निकाल
दिनांक- 17.11.2014
(द्वारा- श्रीमती मजुंषा चितलांगे, प्रभारी अध्यक्ष)
तक्रारदार ओमप्रकाश रामलाल सारडा यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी विमा पॉलीसीची रक्कम न देऊन सेवेत त्रुटी ठेवली आहे, म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे, तक्रारदार हे स्वतःचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी 17 वर्षापासून नाथ ऑईल मिल या नावाने सरकीपासून तेल बनविण्याचा व्यवसाय करत आहे. तक्रारदार यांचे नाथ ऑईल मिल या नावाने व्यवसाय आहे. सदर व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल म्हणजेच सरकीच्या बियांची संकलन करुन त्याची साठवणूक करतात. सदर साठवणूक ही रमेश सारडा यांच्या नावाच्या गोडाऊनमध्ये प्लॉट नं.सी-12 एम.आय.डी.सी.बीड येथे केली आहे. सरकी संकलनासाठी तक्रारदार यांनी डी.सी.बी.एल.या बँकेचे गोडाऊन लिमिट घेतलेली आहे.
तक्रारदार यांनी व्यवसायासाठी सामनेवाला यांचेकडून रक्कम रु.2,31,00,000/- चा विमा काढलेला होता, त्याचा पॉलीसी नं.16040211110100000373 सदर पॉलीसी कालावधी हा दि.15.07.2011 ते 14.10.2011 असा होता. पॉलीसीचा विमा हप्ता म्हणून रक्कम रु.17,032/- भरलेला आहे. सबब तक्रारदार हे सामनेवाला यांच ग्राहक आहे. सदर पॉलीसी अंतर्गत सामनेवाला यांनी Spontaneous Combustion (आपोआप जळणे) व Earthquake (Fire and shock) (भुकंपामूळे) साठवलेल्या सरकी बियांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले आहे. दि.26.08.2011 रोजी तक्रारदार हे सदर सरकी बियांची डिलेव्हरी घेण्यासाठी गोडाऊनमध्ये गेले असता सरकीमधून धूर येत असल्याचे तक्रारदाराचे निदर्शनास आले. लगेचच तक्रारदार यांनी सदरची बाब स्थानिक बँक अधिकारी व सामनेवाला इन्शुरन्स कंपनी यांना दिली. सरकी ही स्टॉक हिटेड झाल्यामुळे कार्बन झाला. त्यामुळे सरकी बियामधील ऑईल नाहीसे झाले व त्याची पेंड देखील बनवता आली नाही.
सदर दुर्घटना ही वातावरणातील बदलामुळे आपोआप घडलेली आहे. त्यामुळे तक्रारदाराचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी दि.29.08.2011 रोजी तहसिलदार बीड यांना अर्ज देऊन दुर्घटनांचा पंचनामा करण्याची विनंती केली होती, त्यानुसार दि.31.08.2011 रोजी मंडळ अधिकारी बीड तर्फे पिंगळे यांनी पंचासमक्ष पंचनामा केला, सदर पंचनाम्यानुसार गोडाऊनमध्ये विद्युत कनेक्शन नाही. सरकी बॅग हिटेड झाल्याने वातावरणातील बदलामुळे सदरील घटना घडली आहे असे सांगितले. त्यामुळे तक्रारदार यांचे रक्कम रु.13,52,890/- चे नुकसान झाले असे दिसून येते.
तक्रारदार यांनी सामनेवाला यांना सदर रकमेची माहिती दिल्यानंतर सामनेवाला यांनी त्यांचे सर्वेअर रॉबर्ट रॉड्रीग्ज अँड लॉस असेसर यांनी तक्रारदाराची दुर्घटनाग्रस्त गोडाऊनची पाहणी केली. तदनंतर तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे आवश्यक सर्व कागदपत्रासह विमा दावा दाखल केलेला आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे विम्याची रक्कम मिळण्यासाठी अनेक वेळा मागणी केली परंतू सामनेवाला यांनी तक्रारदारास विमा रक्कम देण्याचे टाळाटाळ केलेली आहे. सामनेवाला यांनी दि.27.09.2012 रोजी तक्रारदार यांना विमा दावा फेटाळल्याबाबत कळविले आहे. तसेच सदर विमा पॉलीसी अंतर्गत सरकीचे नुकसान येत नाही असे कळवले आहे. तसेच तक्रारदार यांनी योग्य ती काळजी घेतली नसल्याचे सामनेवाला यांनी नमुद केले आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे सर्वेअर रिपोर्ट बददल मागणी केली असता सदर रिपोर्ट देण्याचे टाळाटाळ केले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारास विम्याची रक्कम न दिल्यामुळे उद्योगधंदा बंद ठेवावा लागला. त्यामुळे दरमहिना रु.50,000/- प्रमाणे रक्कम रु.4,00,000/- चे नुकसान झाले आहे. सामनेवाला यांनी चुकीचे कारण दर्शवून तक्रारदाराचा विमा दावा नाकारला आहे. त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारास देण्याच्या सेवेमध्ये त्रुटी ठेवली आहे. तक्रारदारास विम्याची रक्कम न मिळाल्यामुळे शारिरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. सबब तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून प्रत्यक्ष झालेले नुकसान रु.13,52,890/- कारखाना बंद असल्यामुळे झालेले नुकसान रु.4,00,000/-, शारिरिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.1,00,000/-, तक्रारीचा खर्च रु.5,000/- अशी मागणी केलेली आहे. सबब तक्रारदार यांची तक्रार मंजूर करण्यात यावी. सामनेवाला यांचेकडून एकूण रक्कम रु.18,57,000/- मिळण्याची विनंती केलेली आहे.
सामनेवाला न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी निशाणी क्र.12 अन्वये आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. सामनेवाला यांचे कथनेनुसार तक्रारदार यांनी विमा पॉलीसी घेतली ही बाब मान्य केली आहे. तसेच त्यासाठी विमा हप्ता भरला आहे ही बाब मान्य आहे. सामनेवाला यांनी तक्रारीतील उर्वरीत मजकूर स्पष्टपणे नाकारलेला आहे. सामनेवाला यांचे कथनेनुसार तक्रारदार यांनी साठविलेली सरकीची योग्य ती काळजी घेतली नसल्याचे नमुद केले आहे. तसेच मोठया प्रमाणात सदरील गोडाऊनमध्ये सरकी बियांच्या बँग ठेवल्या आहे व त्याची योग्य काळजी घेतली नाही असे नमुद केले आहे. तसेच झालेल्या सरकीचे नुकसान हे सदर विमा पॉलीसी अंतर्गत येत नाही. आपोआप लागलेल्या आगीबाबत झालेले नुकसान सदर पॉलीसी अंतर्गत येत नाही. सबब तक्रारदार यांचा विमा दावा सामनेवाला यांनी योग्य व वाजवी कारणासाठी नामंजूर केलेला आहे. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत कोणताही कसूर केला नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात यावी.
तक्रारदार यांनी पुराव्याकामी स्वतःचे शपथपत्र निशाणी क्र.14 वर दाखल केलेले आहे. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत निशाणी क्र.3 वर कागदपत्र दाखल केलेले आहे. सामनेवाला यांनी श्री.एस.एस.मखरे यांचे शपथपत्र निशाणी क्र.13 वर दाखल केले आहे. तक्रारदार यांचे वकील श्री.कुलकर्णी आणि सामनेवाला यांचे वकील श्री.महाजन यांचा युक्तीवाद ऐकला. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1) सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा विमा क्लेम
नाकारुन सेवेत त्रुटी ठेवली आहे, ही बाब
तक्रारदार यांनी सिध्द केली काय ? होय.
2) तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास
पात्र आहेत काय? होय.
3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2ः- तक्रारदार यांनी सामनेवाला विमा कंपनीकडे तक्रारीत नमुद केलेली विमा पॉलीसी काढलेली आहे ही बाब सामनेवाला यांना मान्य आहे. तक्रारदार यांचे नाथ आईल मिल या नावाने व्यवसाय आहे ही बाब मान्य आहे. तक्रारदार यांनी दि.15.07.2011 ते 14.10.2011 या कालावधीत विमा काढला होता व त्यासाठी विम्याच्या हप्त्याची रक्कम म्हणून रु.17,032/- भरली होती ही बाब सामनेवाला यांना मान्य आहे. दि.26.08.2011 रोजी तक्रारदार यांच्या गोडाऊन मधील सरकीत अचानक धूर येऊ लागल्यामुळे सदर सरकी जळाली याबाबत वाद नाही. तदनंतर तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे दि.26.08.2011 रोजी अग्नी विमा दावा अर्ज रक्कम मिळणेकामी दाखल केला होता, परंतू सामनेवाला यांनी सदरचा विमा दावा हा दि.27.09.2012 रोजी पत्र देऊन नाकारला आहे असे तक्रारदारास कळवले आहे. दावा नाकारल्याचे कारण तक्रारदार यांनी साठवलेल्या सरकीची योग्य काळजी घेतली नसल्यामुळे व सरकीस लागलेली आग ही पॉलीसीच्या अंतर्गत येत नसल्याचे नमुद केलेले आहे. तसेच तक्रारदार यांचा दावा हा Spontaneous Combustion या अंतर्गत येत नाही, म्हणून तक्रारदार यांचा दावा नाकारला आहे.
तक्रारदार यांचे वकील श्री.कुलकर्णी यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांच्या गोडाऊनमधील सरकीस आग ही अचानक लागलेली आहे. तक्रारदार हे सदर सरकीची डिलेव्हरी घेण्यासाठी गेले असता सदर आग दिसून आली. तसेच सामनेवाला यांनी सदरील आग ही कोणत्या कारणामुळे लागली आहे या बाबत कोणताही विश्वसनीय पुरावा मंचासमोर आणला नाही. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रावर मंचाचे लक्ष वेधले. तक्रारदार यांनी सदर कागदपत्रात दाखल केलेला पंचनामा यावर लक्ष वेधले, त्यामध्ये सरकीच्या गोडाऊनमध्ये आग लागण्याचे कारण म्हणजे सरकी बॅग ही हिटेड झाल्याने वातावरणातील बदलामुळे सदरील घटना घडली आहे असे निदर्शनास येते. त्यामुळे आग लागली असावी ही बाब नमुद केलेली आहे. तक्रारदार यांचे वकीलांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांचे रक्कम रु.13,52,890/- चे नुकसान झालेले आहे, ती नुकसान भरपाई मिळण्यास तक्रारदार हे पात्र आहे. सामनेवाला यांनी तक्रारदाराचा क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवली आहे. सबब तक्रारदार यांची तक्रार मंजूर करण्यात यावी.
सामनेवाला यांचे वकील श्री.महाजन यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांनी गोडाऊनमध्ये ठेवलेल्या सरकी बियांची योग्य प्रकारे काळजी घेतली नाही व मोठया प्रमाणात अशी सरकी साठवून ठेवलेली आहे. तक्रारदार यांच्या सरकीस लागलेली आग ही विमा पॉलीसी अंतर्गत येत नाही. तक्रारदार यांचा क्लेम हा योग्य कारणासाठी नाकारलेला आहे. सबब तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही. तसेच सामनेवाला यांनी तक्रारदारास देण्याच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे असे म्हणता येणार नाही.
तक्रारदार व सामनेवाला यांचे वकीलांनी केलेला युक्तीवाद लक्षात घेतला. तसेच तक्रारदार व सामनेवाला यांचे वकीलांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्राचे अवलोकन केले. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून STANDARD FIRE AND SPECIAL PERILS POLICY घेतली आहे. सदर पॉलीसीमध्ये रक्कम रु.2,31,00,000/- पर्यंत नुकसान भरपाई देण्याचे नमुद केलेले आहे. सबब या मंचासमोर सामनेवाला यांनी तक्रारदाराचा नाकारलेला क्लेम हा योग्य व वाजवी आहे का हे पाहणे गरजेचे आहे. तक्रारदार यांचे गोडाऊनमधील सरकीला अचानक आग लागली, सदरील आग ही सरकी बॅग हिटेड झाल्याने व वातावरणातील बदलामुळे लागलेली आहे असे कथन केले आहे. सदरील बाब ही तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पंचनाम्यावरुन निदर्शनास येते.
सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा विमा दावा नाकारताना तक्रारदार यांच्या सरकीस लागलेली आग ही पॉलीसी अंतर्गत येत नाही असे नमुद केले आहे. सदरील विमा करार हा तक्रारदार व सामनेवाला यांचे विश्वासावर झालेला असतो. विमा कंपनीने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने तक्रारदारास पॉलीसीत नमुद केलेल्या शर्ती व अटी सांगावयास हव्यात. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून STANDARD FIRE AND SPECIAL PERILS POLICY काढलेली आहे. ती पॉलीसी काढत असताना सामनेवाला यांनी तक्रारदारास सदर पॉलीसीत योग्य बाबी बाबत सांगणे गरजेचे आहे. सामनेवाला यांनी गोडाऊनमध्ये ठेवलेली सरकी बियाची तक्रारदाराने योग्य प्रमाणे काळजी घेतली नाही. पॉलीसीच्या अंतर्गत सदर घटना अंतर्भूत नाही. या कारणास्तव तक्रारदाराचा क्लेम नाकारणे योग्य व वाजवी नाही. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे कोणतीही हानी झाल्यास किंवा आग लागल्यास झालेली नुकसान भरपाई मिळणे कामी विमा पॉलीसी काढलेली आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारास पॉलीसी काढतेवेळेस सर्व बाबींची जाणीव करुन देणे गरजेचे आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेली पॉलीसी याचे अवलोकन केले असता सदर पॉलीसीमध्ये The insurance under this policy is subject to.
Warranties : W19- Warranty for Storage of Cat l goods
Endorsements : Endorsement7 – Spontaneous Combustion Endorsement9 – Earthquake (Fire and Shock)
Clauses : Clause1 – Agreed bank Clause Clause3 – Designation of property clause, Clause4 – Reinstatement value policy clause, Clause5 – Local Authorities clause.
Special Conditions : AS PER POLICY.
वर नमुद केल्याप्रमाणे पॉलीसी आहे. तक्रारदार व सामनेवाला यांच्यामध्ये पॉलीसीत करार झालेला आहे तो एकमेकांच्या विश्वासावर आहे. सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्या सरकी बियाच्या झालेल्या आगीचे नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी घेतली होती, त्याकामी तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे विमा हप्ता भरलेला आहे. सबब सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवली आहे.
यावरुन तक्रारदार हे किती नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे हे ठरविणे गरजेचे आहे. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेले कागदपत्र यावर लक्ष वेधले असता असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांनी घटनेच्या माहिती बददल पोलीसांनी माहिती अर्ज केलेला नाही. तसेच सामनेवाला यांचे सर्वेअर यांनी प्रत्यक्ष पाहणी केलेली होती त्यांचा रिपोर्ट सुध्दा दाखल केलेला नाही. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पंचनाम्यानुसार तक्रारदाराच्या दहा हजार बॅग व तीन हजार पेंड असे निकामी झालेले आहे. त्यामुळे तक्रारदार यांचे रु.13,52,890/- एवढे नुकसान झालेले आहे. त्याबाबतची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केलेली आहे. सामनेवाला यांचे वकीलांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांनी सरकी बियाची साठवणूकीची योग्य प्रकारे काळजी घेतली नाही. तसेच सदर जळीत सरकी बॅग हया विमा पॉलीसीच्या अंतर्गत येत नाही. तक्रारदार हे म्हणतात तेवढे नुकसान झालेले नाही. तसेच त्याबाबतचा स्पष्ट उल्लेख नमुद केलेला नाही.
या मंचाने तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्राचे काळजीपूर्वक अवलोकन केले असता या मंचाचे मत की, तक्रारदार यांनी व सामनेवाला यांनी सर्वेअरच्या घटनास्थळ पडताळणी बाबतचा रिपोर्ट दाखल केलेला नाही जेणेकरुन तक्रारदार यांचे किती नुकसान झाले ही बाब स्पष्ट झाली असती. तसेच तक्रारदार यांनी सदर घटनेची माहिती पोलीसात दिलेली नाही. स्थानिक अघिका-यास माहिती दिली आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पंचनाम्याचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, सदर पंचनाम्यामध्ये तक्रारदार यांचे गोडाऊनमध्ये किती माल होता, किती माल जळाला, आणि किती माल योग्य प्रमाणे वापरण्यात आला आहे याबाबत सविस्तर अहवाल दिला नाही. तसेच तक्रारदार यांनी सुध्दा सदर मालाबाबतचा कोणताही स्टॉक रजिस्टर या मंचासमोर दाखल केलेला नाही. तक्रारदार यांनी कारखाना बंद असल्यामुळे झालेल्या नुकसानीबाबत कोणताही ठोस पुरावा म्हणून कागदपत्र दाखल केलेले नाही. सबब सदर नुकसानी हे ग्राहय धरता येणार नाही. तक्रारदार यांचा क्लेम हा Spontaneous Combustion यात अंतर्भूत आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन या मंचाचे असे मत आहे की, सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा विमा क्लेम नाकारुन व विमा रक्कम न देऊन सेवा देण्यात त्रुटी ठेवली आहे. मंचाचे मते तक्रारदार हे विमा दाव्याची एकूण रक्कम रु.10,00,000/- मिळण्यास पात्र आहे. तसेच शारिरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीचा खर्च रु.2,000/- मिळण्यास पात्र आहे. सबब मुददा क्र.1
व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदार यांना
सरकीच्या नुकसान भरपाई बद्दल विमा रक्कम रु.10,00,000/-
(अक्षरी रु.दहा लाख) निकाल कळाल्यापासून 30 दिवसाचे आत
द्यावी. सदर रक्कम विहीत मुदतीत न दिल्यास सदर रकमेवर
तक्रार दाखल दिनांकापासून संपूर्ण रक्कम वसूल होईपावेतो
द.सा.द.शे.10 टक्के व्याज दराने रक्कम द्यावी.
3) सामनेवाला यांनी तक्रारदार यांना झालेल्या मानसिक
व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.5,000/- (अक्षरी
रुपये पाच हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/-
(अक्षरी रुपये दोन हजार) दयावेत.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील
कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला
परत करावेत.
श्री.रविंद्र राठोडकर, श्रीमती मंजूषा चितलांगे,
सदस्य प्रभारी अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड