निकाल
दिनांक- 26.09.2014
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार भास्कर येदु कराळे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवलेली आहे म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे, तक्रारदार हे मौजे आपटी येथे राहात असून शेती व्यवसाय करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवितात. तक्रारदार यांना शेती व्यवसायात त्यांची पत्नी मदत करत होती. तक्रारदार यांनी त्यांच्या मालकीच्या शेतजमीनीमध्ये विहीर खोदली व विहीरीतून पाणी उपसून जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी सामनेवाला यांचेकडून विद्युत कनेक्शन घेतले, तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहे. तक्रारदार हे नियमित विद्युत देयके भरत आहे, तक्रारदार यांचे नावे विद्युत कनेक्शन आहे. तक्रारदार व त्यांची पत्नी हे एकत्र कुटूंबात राहत होते व शेत जमिनीतील उत्पन्न संयुक्तरित्या घेत होते. तक्रारदार यांची पत्नी तक्रारदाराप्रमाणेच सामनेवाला यांची ग्राहक आहे.
तक्रारदार यांनी पुढे तक्रारीत असे कथन केले आहे की, सामनेवाला यांनी विद्युत पोल पासून मोटारीच्या स्टार्टर पर्यंत सामनेवाला यांनी योग्य साहित्य पुरविण्याची जबाबदारी होती, सामनेवाला यांनी निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरविले. सामनेवाला यांनी वापरलेले सर्व्हिस वायर लिक असल्यामुळे स्टार्टर पेटीमध्ये विद्युत प्रवाह उतरला. दि.18.06.2013 रोजी तक्रारदार यांची पत्नी गयाबाई हया सकाळी विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेली असता पेटीमध्ये उतरलेला विद्युत प्रवाहचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. तक्रारदार यांचे पत्नीस कडा येथे रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्या मृत झाल्याचे जाहीर केले. तक्रारदार यांनी अभोरा पोलीस स्टेशनमध्ये खबर दिली पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन घटनास्थळ पंचनामा केला. सामनेवाला यांना ही सदरील घटनेची माहिती देण्यात आली, सामनेवाला यांनी विद्युत निरीक्षक यांना घटनास्थळावर येऊन पाहणी करण्यासाठी पाचारण करणे गरजेचे होते, सामनेवाला यांनी घटनेची माहिती विद्युत निरीक्षकास दिली नाही.
तक्रारदार यांनी असे कथन केले आहे की, तक्रारदाराच्या पत्नीचे वय 48 वर्षे होते व त्या दरमहा रु.4,500/- कमावत होत्या, तक्रारदाराची पत्नी कुटूंबाची काळजी घेत होत्या, त्यांच्या मृत्यूनंतर तक्रारदार यास प्रतिमहा रु.3,000/- घरातील कामे करण्यासाठी खर्च करावे लागत आहे. तक्रारदार यांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. तक्रारदार यांना पत्नी शिवाय जगावे लागणार आहे, तक्रारदार यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सबब तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून रु.10,00,000/- नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती केलेली आहे.
सामनेवाला क्र.1 व 2 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी निशाणी 11 अन्वये लेखी कैफियत हजर केली. सामनेवाला यांनी तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहे ही बाब मान्य केलेली आहे. सामनेवाला यांचे कथन की, सामनेवाला यांनी तक्रारदार यास दिलेले कनेक्शन नियमाप्रमाणे दिलेले आहे त्यासाठी लागणारे साहित्य योग्य दर्जोचे वापरलेले आहे, सदरील साहित्याबाबत तक्रारदार यांनी कधीही तक्रार केलेली नाही. सदरील अपघात हा तक्रारदार व त्यांचे पत्नीच्या निष्काळजीपणामुळे झालेला आहे. सामनेवाला यांनी घटना घडल्यानंतर विद्युत निरीक्षक यांना पत्र देऊन घटनेची कल्पना दिलेली आहे. सामनेवाला यांचे कथन की, तक्रारदार यांची पत्नी गयाबाई हया विद्युत पेटीजवळ गेल्या असता त्या ठिकाणी त्यांच्या हाताचा स्पर्श वितरण पेटीच्या स्टार्टरच्या विद्युत भारीत उपकरणास झाल्याने मयत झाल्या आहे. तक्रारदार यांनी वितरण पेटी, स्टार्टर यांची योग्य देखभाल केलेली नाही, त्यास सामनेवाला यांना जबाबदार धरता येणार नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात यावी.
तक्रारदार यांनी स्वतःचे शपथपत्र निशाणी 14 वर दाखल केले आहे. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत निशाणी 4 वर पोलीस पेपर, पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, तक्रारदार यांनी दिलेल्या नोटीसेस दाखल केलेल्या आहे. सामनेवाला यांनी निशाणी 12 वर शपथपत्र दाखल केलेले आहे. सामनेवाला यांनी विद्युत निरीक्षकास दिलेले पत्र हजर केले आहे. तक्रारदार यांचे वकील श्री.महाजन यांचा युक्तीवाद ऐकला. सामनेवाला यांचे वकील श्री.गर्जे यांचा युक्तीवाद ऐकला. तक्रारदार व सामनेवाला यांनी दाखल केलेले कागदपत्र व शपथपत्राचे अवलोकन केले. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1) सामनेवाला यांनी विद्युत कनेक्शन देतांना निकृष्ट
दर्जाचे साहित्य पुरवून सेवेत त्रुटी ठेवलेली आहे,
ही बाब तक्रारदार यांनी शाबीत केली आहे काय? होय.
2) तक्रारदार हे नुकसान भरपाई केलेली मागणी
मिळण्यास पात्र आहे काय? होय.
3) आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2 ः- तक्रारदार व सामनेवाला यांच्यामध्ये खालील बाबी विषयी वाद नाही. तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहे. तक्रारदार यांनी त्यांचे शेतातील विहीरीवर सामनेवाला यांचेकडून विद्युत कनेक्शन घेतलेले आहे. तक्रारदार यांची पत्नी दि.18.06.2013 रोजी विद्युत मोटार चालू करण्यास गेली असता तिला विजेचा शॉक लागून ती मयत झाली आहे.
तक्रारदार यांचे वकील श्री.महाजन यांनी असा युक्तीवाद केला की, सामनेवाला यांनी विद्युत कनेक्शन देतांना हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केला व कमी प्रतीचे साहित्य पुरविले. स्टार्टर व पूर्ण साहित्य चांगल्या दर्जाचे पुरविण्याची जबाबदारी सामनेवाला यांचेवर आहे. सर्व्हिस वायर लिक झाल्यामुळे विद्यूत प्रवाह पेटीत उतरला व त्याचा शॉक लागून तक्रारदार यांची पत्नी मयत झाली. तक्रारदार यांची पत्नी तक्रारदार यांना शेती व्यवसायात मदत करत होती व दरमहा रु.4,500/- तक्रारदार यांचे वाचत होते. तक्रारदार यांचे पत्नीचे वय 48 वर्षे होते. सबब तक्रारदार हे तक्रारीत मागणी केलेली नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे.
सामनेवाला यांचे वकील श्री.गर्जे यांनी असा युक्तीवाद केला की, सामनेवाला यांनी तक्रारदार यांना चांगल्या प्रतीचे साहित्य पुरविलेले होते. तक्रारदार यांच्या निश्काळजीपणामुळे सदरील अपघात घडलेला आहे. तक्रारदार यांनी वितरण पेटी व स्टार्टर यांची योग्य प्रकारे देखभाल केलेली नाही. स्टार्टरचा विद्युत प्रवाह पेटीत उतरला त्यामुळे सदरील घटना घडली आहे, त्यास सर्वस्वी तक्रारदार हे जबाबदार आहे.
वर नमुद केलेला युक्तीवाद लक्षात घेतला. तसेच तक्रारदार व सामनेवाला यांनी दाखल केलेले कागदपत्र व शपथपत्र याचे काळजीपूर्वक निरीक्षण केले असता तक्रारदार यांची पत्नी दि.18.06.2013 रोजी शेतात बसविलेले विद्युत मोटार सुरु करण्यास गेली असता स्टार्टर बसविलेल्या पेटीमध्ये विद्युत प्रवाह उतरलेला होता त्याचा शॉक लागून ती मयत झालेली आहे. सदरील घटनेबाबत तक्रारदार यांनी रिपोर्ट दिलेला आहे. पोलीसांनी फौजदारी प्रक्रिया सहिता कलम 174 अन्वये मरणोत्तर पंचनामा केला आहे. तसेच शवविच्छेदन डॉक्टरांकडून करुन घेतलेले आहे. सदरील अहवालाचे अवलोकन केले असता तक्रारदार यांचे पत्नीचा मृत्यू विद्युत शॉक लागल्यामुळे झाला आहे.
सामनेवाला यांचा युक्तीवाद लक्षात घेतला असता त्यांचा बचाव की, तक्रारदार यांनी वितरण पेटी व स्टार्टरचा योग्य प्रकारे देखभाल केलेली नाही. स्टार्टरचा विद्युत प्रवाह पेटीत उतरला व त्यामुळे तक्रारदार यांची पत्नी मयत झाली. तक्रारदार यांनी सामनेवाला यांना सदरील घटनेबाबत कळविलेले आहे. त्यामुळे सामनेवाला यांच्या अधिका-यांनी घटनास्थळावर जाऊन प्रत्यक्ष काय परिस्थिती आहे त्याचा रिपोर्ट तयार करणे आवश्यक होते. तसेच विद्युत निरीक्षकाकडून प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करुन नेमका कोणत्या कारणामुळे अपघात झाला याचा शोध घेणे गरजेचे होते. वरील बाबीपैकी सामनेवाला यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. सामनेवाला यांनी विद्युत निरीक्षकाचा अहवाल ही हजर केलेला नाही. विद्युत निरीक्षकांना सामनेवाला यांनी पत्र दिल्याचे निदर्शनास येते, तो अहवाल सामनेवाला यांनी प्राप्त केला नाही, अगर या मंचासमोर सादर केला नाही. यावरुन सामनेवाला यांच्या विरुध्द निष्कर्ष काढणे योग्य होईल. सबब या मंचाचे मत की, सामनेवाला यांनी तक्रारदार यांना वीज वितरण पेटीतील स्टार्टर पर्यंत योग्य प्रकारे उपकरणे वापरुन विद्युत प्रवाह देण्यास कसूर केला आहे व सेवेत त्रुटी ठेवलेली आहे. म्हणून तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे.
या मंचासमोर असा प्रश्न उपस्थित होतो की, तक्रारदार हे किती नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे. तक्रारदार यांनी रक्कम रु.10,00,000/- नुकसान भरपाई मागितलेली आहे. तक्रारदार यांच्या मते मयत व्यक्तीचे वय 48 वर्षाचे होते, त्याबाबत तक्रारदार यांनी जन्म तारखेचा पुरावा हजर केलेला नाही. पोलीस पेपर वरुन तक्रारदार यांचे पत्नीचे वय 50 वर्षापेक्षा जास्त होते ही निदर्शनास येते. तक्रारदार यांनी पत्नी घरकाम करुन तक्रारदार यांना शेती कामास मदत करत होती, सदरील बाब लक्षात घेता सर्वसाधारणपणे तक्रारदार यांनी पत्नी दरमहा रु.3,000/- मदत तक्रारदार व कुटूंबियांना करत होती हे गृहीत धरणे योग्य होईल. सर्वसाधारणपणे मयत यांचे वार्षिक उत्पन्न रु.36,000/- धरल्यास मयत हया स्वतःसाठी 1/3 रक्कम खर्च करत होत्या असे गृहीत धरल्यास मयत व्यक्ती प्रत्येक वर्षी रक्कम रु.24,000/- तक्रारदार व कुटूंबियाना मदत करत होत्या असे धरण्यास हरकत नाही. मयत व्यक्तीचे वय 50 वर्षापेक्षा जास्त गृहीत धरल्यास वर नमुद केलेल्या रकमेस दहा वर्षे मल्टीप्लाय लावणे योग्य होईल. सबब एकूण नुकसान भरपाई रु.2,40,000/- तक्रारदार मिळण्यास पात्र आहे. तसेच तक्रारदार यांना झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारीचा खर्च रु.3,000/- मिळण्यास पात्र आहे. सबब मुददा
क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की त्यांनी, तक्रारदार
यांना नुकसान भरपाई रक्कम रु.2,40,000/- (अक्षरी रुपये
दोन लाख, चाळीस हजार फक्त) निकाल कळाल्यापासून
30 दिवसाचे आत दयावेत, सदर रक्कम विहीत मुदतीत न
दिल्यास त्यावर तक्रार दाखल तारखेपासून संपूर्ण रक्कम वसूल
होईपर्यत द.सा.द.शे.9 टक्के व्याज द्यावे.
3) सामनेवाला यांनी तक्रारदार यांना झालेल्या मानसिक व
शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.10,000/- (अक्षरी
रुपये दहा हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.3,000/-
(अक्षरी रुपये तीन हजार फक्त) दयावेत.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील
कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला
परत करावेत.
श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.