निकाल
दिनांक- 10.03.2014
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार अशोक लक्ष्मण सिरसट यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी क्लेम नाकारुन सेवेत त्रूटी ठेवली आहे म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे, तक्रारदार यांचे मालकीचे बोलेरो जिप ज्यांचा क्र.एम.एच.23-इ-6371 असा आहे. तक्रारदार यांनी सदरील जिपचा विमा सामनेवाले विमा कंपनी कडे काढला आहे. विम्याचा कालावधी दि.1.3.2011 ते 29.2.2012 असा आहे. दि.29.12.2011 रोजी तक्रारदार यांना माजलगांव येथून उस्मानाबाद येथे जावयाचे होते. तक्रारदार व त्यांचे कूटूंबिय यांनी सदरील जिप मधून प्रवास सूरु केला. जिप धारुरचे घाटात पोहचली असता जिपला अपघात होऊन जिप पलटी झाली व जिप अंबा नदीत पडली. तक्रारदार व त्यांचे पत्नी व मुलगा गंभीररित्या जखमी झाले. तसेच वाहनचालक जमील अहमद अंसारी यांसही मार लागला. तक्रारदार हे शुध्दीवर आल्यानंतर त्यांनी घटनेची फिर्याद शिवाजी नगर पोलिस स्टेशनला दिली व ती तक्रार धारुर पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा केला. अपघातग्रस्त जिप ही श्रीराम अँटोमोबाईल्स बीड यांचेकडे दूरुस्तीसाठी देण्यात आली. श्रीराम अँटोमोबाईल्सचे मालकाने जिप दूरुस्त होऊ शकत नाही ती अहमदनगर येथील शोरुममध्ये दूरुस्तीसाठी न्यावी लागली असे सांगितले. तक्रारदार यांनी जिपचे टोचन करुन ती अहमदनगर शोरुममध्ये नेली. तक्रारदार यांनी त्याकामी रक्कम रु.10,000/- खर्च केला. सामनेवाले यांचेकडे तक्रारदार यांनी भरपाईची मागणी केली. तेव्हा सामनेवाले यांना सर्व्हेअर मार्फत पाहणी करावी लागेल. सव्हेअर यांचे वेतन रक्कम रु.10,000/- जमा करावे लागले असे सांगितले. तक्रारदार यांनी दि.9..4.2013 रोजी सामनेवाले यांचे कार्यालयात रु.10,000/- भरले. दि.18.5.2013 रोजी वाहन दूरुस्त होऊन तक्रारदार यांना वाहनाचा ताबा मिळाला. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे वेळोवेळी जाऊन क्लेम मंजूर करण्या बाबत विनंती केली. तक्रारदार यांनी रु.2,66,100/- चे बिल स्वतः दूरुस्तीसाठी भरले आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना क्लेम बाबत कागदपत्र सादर करा असे कळविले. परंतु दि.18.5.2013 पर्यत वाहन दूरुस्तीचे बिल मिळाले नव्हते. त्यामुळे तक्रारदार हे सदरील बिल सामनेवाले यांना देऊ शकले नाहीत. सामनेवाले यांनी दि.31.8.2012 रोजी तक्रारदार यांचा क्लेम नो क्लेम म्हणून बंद केला व तसेच पत्र दि.28.9.2012 रोजी तक्रारदार यांना देण्यात आले. सामनेवाले यांनी कार्यालयामार्फत सर्व्हेअर श्री.नरेंद्र लोहाडे यांनी वाहनाचे नूकसानीचा सर्व्हे केला व नुकसान भरपाई रक्क्म रु.1,46,000/- असे ठरवले. सदरील नुकसान हे चूकीचे आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना विनंती अर्ज देऊन त्यांचा क्लेम पुन्हा विचारात घ्यावा अशी विनंती केली. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कळविले की, एकदा क्लेम बंद झाल्याहनंतर तो परत चालू करता येत नाही. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे वेळोवेळी मागणी करुनही क्लेम मंजूर केला नाही. तक्रारदार यांनी दि.23.7.2013 रोजी सामनेवाले यांना नोटीस पाठवली. सामनेवाले यांनी दि.8.8.2013 रोजी नोटीसला खोटे उत्तर पाठविले. सबब, तक्रारदार यांनी अशी विनंती केली आहे की, सामनेवाले यांनी दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली आहे म्हणून तक्रारदार यांना वाहन दूरुस्तीसाठी करावा लागलेला खर्च रु.2,66,100/-, वाहन वाहतूकीचा खर्च रु.7,000/-, मानसिक त्रासाबददल रु.20,000/- खर्चापोटी रु.3,000/- असे एकूण रु.2,96,100/- सामनेवाले यांचेकडून देण्याचा आदेश व्हावा.
सामनेवाले विमा कंपनी हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे नि.9 अन्वये दाखल केले आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे वाहनाचा त्यांचेकडे विमा उतरविलेला होता ही बाब मान्य केली आहे. तक्रारदार यांनी तक्रारीत नमूद केलेला वाहन दूरुस्तीचा खर्च सामनेवाले यांनी नाकारला आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे रक्कम रु.10,000/- भरलेले आहे ही बाब नाकारली आहे. सामनेवाले यांचे कथन की, त्यांनी तक्रारदार यांना वेळोवेळी पत्र व नोटीस पाठवून बिल दाखल करण्या बाबत कळविले परंतु तक्रारदार यांनी बिल व कागदपत्रे सादर केली नाहीत. म्हणून सामनेवाले यांनी दि.31.8.2012 रोजी नो क्लेम म्हणून तक्रारदार यांचा क्लेम निकाली काढला. सामनेवाले यांनी सर्व्हेअर श्री.नरेंद्र लोहाडे यांची नियूक्ती करुन वाहनाचे नुकसानी बाबत रिपोर्ट मागवला ही बाब मान्य केली आहे. तसेच सर्व्हेअर यांनी वाहनाचे एकूण नुकसान रक्कम रु.1,46,000/- झाल्या बाबत अहवाल दिला आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना त्यांचा क्लेम पुन्हा फैलावर घ्यावा या बाबत अर्ज दिला होता ही बाब मान्य केली आहे. सर्व्हेअर यांनी बिल चेक रिपोर्ट दि.23.3.2013 रोजी दाखल केला आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना वाहनाचे दूरुस्ती बाबत बिल व कागदपत्र यांची मागणी वेळोवेळी केली परंतु तक्रारदार यांनी ती सादर केली नाही.सबब, तक्रारदार यांचा क्लेम रास्त कारणास्तव नाकारला आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार रदद करावी अशी विनंती केली आहे.
तक्रारदार यांनी नि.3 सोबत गुन्हा पहिली खबर, सामनेवाले यांनी दिलेले तक्रारदार यांचा क्लेम बंद केल्या बाबत पत्र, अपघाताचा घटनास्थळ पंचनामा, तक्रारदार यांनी सामनेवाले यांना दिलेले पत्र, नोटीस, अपघातगस्त वाहनाच्या खर्चाच्या पावत्या, दाखल केलेल्या आहेत. तक्रारदार यांनी स्वतःचे शपथपत्र नि.12 अन्वये दाखल केले आहे. सामनेवाले यांनी दिपक भिवा सोनवने यांचे शपथपत्र नि.10 अन्वये दाखल केले आहे. तसेच नि.11 अन्वये पॉलिसीची प्रत, नो क्लेम लेटर, तक्रारदार यांना वेळोवेळी दिलेली पत्रे, बिल चेक रिपोर्ट, मोटार सर्व्हे रिपोर्ट, स्पॉट सर्व्हे रिपोर्ट दाखल केलेले आहेत.
तक्रारदार यांचे वकील श्री.देशपांडे यांचा यूक्तीवाद ऐकला, सामनेवाले यांचे वकील श्री.कुलकर्णी यांचा युक्तीवाद ऐकला. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा क्लेम नाकारुन सेवेत
त्रुटी ठेवली आहे ही बाब तक्रारदार शाबीत करतात काय ? होय.
2. तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ?
असल्यास किती ? होय.
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2ः-
तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्ये खालील बाबीविषयी वाद नाही. तक्रारदार हे अपघातग्रस्त वाहनाचचे मालक आहेत. तक्रारदार यांनी सदर जिपचा विमा सामनेवाले यांचेकडून घेतलेला होता.तक्रारदार यांचे जिपला अपघात झाला व त्यामध्ये वाहनाचे नुकसान झाले. तक्रारदार यांनी सदरील वाहन दूरुस्त करुन घेतले. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे क्लेम दाखल केला. सामनेवाले यांनी सदरील अपघातग्रस्त वाहनाचे नुकसानीची पाहणी करण्यासाठी सर्व्हेअर यांची नियूक्ती केली व सर्व्हेअर यांनी रिपोर्ट दिला. तसेच सामनेवाले यांना सर्व्हेअर श्री.नरेंद्र लोहाडे यांनी बिल चेक रिपोर्ट दिला.
तक्रारदार व सामनेवाले यांचे कागदपत्र व तक्रारीतील व लेखी कैफियती मधील मजकूर वाचला असता, सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा क्लेम नो क्लेम म्हणून नामंजूर केला आहे. सामनेवाले यांचे कथन की, तक्रारदार यांना वेळोवेळी मागणी करुनही मुदतीत दूरुस्त बिले हजर केली नाहीत. त्यामुळे सदरील क्लेम हा नो क्लेम म्हणून बंद करण्यात आला. तक्रारदार यांचे वकील श्री.देशपांडे यांनी असा युक्तीवाद केला की, सदरील अपघातगस्त वाहनाचे मोठे नुकसान झाले होते. सदरील वाहन दूरुस्तीकामी अहमदनगर येथे नेण्यात आले. सामनेवाले यांचे सर्व्हेअर यांनी सदरील वाहनाची नुकसानीची पाहणी केली व तसा रिपोर्ट सामनेवाले यांना दिला. तक्रारदार यांचे वाहन दूरुस्त होऊन दि.18..3.2013 रोजी तक्रारदार यांना मिळाले. तक्रारदार यांनी दूरुस्त खर्च कामी रु.2,66,100/- खर्च केला. वाहन दूरुस्त होऊन तक्रारदार यांचे ताब्यात मिळाल्याचे अगोदरच व खर्चाचे बिल सामनेवाले यांचेकडे सादर करावयाचे अगोदरच सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा क्लेम नाकारला आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे पत्राना वेळोवेळी उत्तरे दिलेली आहेत व वाहन दूरुस्त झाले नाही व दूरुस्तीचे बिले मिळाले नाही या बाबत कळविले आहे, असे असतानाही सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा क्लेम नो क्लेम म्हणून नाकारला आहे. तक्रारदार यांचे वकिलांनी या मंचाचे लक्ष नि.3 सोबत दाखल केलेल्या दस्तावर वेधले तसेच सामनेवाले यांनी दाखल केलेल्या नि.11 सोबत दाखल केलेल्या दस्तावर वेधले. तक्रारदार यांचे वकिलानी असे कथन केले की, सर्व्हेअर नरेंद्र लोहाडे यांनी दि.10.4.2012दि.28.4.2012, 15.5.2012, 29.5.2012 रोजी अपघातग्रस्त वाहनाची पाहणी केली व रिपोर्ट सामनेवाले यांना दिला.तसेच सर्व्हेअर व लॉस असेंसर श्री.ए.के.कदम यांनी स्पॉट सर्व्हे रिपोर्ट दिला. सर्व्हेअबर श्री.नरेंद्र लोहाडे यांनी दि.24.3.2013 रोजी बिल चेक रिपोर्ट दिला. सदरील बिल चेक रिपोर्ट सामनेवाले यांना मिळाल्याचे अगोदरच सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा क्लेम नाकारला आहे. श्री. नरेंद्र लोहाडे यांनी बिल चेक रिपोर्ट मध्ये तक्रारदार यांचे वाहनाचे रु.1,46,000/- एवढे नुकसान झाल्याचे दर्शवले आहे असे असतानाही व सामनेवाले यांनी वेळोवेळी विनंती करुनही तक्रारदार यांचा क्लेम सामनेवाले यांनी मंजूर केली नाही. सबब, सामनेवाले यांनी दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली आहे. तक्रारदार यांना शारिरीक व मानसिक त्रास झाला आहे. म्हणून तक्रारदार यांनी तक्रारीत मागणी केलेली नुकसान भरपाई मिळावी असा युक्तीवाद केला.
सामनेवाले यांचे वकील श्री.कुलकर्णी यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे वेळोवेळी मागणी करुनही दूरुस्ती बिले दिले नाही व कागदपत्र दिले नाही. त्या कारणास्तव तक्रारदार यांचा क्लेम नो क्लेम म्हणून नाकारण्यात आला. तक्रारदार यांनी सदरील क्लेम पुन्हा फैलावर घेण्यासाठी अर्ज दिला होता परंतु एकदा क्लेम नो क्लेम म्हणून रदद केल्यास पून्हा त्यांचा विचार करतायेत नाही. सामनेवाले यांचे वकिलांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांचे चुकीमुळे सदरील क्लेम नो क्लेम म्हणून रदद केला आहे. सामनेवाले यांनी दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली नाही.
वर नमूद केलेला युक्तीवाद लक्षात घेतला व तक्रारदार व सामनेवाले यांनी दाखल केलेले कागदपत्राचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांनी त्यांचे वाहन दूरुस्तीसाठी अहमदनगर येथे दिले होते ते वाहन तक्रारदार यांना दूरुस्त होऊन दिउ.18..5.2013 रोजी ताब्यात मिळाले. तक्रारदार यांनी सदरील वाहन ताब्यात घेते वेळेस दि.18.5.2013 रोजी दूरुस्त बिल दिले आहे. यावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांचे वाहन दि.18.5.2013 रोजी पावेतो दूरुस्तीसाठी श्रीराम अँटोमोबाईल्स अहमदनगर येथे गेले होते. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा क्लेम नो क्लेम म्हणून दि.10.9.2012 रोजी नाकारला आहे.सदरील दिनांक लक्षात घेता असे निदर्शनास येते की,तक्रारदार यांचा क्लेम रदद केला त्यादिवशी सदरील वाहन दूरुस्त झालेले नव्हते. तक्रारदार यांचा क्लेम नाकारल्यानंतर सदरील वाहनाची दूरुस्त करण्यात आली व त्या बाबत बिले तक्रारदार यांनी भरली आहेत. सदरील वाहन दूरुस्त होऊन तक्रारदार यांचे ताब्यात मिळाल्यानंतर तक्रारदार यांनी त्यांचा क्लेम पुन्हा विचारात घ्यावा या बाबत सामनेवाले यांना कळविले आहे, असे असतानाही सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे क्लेम बाबत विचार केला नाही. सामनेवाले यांचे सर्व्हेअर श्री.नरेंद्र लोहाडे यांनी बिल चेक रिपोर्ट दि.24.3.2013 रारेजी विमा कंपनीला दिलेला आहे म्हणजेच तक्रारदार यांचा क्लेम नाकारल्यानंतर सदरील बिल चेक रिपोर्ट आलेला आहे.
संपूर्ण पुराव्याचा विचार केला असता असे निदर्शनास येते की, सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा क्लेम अतिशिघ्रपणे नाकारला आहे. तक्रारदार यांचे वाहन दूरुस्त झाले किंवा नाही या बाबत सामनेवाले यांनी कोणतीही शहानिशा केलेली दिसत नाही. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना वेळोवेळी कळविले आहे की, सदरील वाहन दूरुस्त होऊन त्यांचे बिल अद्यापही मिळाले नाही असे असतानाही सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा क्लेम नाकारला आहे. सबब, या मंचाचे मते, सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली आहे. तक्रारदार हे वाहन दूरुस्तीसाठी लागलेला खर्च मिळण्यास पात्र आहेत.
तक्रारदार यांचे कथन की, त्यांनी वाहन दुरुस्तीसाठी रक्कम रु.2,66,1009/- खर्च केला आहे. त्या बाबत तक्रारदार यांनी पावत्या हजर केलेल्या आहेत. तक्रारदार यांनी सदरील वाहन दूरुस्त करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी श्रीराम अँटोमोबाईल्स यांना करावा लागल्या या बाबत सविस्तर बिल हजर केलेले नाही. फक्त किती रक्कम श्रीराम अँटोमोबाईल्स यांना दिली आहे, त्यांचे बिल हजर केले आहे. त्यामुळे सामनेवाले यांचे सर्व्हेअरने वाहनाची पाहणी करुन कोणत्या कोणत्या बाबी दुरुस्त करणे गरजेचे होते या बाबत अवलोकन करणे गरजेचे आहे.सर्व्हेअर श्री.नरेंद्र लोहाडे यांनी वाहनाची पाहणी करुन स्पेअर पार्ट, त्यांचा खर्च यांचे सविस्तर रिपोर्ट दिलेला आहे. तसेच श्री.ए.आर.कदम यांनी स्पॉट सर्व्हे रिपोर्ट दिलेला आहे.सर्व्हेअर व लॉस असेंसर यांनी बिल चेक रिपोर्ट सादर केला आहे. त्या बिल चेक रिपोर्ट सोबत नुकसान भरपाईचे बाबत सविस्तर टिपण्णी दिलेली आहे. बिल चेक रिपोर्ट मध्ये लेबर चार्जेस रक्कम रु.60,168/- दर्शविले आहे. तसेच वाहन दूरुस्तीसाठी लागलेल्या पार्टसचा खर्च रु.1,90,880/- दाखवलेला आहे.परंतु बिल चेक रिपोर्ट मध्ये तो खर्च फक्त रु.90,858.50 दर्शवला आहे. वाहनाचे डिप्रीएशन हे 25 टक्के धरलेले आहे. सामनेवाले यांनी दाखल केलेला बिल चेक रिपोर्ट व श्री. नरेंद्र लोहाडे सर्व्हेअर व लॉस असेंसर यांनी दिलेला नुकसान भरपाईचा गोषवारा यांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की,सदरील वाहन दुरुस्तीसाठी लेबर चार्जेस रु.60,168/- लागले व वाहन दूरुस्तीसाठी पार्टस खरेदीसाठी रु.1,90,880/- दर्शवले आहे. सर्व्हेअर यांनी रु.1,31,245/- डिप्रिएशन व्हॅल्यू दर्शवली आहे ती कोणत्या आधारे दर्शवली आहे हे सामनेवाले यांनी शाबीत केलेले नाही. तसेच सामनेवाले यांनी रु.1,46,000/- नुकसान झाले यांचा जो बिल चेक रिपोर्ट सादर केला आहे. त्यांचा विचार करता व त्यांचे सर्व्हेअरने नुकसान भरपाईचा गोषवारा देताना दिलेले आकडे यांचा ताळमेळ बसत नाहीत. बिल चेक रिपोर्ट मध्ये पार्टस खरेदी फक्त रु.90,858/- दर्शवली आहे प्रत्यक्षात नुकसान भरपाईच्या गोषवारा मध्ये ती रक्कम रु.1,90,858/- दर्शवली आहे. सदरील बाबीचा विचार करता तक्रारदार हे रु.2,51,068/- वाहनाचा दूरुस्तीचा खर्च मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. तक्रारदार यांना सदरील तक्रार दाखल करावी लागली त्यामुळे मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला म्हणून शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु.3,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/- मिळण्यास पात्र आहेत.
मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2) सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदार यांना वाहनाचे
दुरुस्ती खर्चा बददल रक्कम रु.2,51,068/- निकाल
कळाल्यापासून 30 दिवसांचे आंत दयावेत, न दिल्यास तक्रार
दाखल दि.13.09.2013 पासून पुर्ण रक्कम वसुल होईलपर्यत
द.सा.द.शे 9 टक्के व्याज दराने संपूर्ण रक्कम दयावी.
3) सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदार यांना शारिरीक
व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी
रककम रु.1,000/- दयावेत.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड
जयंत पारवेकर
लघुलेखक