निकाल
दिनांक- 29.01.2015
(द्वारा- श्री.रविंद्र राठोडकर, सदस्य)
तक्रारदार अनंत हंबर्डे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी ठिंबक सिंचन संच निकृष्ट दर्जाचा देऊन सेवेत त्रूटी ठेवली आहे म्हणून नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात येणे प्रमाणे, तक्रारदार हे आष्टी जि.बीड येथील रहिवासी असून तेथे सर्व्हे नं.494 आणिी 495 मध्ये 12 एकर शेती आहे. सामनेवाले हे कृषी सेवा केंद्र आहे व जैन ठिंबक सिंचन चे अधिकृत विक्रेते आहेत. तक्रारदार यांना जमिनीत ठिंबक सिंचन बसवायचे असल्यामुळे त्यांनी सामनेवाले यांचेकडे गेले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व कागदपत्र व दस्ताऐवजाची माहीती दिली व एकूण खर्च रु.4,30,000/- लागेल असे सूचवले. सदर रक्कमे पैकी रु.2,00,000/- हे शासनामार्फत सबसिडीच्या स्वरुपात मिळतील व उर्वरित रक्कम रु.2,30,000/- तक्रारदारास दयावे लागतील अशी माहीती दिली. सदरील ठिंबक सिचनासाठी पाईप लॅटरल व इतर सर्व साहित्य उत्कृष्ट दर्जाचे व जैन कंपनीचे वापरण्यात येईल अशी हमी सामनेवाले यांनी दिली व पाच वर्षाची गॅरंटी आहे असे सांगितले आहे.
तक्रारदाराने सामनेवाले यांचे म्हणणे प्रमाणे संचिका तयार करुन नगदी रोख व काही रक्कम चेकद्वारे रु.2,30,000/- सर्व आवश्यक त्या कागदपत्रासह सामनेवाला यांना दिली आहे. सामनेवाले यांनी सदर दस्ताऐवजाची संचिका करुन ती शासनाकडे जमा करुन शासनाची सबसिडीची रक्कम उचलून घेतली आहे. सामनेवाले यांनी दि.18.6.2011 रोजी तक्रारदाराच्या जमिनीत ठिंबक सिंचन कार्यप्रणाली संपूर्ण जमिनीत 12 एकर मध्ये 4 x ½ (चार बाय दिड) प्रमाणे बसवले. सामनेवाले यांनी पाईप, लॅटरल व इतर साहित्य व सर्व साधनसामूग्री ही निकृष्ट दर्जाची वापरली. त्यामुळे ठिंबक कार्यप्रणाली मध्ये जागोजागी ब्लॉकेज होऊन पाईप आणि लॅटरलमध्ये तुकडे पडले. सदर कार्यप्रणाली एक वर्षाचे आंतच खराब झाली. त्यामुळे तक्रारदाराची शेतीचे सर्व कामे ठप्प झाली व तक्रारदारास शेतीपासून उत्पन्न घेणे कठीण झाले. सामनेवाले यांनी हमी दिल्याप्रमाणे साहित्य चांगल्या प्रतीचे न वापरता निकृष्ट दर्जाचेवापरले. याबाबत सामनेवाले यांना निदर्शनास आणून देण्यात आले. परंतु सामनेवाले यांनी त्याकडे हेतूपूरस्पर दूर्लक्ष केले व ठिंबक कार्यप्रणाली दूरुस्त करुन देण्यास टाळाटाळ केली. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात त्रूटी केली आहे. शेतीस पाणी न दिल्यामुळे तक्रारदाराचे दोन वर्षाचे पिकाचे नुकसान झाले. तक्रारदाराचे रु.20,00,000/- चे नुकसान झाले. तसेच त्यामुळे तक्रारदारास मानसिक व शारीरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला आहे.
सामनेवाले यांनी दूर्लक्ष केल्यामुळे तक्रारदाराने मा.कृषी आयूक्त राज्य पूणे यांना लेखी तक्रार केली. याबाबत मा.विभागीय कृषी संचालक औरंगाबाद यांनी सदर प्रकरणी तात्काळ चौकशी करुन परिपूर्ण अहवाल देण्याबाबत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बीड यांना दि.15.7.2013 रोजी आदेशीत केले. तरी देखील सामनेवाले यांनी ठिंबक कार्यप्रणाली बदलून दिली नाही व सामनेवाले यांनी वरिष्ठाचे सूचनेकडे दूर्लक्ष केले. शेवटी तक्रारदाराने दि.4.6.2013 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठविली. सदर नोटीस प्राप्त झाल्यानंतर दि.4..7.2013 रोजी त्यांचे वकिलामार्फत नोटीसचे उत्तर दिले.नोटीसमध्ये खोटे स्वरुपाचे कथन केले आहे. ठिंबक प्रणाली बदलून दिली नाही. तक्रारदाराने सदरील तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, तुरी व कपाशी लागवड व इतर मशागती खर्च संपूर्ण 12 एकरमध्ये रक्कम रु.2,00,000/-, ठिबंक कार्यप्रमाणासाठी तक्रारदाराने सामनेवाले यांचेकडे जमा केलेली रक्कम रु.2,30,000/-, ठिंबक सिचंन कार्यप्रणाली खराब असल्यामुळे सलग चार हंगाम जमिन पडीत पडल्याने झालेले नुकसान रु.12,00,000/-, मानसिक त्रास रु.,2,00,000/-, ठिंबक कार्यप्रणाली कार्यान्वीत करण्यासाठी व इतर पाठपूरावा करणेकरिता झालेला खर्च रु.1,80,000/- असे एकूण रु.20,00,000/- नुकसान झाले आहे.
सामनेवाले हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी नि.14 अन्वये आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. दोन संचाबददल रक्कम रु.4,30,000/- लागतील असे सूचविले होते.तक्रारदाराने चेकद्वारे फक्त रु.1,99,000/- सदरचे दोन संचाबददल सामनेवाले यांचेकडे जमा केलेले आहेत व आजही तक्रारदाराकडून रक्कम रु.31,000/- येणे बाकी आहे. सदरची रक्कम जमा करण्यास तक्रारदार टाळाटाळ करीत आहेत.दि.18.6.2011 रोजी ठिंबक प्रणाली बसवण्यात आली हे बरोबर आहे. कूठल्याही पाईपचे व लॅटरलचे तुकडे पडले हे म्हणणे खोटे आहे.सामनेवाले यांनी बसवलेली ठिंबक प्रणाली ही जैन इंरिगेशन सिस्टीम जळगांव या नामांकित कंपनीने उत्पादीत केलेली व पुरवठा केलेली असून. कंपनीच्या गूडविल नुसार गुण्वत्तापूर्ण व अतिशय उच्च प्रतीच्या साहित्यापासून बनवलेली व त्यांचा दर्जा हा अतिशय उत्कष्ट स्वरुपाचा आहे. सदर संचामध्ये जैन इंरिगेशन शिवाय इतर कूठलेही साहित्य वापरण्यात आलेले नाही. सदर संच हा तक्रारदाराच्या अयोग्य हाताळणीमुळे केवळ लॅटरल कातरलेले असल्यामुळेच वापराविना पडला आहे. सदर साहित्यामध्ये उत्पादकीय दोष नसून तक्रारदाराने केवळ लॅटरल इमिटींग पाईप गूंडाळून बाईडरवर न ठेवल्यामुळे कातरलेले आहेत व त्यामुळे दोष निर्माण झालेला असून त्यांस तक्रारदार सर्वस्वी जबाबदार आहेत. तक्रारदाराने तक्रार दीड ते दोन वर्षानंतर केल्यानंतर लगेच सामनेवाले यांनी कंपनीस कळविले होते. कंपनी तर्फे तक्रारदाराचे संचाची पाहणी करण्यात आली. सामनेवाले यांनी विक्रेते म्हणून चांगली जबाबदारी पार पाडली आहे. त्यांनी सेवा देण्यात कोणताही कसूर केलेला नाही. विक्रेता म्हणून जबाबदारी मर्यादित स्वरुपाची आहे.जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी चौकशी करुन अहवाल देण्या बाबत कळविले होते परंतु सामनेवाले यांना ठिंबक कार्यप्रणाली बदलून देण्याबाबत कधीही सूचित केले नव्हते. जिल्हा कृषी अधिकारी बीड यांचे पाहणी अहवालानुसार इमिटींग पाईप गूंडाळून (वाईडरवर) न ठेवता शेतात जतन केल्याचे आढळून आले व इमिटींग पाईप कातरलेले असल्याचे आढळून आल्याचा उल्लेख आहे.तसेच पी.व्ही.सी. पाईपचे तुकडे पडल्याचे आढळून आले नाही. त्या तुकडयाचे चार नमुने कृषी आयूक्तालय यांना पाठविले. त्यांनी दि.4.11.2013 रोजीचे पत्र पाठवून कळविले की, सामनेवाले यांचेकडे बसविण्यात आलेली ठिंबक कार्यप्रणाली संच हा प्रमाणीत असून उच्च् प्रतीच्या दर्जाचा असल्याचे व त्यात कसल्याही प्रकारचा दोष नसल्याचे सिध्द झालेले आहे. सामनेवाले यांनी तक्रारदाराची कसल्याही प्रकारची फसवणूक केलेली नाही. तक्रारदारास तक्रार दाखल करणेस कोणतेही कारण घडलेले नाही.
संचाचे साहित्य हे कृषी आयूक्तालयाने ठरवून दिलेल्या निकषानुसार उत्तम व योग्य दर्जाचे असून ते बी.आय.एस. मार्कचेच आहे. सामनेवाले यांचे मार्फत तक्रारदार यांना ठिंबक सिंचन संच कसा चालवावा, प्रत्यक्ष घटकांची कोणती निगा राखावी या बाबतची मराठी पुस्तीका संच कार्यान्वीत झाला आहे व तो तक्रारदारास दिलेला आहे. रु.100/- चे बॉड वर तक्रारदार यांनी उत्पादकानी दिलेल्या तांत्रिक सुचनाचे पालन करण्याची हमी दिलेली आहे. तक्रारदाराच्या तक्रारीमूळे इमीटींग पाईपचे चार नमूने काढून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले. तपासणी अहवालात ठिंबक संचाचे साहित्य उत्तम उच्च दर्जाचे व गुणवत्ता पूणे असल्याचे सिध्द झालेले आहे. तपासणी पत्राची प्रत तक्रारदार यांना देण्यात आली आहे. तक्रारदार यांचे संचासोबत आष्टी तालुक्यातील इतर शेतक-यांना ठिंबक संच बसवण्यात आलेले आहेत त्यांचे ठिंबक सिंचन संच सुरळीत चालू असून सुस्थितीत आहेत. सामनेवाले यांनी विक्रेता म्हणून सर्व सेवा वेळोवेळी तक्रारदारास दिलेल्या आहेत. संच बदलून देण्याची जबाबदारी उत्पादकाची आहे. तक्रारदाराचे निष्काळजीपणामुळे व हलगर्जीपणामुळे व योग्य देखभाल झाली नसल्यामुळे पाईप कातरले आहे. त्याबाबत सामनेवाले हे जबाबदार नाहीत. तसेच तक्रारदाराने तक्रारीत उत्पादकास पक्षकार म्हणून सामील केलेले नाही. म्हणून नॉन जॉईडर ऑफ नेसेसरी पार्टीज या तत्वानुसार तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. तसेच तक्रारदाराची तक्रार ही मुदतबाहय आहे. सामनेवाले यांना विनाकारण त्रास देण्यासाठी तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारदाराची तक्रार रु.50,000/- खर्चासह खारीज करण्यात यावी.
तक्रारदार यांनी पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे. तसेच नि.4 अन्वये कागदपत्र दाखल केले आहेत. नोटीसची प्रत, नोटीसच्या उत्तराची प्रत, विभागीय संचालक औरंगाबाद यांचे पत्र, तक्रारदाराचे शेतीचा 8-अ चा उतारा, 7/12 चा उतारा इत्यादी कागदपत्र दाखल केली आहेत. सामनेवाले यांनी सुशिला आबासाहेब खिल्लारे यांचे शपथपत्र नि.15 अन्वये दाखल केले आहे.सामनेवाले यांची साक्षीदार महादेव मुटकूळे, श्रीमती सिंधूताई झिंजूर्के, यांचे शपथपत्र दाखल केले आहेत. कृषी संचानलक यांनी दिलेला निष्कर्ष, तक्रारदाराचे शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदाराचे वकील श्री.सयद यांचा यूक्तीवाद ऐकला, सामनेवाले यांचे वकील श्री. एन..एम.कूलकर्णी यांचा यूक्तीवाद ऐकला. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. सामनेवाले यांनी विक्री केलेले ठिंबक सिंचन संच निकृष्ट दर्जाचे होते
त्यामुळे तक्रारदाराचे शेतीचे नुकसान झाले ही बाब तक्रारदार शाबीत
करतात काय ? नाही.
- तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? नाही.
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2 ः-
तक्रारदार यांची तक्रार नि.क्र.1 त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे नि.4 व पुराव्याचे शपथपत्र नि.17 आणि सामनेवाला यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे नि.14 त्यांनी दाखल केलेले कागदपत्र नि.20 ते 23 व पुराव्याचे शपथपत्र नि.24 या सर्वाचे या मंचाने बारकाईने अवलोन केले. तसेच तक्रारदार यांचे विधीज्ञ श्री.एच.आर. सय्यद आणि सामनेवाला यांचे विधीज्ञ श्री.एन.एम.कुलकर्णी यांचा यूक्तीवाद ऐकला असता असे दिसून येते की, तक्रारदार हा शेतकरी असून मौजे आष्टी येथे जमिन सर्व्हे नं.494 आणि 495 मध्ये 12 एकर शेतजमिन त्यांच्या नांवे आहे. तर सामनेवाला यांचे कृषी सेवा केंद्र असून जैन ठिंबक सिंचन कंपनीचा अधिकृत विक्रेता आहे. तक्रारदार यांने सन 2011-12 अंतर्गत राष्ट्रीय सुक्ष्म सिंचन योजना अंतर्गत सामनेवाला यांच्याकडून स्वतःच्या शेत जमिन गट नं.494 आणि 495 मध्ये 12 एकर शेत जमिनीत ठिंबक सिंचन कार्यप्रणाली दि.18.6.2011 रोजी रक्कम रु.4,30,000/- त्यापैकी सबसिडी म्हणून रक्कम रु.2,00,000/- ची बसवली ही बाब सामनेवाला यांना मान्य आहे म्हणून तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक आहे. परंतु उर्वरित रक्कम रु.2,30,000/- तक्रारदाराने सामनेवाला यांना कशा प्रकारे दिले त्याबददलचा कोण्ताही पुरावा या मंचासमोर सादर केला नाही. कारण सामनेवाला यांच्या म्हणण्यानुसार उर्वरित रक्कम रु.2,30,000/-पैकी रु.1,99,000/- तक्रारदाराकडून मिळाले असून रु.31,000/- तक्रारदाराकडे बाकी आहेत.
सदरील ठिंबक सिंचन कार्यप्रणाली तक्रारदार यांच्या शेत जमिनीमध्ये बसण्यापूर्वी कंपनीचे तज्ञ श्री.कार्ले यांनी तक्रारदाराच्या जमिनीचे स्वरुप प्रत्यक्ष पाहून जमिनीचा उतार, मातीचा प्रकार, खोली, क्षारता इत्यादी बाबीची परिक्षण करुन आणि तांत्रिक बाबी तपासून सदरील ठिंबक संच तक्रारदाराच्या शेतात बसवण्यात आला त्याबददलची सर्व माहीती, प्रशिक्षण व घ्यावयाची काळजी इत्यादीचे मार्गदर्शन करुन तशा प्रकारची मराठी भाषेत असलेली माहिती पुस्तिका तक्रारदारास सामनेवाला यांनी तसा ठिंबक संच बसवताना दिली. परंतु, सदरील संच खराब झाल्यामुळे तक्रारदाराने सामनेवाला तसेच राज्य कृषी आयूक्त पूणे, कृषी मंत्री यांच्याकडे सदरील ठिंबक संच निकृष्ट दर्जाची देऊन फसवणूक केल्याची तक्रार दिली असता मा.विभागीय कृषी संचानक औरंगाबाद यांनी श्री.डी.जी. मुळे जिल्हा अधिक्षक जिल्हा बीड यांना आदेश देऊन तक्रारदाराच्या तक्रारीची चौकशी करुन अहवाल देण्याबाबत सांगितले. त्यानुसार मा.उपविभागीय कृषी अधिकारी बीड यांनी दि.15.3.2013 रोजी तालुका कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी, कृषी परिवेक्षक, कृषी सहायक व सामनेवाला या सर्वाच्या समक्ष तक्रारदार यांचे ठिंबक सिंचन यांची पाहणी करुन त्याबाबतचा अहवाल जिल्हा कृषी अधिकारी बीड यांना दाखल केला. सामनेवाला यांनी सदरील अहवाल व त्यासोबत असलेली फोटो या मंचासमोर सादर केले असून ते नि.22 वर आहेत. त्यांचे या मंचाने अवलोकन केले असता असे दिसून येते की, सदर शेताच्या पहाणीमध्ये ठिंबक सिंचन चालू नव्हते तसेच इंमिटींग पाईप गूंडाळून वाईडरवर न ठेवता, छायाचित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे शेतात जतन केल्याचे आणि कातरलेले आढळून आले परंतु पीव्हीसी पाईपचे तुकडे पडल्याचे आढळून आले नाही व त्याचबरोबर तक्रारदाराने साहित्याच्या दर्जेबददल तक्रार केल्यामुळे चौकशी अधिका-याने इमिटींग पाईपचे 4 बॅचचे नमूने 1111-3651, 1111-3662, 1111-4651, 1111-4663 असे काढून ते शासकीय प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवले असता त्यामध्ये कसल्याही प्रकारचा उत्पादकीय दोष नसून ते लँटरल पाईप उंदराने आणि इतर किटकांनी कातरल्याचे स्पष्ट होते. तशा प्रकारचा अहवाल सामनेवाला यांनी सादर केला असून तो नि.23 वर आहे. तसेच त्या कालावधीमध्ये सामनेवाला यांनी इतर शेतक-यास ठिंबक संचाची कार्यप्रणाली बसवली होती. त्यांचे शपथपत्र सामनेवाला यांनी या मंचासमोर दाखल केले असून ते नि.20 व 21 वर आहे. त्यांचे अवलोकन केले असता असे दिसून येते की सदरील संचातील सर्व साहित्य हे उत्तम गुणवत्तेचे असून सामनेवाला व जैन इरिगेशन संच.लि.यांच्यामार्फत त्यांना वेळोवेळी सेवा दिलेली आहे. सदरचा संच अतिशय उत्तम दर्जाचा असून तो आजही सुव्यवस्थित आहे. सामनेवाला यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या संचाची काळजी घेतलेली असून तो चालू अवस्थेत आहे. म्हणजेच यावरुन या मंचास असे दिसून येते की, सामनेवाला यांनी तक्रारदारास मार्गदर्शन केलेले असून सेवा दिलेली आहे.परंतु तक्रारदाराने सदरील संचाची योग्य ती काळजी घेतलेली नाही असे दिसून येते. म्हणजेच तक्रारदाराच्या निष्काळजीपणामुळे लँटरल पाईप खराब झाले आहेत. त्याच बरोबर सदरील संच खराब झाल्यामुळे तक्रारदाराचे एकूण रु.20,00,000/- नुकसान झाले आहे. याबददलचा कोणताही सबळ पुरावा या मंचासमोर तक्रारदाराने सादर केला नाही.याउलट तक्रारदाराने नि.4 बरोबर ते गट क्र.494 व 495 चे 7/12 चे उतारे दाखल केले आहेत यावरुन असे दिसून येते की, तक्रारदाराने सदरील जमिनीमध्ये कापूस,तुर, ज्वारी, हरभरा इत्यादीचे उत्पन्न घेतले आहे. म्हणून जमिन पडीक पडून नुकसान होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. त्याचबरोबर सामनेवाले हा जैन ठिंबक संच यांचे वितरणाचे काम करतो त्यांचे उत्पादन हे जैन इरिगेशन सिस्टीम जळगांव ही कंपनी करुन ते सामनेवाला यांना विक्री करण्यासाठी वितरीत केले जातात. त्या संचातील सर्व साहित्य हे कृषी आयूक्तालयाने ठरवून दिलेल्या निष्कर्षानुसार उत्तम व योग्य दर्जाचे असून बी.आय.एस. मार्कचे आहेत. त्यासाठी सामनेवाला यांना जबाबदार धरता येणार नाही. जर सदरील ठिंबक संचात उत्पादकीय दोष असेल, तर उत्पादकीय कंपनीला पार्टी करणे आवश्यक होते. परंतु तक्रारदाराने सदरील प्रकरणात उत्पादक कंपनीला पार्टी केली नसल्यामुळे असंयोजनाची बांधा “Non joinder of necessary party या तत्वाचा बाधा येते.
वरील सर्व बाबीचा या मंचाने काळजीपूर्वक विचार केला असता असे दिसून येते की, सामनेवाला यांनी तक्रारदारास आवश्यकतेनुसार योग्य त्या वेळी सेवा दिलेली आहे. म्हणजेच तक्रारदाराच्या शेत गट क्र.494 व 495 मधील 12 एकर शेत जमिनीमध्ये ठिंबक संच बसवण्यापूर्वी व बसवल्यानंतरही सामनेवाला यांनी वेळोवेळी तक्रारदारास सेवा दिलेली आहे. केवळ तक्रारदाराच्या निष्काळजीपणामुळे सदरील संचातील लँटरल पाईप खराब झाले आहेत.म्हणून सामनेवाला यांने तक्रारदारास दयावयाच्या सेवेत त्रूटी ठेवली आहे असे म्हणता येणार नाही. म्हणजेच सामनेवाला यांनी तक्रारदार यांना दयावयाच्या सेवेत त्रूटी ठेवली आहे ही बाब तक्रारदार यांनी शाबीत केलेली नाही. त्यामुळे तक्रारदार हे तक्रारीत मागणी केल्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाहीत.
म्हणून , मुददा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2) खर्चाबददल आदेश नाही.
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्री.रविंद्र राठोडकर, श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे,
सदस्य सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड