आणि 4 ते 4 1/2 तास झोपल्यानंतर टॉयलेटला जाण्यासाठी खाली उतरले असता काही क्षणातच बर्थच्या उजव्या बाजूचा हूक कडीमधून निसटला आणि बर्थ खाली पडला व तक्रारकर्ती ही बर्थच्या खाली झोपली असल्याने तिला दुखापत झाली. तसेच जर बर्थचा हूक खराब असता तर 4 ते 41/2 तासापर्यंत बर्थ क्र. 5 वर प्रवासी झोपू शकले नसते, त्यामुळे यात रेल्वे प्रशासनाची काहीही चूक नाही. तसेच प्रवासी बर्थवरुन उतरत असतांना बर्थचा हूक कदाचित कडीमधून निसटला असावा आणि त्यामुळेच तो खाली पडला, त्यात कुठेही दोष नव्हता. याचे कारण असे बी/2 कोचमध्ये कार्यरत कंडक्टर पलनी मन्नार स्वामी गवंडर यांनी ए.सी.कोच मेकॅनिक यांना बोलावून बर्थ क्र. 5 चा हूक लावून त्यावर बसून व झोपून दाखविले. तसेच नागपूर रेल्वे स्थानकावर परत सदर बर्थची तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये कोणताही दोष आढळून आला नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाची यात कोणतीच चूक नाही. वि.प. पुढे नमूद करतात की, बी-2 कोचमध्ये कार्यरत असलेल्या कंडक्टरद्वारे परिस्थितीची पाहणी करुन भुसावळ स्टेशनला डॉक्टर बोलावून उपचार देण्यात आले व पुढील उपचाराकरीता भुसावळ येथील दवाखान्यात जाण्यास सांगितले. परंतू तक्रारकर्तीने त्यास नकार दिला. रेल्वे नियमानुसार औषधोपचाराची फी आकारण्यात येते. त्यामुळे तक्रारकर्तीकडूनही फी घेण्यात आली, परंतू अल्पशा वेळेत पावती देणे शक्य नसल्याने तक्रारकर्तीस त्याची पावती देण्यात आली नाही. यापुढे वि.प.ने तक्रारकर्त्याचे तक्रारीतील सर्व कथन अमान्य केलेले आहे व यापुढे असे नमूद केले आहे की, रेल्वे प्रशासनाने दि.07.06.2013 ते 05.08.2013 पर्यंत एकूण चार पत्रे पाठवून सविस्तर माहिती दिली आहे, त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सदर प्रकरणात कुठेही दुर्लक्ष केले नाही. तसेच सदर घटना ही मनमान ते चाळीसगाव या दरम्यान घडली असल्यामुळे ती मा. ग्राहक मंचाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही, त्यामुळे तक्रारकर्ता हा मा. जिल्हा ग्राहक मंच येथे दाद मागू शकत नाही. तसेच रेल्वे प्रशासनाच्या तपासणीत हूकमध्ये कुठलाही दोष आढळून न आल्याने ती वि.प.ची सेवेतील न्यूनता नाही, त्यामुळे तक्रारकर्ता हा मागणीप्रमाणे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही, करिता रेल्वे प्रशासनाला नुकसान भरपाईकरीता जबाबदार धरण्यात येऊ नये. क्षेत्रधिकार नसल्याने तक्रार खारिज करण्यात यावी व वि.प.क्र. 5 चा यात कुठलाही संबंध नसल्याने त्यांचेविरुध्दची तक्रार खारिज करण्यात यावी.
वि.प.ने आपल्या लेखी उत्तरासोबत कोचिंग इंजिनीयर, नागपूर यांचे पत्र, घटनास्थळाचे छायाचित्र, वि.प.ने दिलेले पत्र, कंडक्टरने रेल्वेविषयी दिलेला तपशिल इ. कागदपत्रे दाखल केलेली आहे.
4. तक्रारीच्या निणर्यासाठी खालिल मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यांत आले. त्यावरील मंचाचे निष्कर्ष व त्याबाबतची कारणमिमांसा पुढीलप्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) सदर मंचाला तक्रार चालविण्याची अधिकार कक्षा आहे काय? होय.
2) विरुध्द पक्षाने सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे काय ? होय.
3) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यांस पात्र आहे काय ? अंशतः.
4) आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
5. मुद्दा क्र.1 बाबतः- वि.प.ने सदर प्रकरणी नागपूर जिल्हा ग्राहक मंचाला सदर तक्रार चालविण्याची अधिकार कक्षा नसल्याबाबत आक्षेप घेतला आहे. मंचाचे मते तक्रारकर्तीचा प्रवास हा मुंबई ते नागपूर असा होता, त्यामुळे नागपूर जिल्हा ग्राहक मंचाला तक्रार चालविण्याची अधिकार कक्षा आहे. त्यामुळे मुद्दा क्र. 1 चे निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
6. मुद्दा क्र.2 बाबतः- सदरच्या प्रकरणात तक्रारकर्तीची तक्रार, तिने अभिलेखावर दाखल केलेली कागदपत्रे, वि.प.क्र. 1 ते 5 चे लेखी उत्तर व दाखल दस्तऐवज यांचे सुक्ष्म अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारकर्तीचे तक्रारीतील कथन वि.प.ने बहुंताशी मान्य केलेले आहे. वि.प.च्या म्हणण्यानुसार रेल्वेमध्ये तक्रारकर्तीच्या डोक्यावर बर्थ क्र. 5 पडला व तिला जखम झाली. परंतू रेल्वेमध्ये उपलब्ध प्रथमोपचाराच्या साहित्याने तक्रारकर्तीवर उपचार करण्यात आले नाही किंवा नजिकच्या स्टेशनवर तशी सोय करण्यात आली नाही. त्यामुळे जखमी अवस्थेत तक्रारकर्ती भुसावळपर्यंत गेली. तसेच पुढे तक्रारकर्तीस भुसावळ येथे औषधोपचार दिला असता तिला रेल्वेचे रुग्णालयात दाखल होण्यासंबंधी सल्ला देण्यात आला होता असे नमूद केले आहे. तक्रारकर्तीने वारंवार टी.सी.ला विनंती केली की, नागपूर रेल्वे स्थानकाला तक्रार कळविण्यात यावी. परंतू तिला वेळोवेळी असे सांगण्यात आले की, तुम्ही एकदा तक्रार नोंदविली आहे ती नोंद सर्व ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून पुन्हा तक्रार नोंदविण्याची गरज नाही. तक्रारकर्ती ही नागपूरला पोहोचली असता तेथे ती जखमी प्रवासी म्हणून तिची कुठल्याही प्रकरची तसदी रेल्वे प्रशासनाने घेतल्याचे वि.प.चे लेखी उत्तरात नमूद नाही. तक्रारकर्तीचे पती नागपूर रेल्वे स्थानकावर तक्रार करण्यास कार्यालयात गेले असता अधिकारी कार्यालयात हजर नव्हते. रेल्वेच्या रुग्णालयातून कुठल्याही डॉक्टरने येऊन तक्रारकर्तीची तपासणी वा औषधोपचार केले नाही. त्यामुळे नाईलाजाने तक्रारकर्तीस बाहेर जाऊन खाजगी डॉक्टरांकडे उपचार व तपासण्या कराव्या लागल्या आणि त्यात तिला फ्रॅक्चर झालेले असल्यामुळे बराच मोठा खर्च औषधोपचार, चाचण्या यावर करावा लागला. त्यासंबंधीचे सर्व कागदपत्रे तक्रारकर्तीने अभिलेखावर दाखल केलेले दिसून येत आहे. रेल्वे प्रशासनाने वरच्या हूकमध्ये कुठलाही तांत्रिक दोष नसल्याचे कागदपत्रे व फोटो दाखल केलेले आहेत. परंतू तक्रारकर्तीस भुसावळ येथील रेल्वे रुग्णालयात दाखल होण्याचा डॉक्टरांचा सल्ला लेखी स्वरुपात दिसून येत नाही. तसेच तक्रारकर्तीने वांरवार नागपूर येथील कार्यालयात तक्रार नोंदविण्याची मागणी केली असता त्याची आवश्यकता नसल्याचे सांगून कुठलीही माहिती नागपूर रेल्वे रुग्णालयात कळविल्याचे एकही कागदपत्रे रेल्वे प्रशासनाने अभिलेखावर दाखल केलेले नाही. तसेच जर एकदा तक्रार दिल्यानंतर पुन्हा तक्रार देण्याची आवश्यकता नसेल तर रेल्वे प्रवासात एखाद्या प्रवाश्यास दुखापत झाली असल्यास व प्रवाश्यास पूरेसा औषधोपचार मिळाला नसल्यास स्थानकावर उतरल्यानंतर त्याची तपासणी करणे हे रेल्वे प्रशासनाचे प्रथम कर्तव्य आहे. परंतू तक्रारकर्तीने त्याबाबत तक्रार दाखल करुनही नागपूर रेल्वे स्थानकावर तक्रारकर्तीस कुठलाही उपचार दिला गेला नाही किंवा तशी सोय केल्याचेही दिसून येत नाही. हीच वि.प.ची सेवेतील न्युनता आहे असे मंचाचे मत आहे.
तसेच त्यानंतर तक्रारकर्तीने सर्व वि.प.क्र. 1 ते 5 यांचेकडे तिच्या उपचारासंबंधी वारंवार पत्रव्यवहार करुन झालेल्या नुकसानीची भरपाई मागितली असता रेल्वे प्रशासनाचे पत्रांवरुन प्रत्येक वेळी असे दिसून येत आहे की, घडलेली घटना त्यांना मान्य आहे. तक्रारकर्तीस त्यामुळे असुविधा झाली आहे. परंतू झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत कुठलीही तत्परता रेल्वे प्रशासनाने दर्शविली नाही. हीसुध्दा वि.प.चे सेवेतील न्यूनता आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. तसेच सदर बर्थ क्र. 5 मध्ये कुठलाही तांत्रिक बिघाड नाही आणि म्हणून ती प्रशासनाचे सेवेतील न्यूनता नाही हे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे अवाजवी आहे. म्हणून ते मान्य करण्यासारखे नाही. उपरोक्त निष्कर्षावरुन मुद्दा क्र. 2 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
7. मुद्दा क्र.3 बाबतः- मंचाचे मते लाखो प्रवासी रेल्वेमध्ये प्रवास करतात. विमानासारख्या तोकडया प्रवाश्यांकरीता विमान प्राधिकरण हे प्रवाश्यांच्या औषधोपचारापासून तर जिवनावश्यक गरजांसाठी संपूर्ण व्यवस्था ठेवतात व विमान जमिनीवर आल्यावर आजारी प्रवाश्यांची सोय नजिकच्या रुग्ण्यालयात करतात. मात्र सदर प्रकरणात तक्रारकर्ती जखमी अवस्थेत प्रवास करीत असतांना, तिने टी.सी.कडे त्याबाबत तक्रार केली असतांना तिच्या दुखापतीबाबत निवारण करण्याकरीता कोणतीही पावले रेल्वे प्रशासनाने उचलली नाही किंवा तिला नजिकच्या येणा-या रेल्वे स्थानकावर रुग्णालयीन सेवा देण्यात आली नाही. घटना घडली तेव्हा प्रथमोपचाराची औषधे रेल्वेत उपलब्ध नव्हती, त्यामुळे तिच्या चेह-यावर सूज आली व ती वाढत गेली. कान, नाक व डोळा यासारखी नाजूक अवयवे ही सूज आल्याने व नसांवर जास्त तणाव आल्याने निकामी होऊ शकतात. परंतू साधी प्रथमोपचाराची साधने उपलब्ध असती तर तक्रारकर्तीस हा त्रास सहन करावा लागला नसता व पर्यायाने मंचासमोर तक्रार दाखल करावी लागली नसती. सदर सेवा उपलब्ध न करुन वि.प.ने सेवेत त्रुटी ठेवल्याचे निदर्शनास येते, म्हणून वि.प.क्र. 1 ते 4 हे तक्रारकर्तीस सदर प्रकरणी नुकसान भरपाई देण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
तक्रारकर्तीने औषधोपचाराची देयकांच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. सदर देयकांचे अवलोकन केले असता तक्रारकर्तीस जवळपास रु.50,000/- इतका खर्च आल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रारकर्ती रु.50,000/- द.सा.द.शे. 9 व्याजासह ही रक्कम तक्रार दाखल दि.18.11.2013 पासून प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत वि.प.कडून मिळण्यास पात्र आहे. तसेच झालेल्या प्रकारावरुन तिला झालेल्या मानसिक, शारिरीक त्रासाची भरपाई म्हणून रु.10,000/- व तक्रारीचा खर्चादाखल रु.5,000/- वि.प.ने तक्रारकर्तीस द्यावे.
उपरोक्त निष्कर्षावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) वि.प.क्र. 1 ते 4 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला रु.50,000/- द.सा.द.शे. 9 व्याजासह ही रक्कम तक्रार दाखल दि.18.11.2013 पासून प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत द्यावी.
3) वि.प.क्र. 1 ते 4 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी मानसिक, शारिरीक त्रासाची भरपाई म्हणून रु.10,000/- व तक्रारीचा खर्चादाखल रु.5,000/- वि.प.ने तक्रारकर्तीस द्यावे.
4) वि.प.क्र. 1 ते 4 यांनी सदर आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक महिन्याचे आत करावे.
5) वि.प.क्र. 5 यांना सदर तक्रारीतून वगळण्यात येते.