निकाल
दिनांक- 26.11.2013
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार शशिकला धोंडीबा बिडवाई यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे,तक्रारदार हे मौजे केळा-पिंपळगांव ता.आष्टी येथे राहतात. तक्रारदार यांचे स्वतःचे घर आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे घर उपयोगासाठी विज पुरवठा घेण्यासाठी अर्ज दिला होता व कोटेशन भरले होते. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना ग्राहक क्र.570404000301 अन्वये घरासाठी विज पुरवठा केला. तक्रारदार यांनी विज पुरवठा घेतल्यापासून दरमहा येणारे देयक भरली आहेत. सामनेवाले यांनी मिटरचे चूकीचे वाचन घेऊन तक्रारदार यांना चूकीचे देयक दिले. तक्रारदार यांनी वारंवार अर्ज देऊनही सामनेवाले यांनी मिटर रिंडीग प्रमाणे देयक न देता जादा युनिट लाऊन देयक दिले आहे. तक्रारदार यांनी विदयूत ग्राहक तक्रार निवारण मंच लातूर यांचेकडे तक्रार दाखल केली. सदरील केसमध्ये विदयूत ग्राहक तक्रार निवारण मंच लातूर यांनी तक्रारदार यांना दिलेल्या विज देयकामध्ये दूरुस्ती करुन नवीन देयक दयावे, दंडाची रक्कम वसूल करु नये अशा प्रकारचे निर्देश दिले. तक्रारदार यांना लावलेला दंड कमी केला गेला परंतु तक्रारदार यांना जाण्यायेण्याचा खर्च दिला नाही. तक्रारदार यांनी विदयूत लोकपाल महाराष्ट्र राज्य नागपूर यांचेकडे अपिल केले. वेळोवेळी तक्रारदार यांना नागपूर येथे जावे लागले. त्यासाठी तक्रारदार यांना खर्च आला. सामनेवाले यांनी वेळेवर बिल दूरुस्त करुन दिले नाही. त्यामुळे तक्रारदार यांना मुदतीत बिल भरता आले नाही. दि.24.01.2012 रोजी तक्रारदार यांना पुर्वसूचना न देता तक्रारदार यांचा विज पुरवठा खंडीत केला व मिटर काढून नेले. तक्रारदार यांना अंधारात रहावे लागत आहे. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक असून सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे. सबब, तक्रारदार यांची विनंती की, तक्रारदार यांना योग्य देयक देण्यात यावे व तक्रारदार यांनी विदयूत ग्राहक तक्रार निवारण मंच लातूर व विज लोकपाल नागपूर यांचेकडे कारवाईसाठी जो खर्च करावा लागला तो देण्याचे निर्देश सामनेवाले यांना देण्यात यावेत.
सामनेवाले क्र.1 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी नि.7 अन्वये लेखी निवेदन दिले. सामनेवाले क्र.2 यांना नोटीसची बजावणी झाली व ते मंचासमोर हजर झाले नाही. त्यामुळे त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला.
सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत ही बाब मान्य केली आहे. सामनेवाले यांचे कथन की, दि.20.01.1989 रोजी तक्रारदार यांना घरगुती वापरासाठी विज पुरवठा करण्यात आला. सदरील विज पुरवठा केल्यामुळे सामनेवाले यांनी मिटर रिंडीग प्रमाणे तक्रारदार यांनी बिले दिलेली आहेत.तक्रारदार यांस मार्च 2005 पासून तक्रारदार यांना मिटर रिंडीग प्रमाणे बिले दिलेली आहेत. तक्रारदार यांना विज देयकाची दि.04..12.2009 नंतर भरली नाही. सामनेवाले यांनी पूढे असे कथन केले आहे की, विदयूत ग्राहक तक्रार निवारण मंच लातूर यांनी दिलेल्या निर्देशाचे सामनेवाले यांनी पालन केलेले आहे. तक्रारदार यांना दूरुस्त बिल देण्यात आलेले आहे.तक्रारदार यांनी विदयुत लोकपाल महाराष्ट्र राज्य नागपूर यांचेकडे अपिल दाखल केले आहे व ते अपिल रदद करण्यात आले आहे. सदरील अपिलामध्ये तक्रारदार यांना कोणताही खर्च देण्यात आलेला नाही. त्यामुळे तक्रारदार यांची मागणी चूकीची आहे. तो खर्च देण्याचे अधिकार सदरील ग्राहक मंचास नाहीत. तक्रारदार यांना दूरुस्त देयक देऊनही त्यांनी विज देयक भरले नाही. त्यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा विज पुरवठा खंडीत केला आहे. सदरील तक्रार चालविण्याचा अधिकार या जिल्हा मंचास नाही. तक्रारदार यांनी तक्रार गैरसमजुतीमुळे सदरील तक्रार दाखल केली आहे. ती तक्रार रदद करण्यात यावी.
तक्रारदार यांनी स्वतःचे शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदार यांनी विदयूत ग्राहक तक्रार निवारण मंच लातूर यांचेकडे येण्याजाण्यासाठी केलेला खर्च मिळावा असा अर्ज दिला आहे. त्यांची झेरॉक्स प्रत दाखल केली आहे. तसेच मा.विज नियामक आयोग नागपूर यांचेकडे दिलेल्या अर्जाची झेरॉक्स प्रत दाखल केली आहे. सामनेवाले क्र.1 यांनी सक्षम अधिकारी यांचे शपथपत्र नि.8 अन्वये दाखल केली आहे.
तक्रारदार हे स्वतः मंचासमोर हजर होऊन यूक्तीवाद केला, सामनेवाले यांचे वकील श्री.गर्जे यांनी यूक्तीवाद केला. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे ही बाब तक्रारदार
यांनी शाबीत केली आहे काय ? नाही.
2. सदरील तक्रार चालविण्याचा अधिकार या मंचास आहे काय ? नाही.
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2 ः-
तक्रारदार यांनी यूक्तीवाद केला की, सामनेवाले यांनी चूकीचे विज देयक दिल्यामुळे तक्रारदार यांना विदयूत ग्राहक तक्रार निवारण मंच लातूर याठिकाणी तक्रार दाखल करावी लागली. त्यांचा निर्णय तक्रारदार यांचे बाजूने लागला. त्या निर्णयाप्रमाणे सामनेवाले यांनी विज देयक दूरुस्त करुन दयावे व आकारलेला दंड रदद करण्यात यावा असे निर्देश देण्यात आले परंतु तक्रारदार यांना जो जाण्यायेण्यसाठी खर्च करावा लागला तो दिला नाही. तो खर्च मिळावा म्हणून तक्रारदार यांनी विज नियामक आयोग नागपूर यांचेकडे अपिल दाखल केले. थोडक्यात तक्रारदार यांचा यूक्तीवाद असा की, त्यांनी वर नमूद केलेल्या केसकामी जो खर्च करावा लागला तो देण्याचे निर्देश या मंचाने सामनेवाले यांना दयावेत. तक्रारदार यांनी असा यूक्तीवाद केला की, सामनेवाले यांनी विज देयक न दिल्यामुळे ते देयक भरु शकले नाहीत. तसेच सामनेवाले यांनी विज पुरवठा खंडीत केला आहे.
सामनेवाले यांचे वकील श्री. गर्जे यांनी यूक्तीवाद केला की, विदयूत ग्राहक तक्रार निवारण मंच लातूर यांनी जो निर्णय दिला आहे त्या निर्णयाचे सामनेवाले यांनी तंतोतत पालन केले आहे. तक्रारदार यांना दूरुस्त बिल देण्यात आलेले आहे. दडाची रक्कम रदद करण्याता आली आहे. तक्रारदार यांनी निर्देशाप्रमाणे बिल देऊनही ते बिल त्यांनी भरले नाही अगर त्यां बिला बाबत काही वाद विदयूत ग्राहक तक्रार निवारण मंच लातूर यांचे समोर केला नाही. तक्रारदार यांनी विज नियामक आयोग यांचेकडे खर्च मिळण्यासाठी जे अपिल केले होते ते रदद करण्यात आले आहे. सामनेवाले यांचे वकिलांनी पूढे असा यूक्तीवाद केला की, निर्देशाप्रमाणे बिल देऊनही तक्रारदार यांनी बिल भरले नाही. म्हणून तक्रारदार यांचा विज पुरवठा खंडीत करण्यात आलेला आहे. तक्रारदार यांनी विदयूत ग्राहक तक्रार निवारण मंच लातूर यांचे निर्देशाप्रमाणे बिल भरण्यास तयार असतील तर विज पुरवठा पूर्ववत करण्यास सामनेवाले हे तयार आहेत. तक्रारदार हे स्वतः निष्काळजी असल्यामुळे त्यांना या मंचासमोर दाद मागता येणार नाही.तसेच तक्रारदार हे विदयूत ग्राहक तक्रार निवारण मंच लातूर यांचेकडे तक्रार दाखल करुन त्यांची तक्रार मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे पून्हा त्यांच प्रकारची तक्रार या ग्राहक मंचापूढे दाखल करता येणार नाही. सामनेवाले यांनी कोणतीही सेवेत त्रूटी ठेवलेली नाही. याउलट तक्रारदार हे निष्काळजीपणे वागले आहेत. सबब, तक्रारदार यांची तक्रार रदद करण्यात यावी.
वर नमूद केलेला यूक्तीवाद लक्षात घेतला तसेच तक्रारदार व सामनेवाले यांचे पूराव्याचे अवलोकन केले. तक्रारदार यांनी त्यांना योग्य बिल दिले जात नाही म्हणून विदयूत ग्राहक तक्रार निवारण मंच लातूर यांचेकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदार यांची मागणी मान्य करण्यात आली व सामनेवाले यांनी नियमाप्रमाणे बिल दयावे व केलेला दंड रदद करावा असे निर्देश देण्यात आले व त्यानुसार सामनेवाले यांनी तक्रारदार बिल दिले आहे. त्या बिला बाबत तक्रारदार यांनी वाद उपस्थित केलेला नाही.अगर संबंधीत बिल या मंचापूढे दाखल केलेले नाही. तक्रारदार यांनी त्यांना खर्च मिळाला नाही म्हणून विज नियामक आयोग यांचेकडे अपिल केले ते अपिलही रदद करण्यात आले आहे. सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे ही बाब तक्रारदार यांनी शाबीत करणे गरजेचे आहे. तक्रारदार यांनी विदयूत ग्राहक तक्रार निवारण मंच लातूर यांचे निर्देशाप्रमाणे बिल देऊनही ते बिल भरले नसेल तर सदरील बाब सेवेत त्रूटी आहे असे म्हणता येणार नाही. सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे ही बाब तक्रारदार यांनी शाबीत केलेली नाही. तक्रारदार हे विज कायदया अंतर्गत निर्मीत सक्षम मंचाकडे तक्रार दाखल केली होती व त्यांचा न्यायनिर्णय झाला आहे. त्या न्यायनिर्णयाप्रमाणे सामनेवाले यांनी वर्तन केल्याचे आढळून येते. तक्रारदार यांनी या मंचापूढे इतर कोणताही दस्ताऐवज हजर केला नाही की ज्या अन्वये सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवी आहे ही बाब शाबीत होते.तक्रारदार यांना विदयूत ग्राहक तक्रार निवारण मंच लातूर तसेच महाराष्ट्र विज नियामक आयोग नागपूर यांनी खर्चा बाबत आदेश दिलेले नाहीत. सदरील बाब या ग्राहक मंचाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. त्यामुळे तक्रारदार यांना करावा लागलेला खर्च देण्याचे निर्देश देता येणार नाहीत. सबब, तक्रारदार यांची तक्रार खारीज करण्यास पात्र आहे असे न्यायमंचाचे मत आहे.
मुददा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात येते.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.
जयंत पारवेकर
लघुलेखक