जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 134/2021. तक्रार नोंदणी दिनांक : 28/06/2021. तक्रार आदेश दिनांक : 19/04/2024.
कालावधी : 02 वर्षे 09 महिने 22 दिवस
सूर्यकांत पि. विठ्ठल कुंभार, वय 46 वर्षे,
व्यवसाय : शेती, रा. हलगरा, ता. निलंगा, जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) व्यवस्थापक, युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कं. लि.,
विभागीय कार्यालय नं. 202, दुसरा मजला, विनर्स कोर्ट,
झेड के वरती, लुल्ला नगर, सहाने सुजान पार्क, पुणे - 411 040.
(2) व्यवस्थापक, जयका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा. लि., दुसरा मजला,
जयका बिल्डींग, कमर्शिअल रोड, सिव्हील लाईन्स्, नागपूर - 440 001.
(3) तालुका कृषि अधिकारी, कृषि कार्यालय, निलंगा, जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्रीमती रेखा जाधव, सदस्य
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- ए.एम.के. पटेल
विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकरिता विधिज्ञ :- एस. व्ही. शास्त्री
विरुध्द पक्ष क्र. 2 :- अनुपस्थित / एकतर्फा
विरुध्द पक्ष क्र.3 :- स्वत:
आदेश
श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, महाराष्ट्र शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेखाली दि.10/12/2019 ते 9/12/2020 कालावधीकरिता विरुध्द पक्ष क्र.1 (यापुढे "विमा कंपनी") यांच्याकडे राज्यातील शेतक-यांना विमा संरक्षण दिलेले होते. विरुध्द पक्ष क्र.2 (यापुढे "जयका इन्शुरन्स") हे विमा योजनेचे सल्लागार असून विरुध्द पक्ष क्र.3 (यापुढे "तालुका कृषि अधिकारी") हे विमा योजनेची अंमलबजावणी करणारे शासकीय अधिकारी आहेत.
(2) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, त्यांच्या आई मयत ताराबाई उर्फ नारायणबाई सूर्यकांत कुंभार (यापुढे "मयत ताराबाई") यांच्या नांवे मौ. हलगरा, ता. निलंगा, जि. लातूर येथे गट क्र. 61/क मध्ये एकूण सामाईक 1 हे. 83 आर. शेतजमीन क्षेत्र होते. दि.21/6/2020 रोजी मयत ताराबाई यांचा विहिरीमध्ये पडल्यामुळे बुडून मृत्यू झाला. घटनेबद्दल पोलीस ठाणे, औराद शहाजनी, ता. निलंगा येथे आकस्मिक मृत्यू क्र. 12/2020 अन्वये नोंद करण्यात आली. पोलीस यंत्रणेद्वारे घटनास्थळ पंचनामा व त्यानंतर शवचिकित्सा करण्यात आलेली आहे.
(3) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन आहे की, मयत ताराबाई शेतकरी होत्या. तसेच विमा योजनेंतर्गत त्या लाभार्थी होत्या. त्यांचे वारस असल्यामुळे विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी तक्रारकर्ता तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे विमा दावा प्रपत्रासह आवश्यक कागदपत्रे सादर केले. त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, लातूर यांच्यामार्फत विमा प्रस्ताव जयका इन्शुरन्स व विमा कंपनीकडे पाठविण्यात आला. तक्रारकर्ता यांनी विमा दाव्यासंबंधी त्रुटीच्या कागदपत्राची पूर्तता केली; मात्र त्यांचा विमा दावा मंजूर न करता प्रलंबीत ठेवण्यात आला आणि सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे. उक्त वादकथनांच्या अनुषंगाने विमा रक्कम रु.2,00,000/- देण्याचा; शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.10,000/- व तक्रार खर्च रु.5,000/- व्याजासह देण्यासंबंधी विमा कंपनी, जयका इन्शुरन्स व तालुका कृषि अधिकारी यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ती यांनी केलेली आहे.
(4) तक्रारकर्ता यांच्या ग्राहक तक्रारीकरिता विमा कंपनीने लेखी निवेदनपत्र दाखल केले. त्यांनी ग्राहक तक्रारीतील बहुतांश कथने अमान्य केले आहेत. विमा कंपनीचे कथन असे की, मयत ताराबाई यांच्या अन्य वारसांच्या नांवाने फेरफार मंजूर झालेला असल्यामुळे मयतांचे अन्य वारसदारांना प्रकरणामध्ये ‘तक्रारकर्ता’ केलेले नाही आणि ग्राहक तक्रार रद्द करणे योग्य आहे. विमा कंपनीचे पुढे कथन असे की, त्यांच्याकडे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर दि.5/5/2021 रोजी दाव्याच्या त्रुटीची पूर्तता करण्यासंबंधी तक्रारकर्ता यांना पत्र पाठवून काही कागदपत्रांची मागणी केली. तसेच त्या संदर्भात त्यांनी तालुका कृषि अधिकारी यांना दि.6/5/2021 रोजी ई-मेल पाठविला. परंतु तक्रारकर्ता यांनी त्यांच्या पत्रानुसार पूर्तता केली नसल्यामुळे त्या कारणास्तव दावा प्रलंबीत आहे. योग्य कारणास्तव व कागदपत्रांमुळे दावा प्रलंबीत ठेवण्याचे कृत्य सेवेतील त्रुटी होत नाही. जोपर्यंत तक्रारकर्ता यांच्याकडून कागदपत्रांची पूर्तता करण्यात येत नाही, तोपर्यंत विमा प्रस्तावासंबंधी योग्य निर्णय घेता येत नाही. त्यामुळे तक्रारकर्ता हे विमा रक्कम, व्याज व नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाहीत. अंतिमत: ग्राहक तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती विमा कंपनीतर्फे करण्यात आलेली आहे.
(5) जयका इन्शुरन्स हे जिल्हा आयोगापुढे अनुपस्थित आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले.
(6) तालुका कृषि अधिकारी यांनी अभिलेखावर लेखी निवेदनपत्र दाखल केले आहे. त्यांच्या कथनानुसार तक्रारकर्ता यांनी दि.7/9/2020 रोजी त्यांच्याकडे अपघातग्रस्त ताराबाई विठ्ठल कुंभार यांचा प्रस्ताव सादर केला आणि दि.9/9/2020 रोजी मंजुरीसाठी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, लातूर यांच्याकडे पाठविला. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी व विमा कंपनीने त्रुटीची पूर्तता करण्याबद्दल कळविले असता तक्रारकर्ता यांच्याकडून नाहरकत प्रमाणपत्र व पोलीस अंतिम अहवाल अप्राप्त आहे. विमा कंपनीकडून दावा प्रस्ताव प्रलंबीत आहे.
(7) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विमा कंपनी व तालुका कृषि अधिकारी यांचे लेखी निवेदनपत्र, अभिलेखावर दाखल कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते ? होय
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(8) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र. 1 ते 3 एकमेकांशी पुरक व संलग्न असल्यामुळे एकत्र विवेचन करण्यात येते. तक्रारकर्ता यांनी अभिलेखावर गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजनेसंबंधी दि.19 सप्टेंबर, 2019 रोजीचा शासन निर्णय दाखल केलेला आहे. शासन निर्णयाचे अवलोकन केले असता विमा कंपनीतर्फे महाराष्ट्र राज्यातील शेतक-यांना अपघाती विमा संरक्षण दिल्याचे निदर्शनास येते. अभिलेखावर दाखल 7/12 उता-यांचे अवलोकन केले असता गाव : हलगरा, ता. निलंगा, जि. लातूर येथे भूमापन क्रमांक व उपविभाग : 61/क मध्ये 1 हे. 83 आर. क्षेत्राकरिता मयत ताराबाई यांचे नांव भोगवाटदार होत्या. त्या अनुषंगाने मयत ताराबाई यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेखाली विमा संरक्षण लागू होते आणि त्या विमा योजनेच्या लाभार्थी असल्याचे सिध्द होते.
(9) तक्रारकर्ता यांनी अभिलेखावर अप्राकृतिक मृत्यूचे नोंदपत्र, पोलीस घटनास्थळ पंचनामा, मृत्यू प्रमाणपत्र, मरणोत्तर पंचनामा व शवचिकित्सा अहवाल इ. कागदपत्रे दाखल केलेले आहेत. त्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता मयत ताराबाई यांचा विहिरीमध्ये पडून पाण्यामध्ये बुडाल्यामुळे मृत्यू झाल्याचे दिसून येते.
(10) मयत ताराबाई यांच्या मृत्यूनंतर विमा रक्कम मिळण्याकरिता तक्रारकर्ती यांनी तालुका कृषि अधिकारी यांच्यामार्फत विमा कंपनीकडे विमा दावा दाखल केला, ही मान्यस्थिती आहे. असे दिसते की, जयका इन्शुरन्स व विमा कंपनीने विमा दाव्यामध्ये त्रुटीयुक्त कागदपत्रांची पूर्तता करण्याबद्दल कळविले आणि त्याप्रमाणे बँक पासबूक सत्यप्रत, 6-ड (फेरफार), 6-क (वारस प्रमाणपत्र), दावा प्रपत्र क्र.1 इ. कागदपत्रांची पूर्तता करण्यात आलेली आहे. विमा कंपनीच्या दि.5/5/2021 रोजीच्या पत्राद्वारे पोलीस अंतिम अहवाल व विमा रक्कम तक्रारकर्ता यांच्या नांवे जमा करण्याबद्दल नाहरकत प्रमाणपत्र दाखल करण्याचे निर्देशीत केले आहे.
(11) अभिलेखावर दाखल शासन निर्णयाचे अवलोकन केले असता दावा अर्जासोबत 7/12 उतारा, मृत्यू दाखला, प्रथम माहिती अहवाल, घटनास्थळ पंचनामा, वयाचा दाखला, इन्क्वेस्ट पंचनामा व शवचिकित्सा अहवाल दाखल करणे आवश्यक आहेत. सकृतदर्शनी, तक्रारकर्ता यांनी विमा कंपनीकडे उक्त कागदपत्रांची पूर्तता केल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे विमा कंपनीद्वारे पोलीस अंतिम अहवालाची केलेली मागणी अनावश्यक असून त्या कागदपत्राच्या मागणीकरिता उचित कारण दिसत नाही.
(12) निर्विवादपणे, तक्रारकर्ता यांचा विमा दावा विमा कंपनीकडे निर्णयाधीन व प्रलंबीत आहे. विमा कंपनीने अनावश्यक कागदपत्रांचे कारण पुढे करुन विमा रक्कम देण्याकरिता दर्शविलेली असमर्थता त्यांच्या सेवेतील त्रुटी ठरते. आमच्या मते, मयत ताराबाई यांच्या अपघाती मृत्यूनंतर विमा योजनेनुसार रु.2,00,000/- विमा रक्कम मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहेत. विमा रकमेवर व्याज मिळण्यासंबंधी तक्रारकर्ता यांची विनंती पाहता ग्राहक तक्रार दाखल तारखेपासून विमा रक्कम द.सा.द.शे. 6 टक्के दराने देण्याचा आदेश करणे न्यायोचित ठरेल.
(13) अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता मयत ताराबाई यांच्या पश्चात त्यांचे पती, एक मुलगी व तीन मुले वारस असल्याचे दिसून येते. विमा रक्कम मिळण्याकरिता केवळ तक्रारकर्ता यांनी ग्राहक तक्रार दाखल केलेली आहे. अन्य वारसांनी अभिलेखावर दाखल केलेल्या संमतीपत्रामध्ये तक्रारकर्ता यांना प्रकरण दाखल करुन विमा लाभाची रक्कम मिळविण्यास संपूर्ण संमती असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हे विमा रक्कम मिळविण्याकरिता पात्र ठरतात.
(14) तक्रारकर्ता यांनी मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.10,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करताना त्या–त्या परिस्थितीवर गृहीतक आधारीत असतात. असे दिसते की, विमा कंपनीने दावा प्रलंबीत ठेवल्यामुळे तक्रारकर्ता यांना पाठपुरावा करावा लागलेला आहे. शिवाय, तक्रारकर्ता यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, प्रकरण शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. तसेच ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. त्यामुळे तक्रारकर्ता यांना मानसिक व शारीरिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. योग्य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत येत आहोत.
(15) जयका इन्शुरन्स हे विमा सल्लागार आहेत आणि तालुका कृषि अधिकारी हे शासकीय यंत्रणेचा भाग आहेत. वाद-तथ्ये व दाखल पुराव्यानुसार त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी असल्याचे सिध्द होत नाही.
(16) उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीने तक्रारकर्ता यांना रु.2,00,000/- (रुपये दोन लक्ष फक्त) विमा रक्कम द्यावी.
तसेच, उक्त विमा रकमेवर दि.12/7/2021 पासून संपूर्ण विमा रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज द्यावे.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीने तक्रारकर्ता यांना मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चापोटी रु.3,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीने आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाचे आत उक्त आदेशाची अंमलबजावणी करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-