निकाल
दिनांक- 02.06.2014
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी सदोष टीश्यू कल्चर केळीचे रोपाचा पुरवठा करुन सेवेत त्रुटी ठेवली आहे म्हणून नुकसान भरपाई मिळण्यासाठी तक्रार दाखल केली आहे..
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे, सामनेवाले क्र.1 हे टिश्यू कल्चर केळीचे उत्पादन करणारी कंपनी आहे. सामनेवाले क्र.1 हे टीश्यू कल्चर केळीची खरेदी उत्पादक परभणी येथील लॅब मधून सेंकड हॉडनिंग करुन सामनेवाले क्र.1 यांचे प्रतिनिधी राजाराम मूंडे यांचेमार्फत पुरवठा करतात. दि.25.9.2011 रोजी सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे शेतात रोपाचा पुरवठा केला. तक्रारदार यांनी टिश्यू कल्चर केळीची रोपे 1800 खरेदी केली. त्यांची किंमत रु.23,400/- तक्रारदार यांनी अदा केली. तक्रारदार यांनी केळीच्या रोपाची लागवड त्यांचे शेत मौजे सफदराबाद गट क्र.8 मध्ये दि.1 ते 5 ऑक्टोबर 2011 मध्ये 50 आर क्षेत्रामध्ये केली. पिक वाढीच्या अवस्थेत काही रोपाची वाढ होत नसल्याने तक्रारदार यांनी कंपनीचे प्रतिनीधी यांना कल्पना दिली. कंपनीचे प्रतिनिधी यांनी तक्रारदार यांचे शेताला भेट दिली व पाहणी केली. बाजूचे क्षेत्रामध्ये ऊस पिक असल्यामुळे काही रोपाची वाढ झाली नाही असे तक्रारदार यांना सागण्यात आले. तक्रारदार यांनी दि.9.3.2012 रोजी तालुका कृषी अधिकारी परळी वैजनाथ, कृषी अधिकारी पंचायत समिती परळी वैजनाथ यांचेकडे तक्रार दिली. सदरील अधिकारी यांनी पिकाची पाहणी केली असता एकूण क्षेत्रात 30 टक्के रोपाची वाढ न झाल्याचे दिसून आले. तसा पंचनामा करण्यात आला. तसेच कृषी विद्यापीठ परभणी येथील तज्ञानी तक्रारदार यांचे शेताला भेट दिली व रोपटे तपासणीसाठी प्रयोगशाळेत घेऊन गेले.
तक्रारदार यांनी त्यांचे तक्रारीत पूढे असे कथन केले आहे की, तक्रारदार यांनी शेत मशागतीसाठी रु.1600/- खर्च केला. कंपोस्ट खत रु.8000/-, रासायनिक खत रु.7,000/- व फवारणी खर्च रु.1500/- असे एकूण रु.18,100/- चे नुकसान झाले. तक्रारदार यांना मानसिक व शारीरिक त्रास झाला. सामनेवाले यांनी सदोष रोपाचा पुरवइा करुन तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली आहे व त्यामुळे तक्रारदार यांचे नुकसान झाले आहे. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत. सबब, तक्रारदार यांना सामनेवाले यांचेकडून नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.1,83,000/- मिळावेत व त्यावर 18 टकके व्याज मिळावे अशी मागणी केली आहे.
सामनेवाले क्र.1 व 2 यांना या मंचाची नोटीस प्राप्त झाली व नोटीस मिळहूनही ते मंचासमोर हजर झाले नाही. म्हणून या मंचाने त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश केला. दि.7.1.2014 रोजी सामनेवाले क्र.1 हे मंचासमोर हजर झाले व तक्रारदाराचे म्हणणे देणेकामी, शपथपत्र देणेकामी संधी मिळावी म्हणून अर्ज दिला. अर्जासोबत सामनेवाले क्र.1 यांनी कैफियत हजर केली नाही. त्यामुळे सामनेवाले क्र.1 यांचा अर्ज नाकारण्यात आला. सामनेवाले क्र.1 यांनी दि.25.3.2014 रोजी लेखी म्हणणे सादर केले व तसेच पुराव्याकामी शपथपत्र हजर केले. सामनेवाले क्र.1 यांनी महत्वाचे दस्त नि.25 अन्वये दाखल केले. सामनेवाले क्र.1 यांनी लेखी यूक्तीवाद नि.9 अन्वये सादर केला. सामनेवाले क्र.1 यांनी या मंचाने प्रोसिंडीग मध्ये भाग घेण्यास व पुरावा देण्यास परवानगी दिली.
तक्रारदार यांनी नि.8 अन्वये स्वतःचे शपथपत्र दाखल केले. तसेच तक्रारदार यांनी नि.29 अन्वये लेखी यूक्तीवाद सादर केला व काही दस्त हजर केले. तक्रारदार यांनी स्वतः केलेला यूक्तीवाद ऐकला. तसेच तक्रारदार यांनी लेखी यूक्तीवाद हजर केला त्यांचे अवलोकन केले. सामनेवाले क्र.1 यांनी हजर केलेले शपथपत्र, दस्त व लेखी यूक्तीवाद यांचे अवलोकन केले. न्याय निर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. सामनेवाले यांनी सदोष केळीचे रोपाची विक्री करुन
तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली आहे ही
बाब तक्रारदार शाबीत करतात काय ? होय.
2. तक्रारदार हे तक्रारीत मागणी केलेली नुकसान भरपाई
मिळण्यास पात्र आहेत काय ? होय, अंशतः
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2 ः-
तक्रारदार व सामनेवाले यांनी दिलेल्या पुराव्याचे अवलोकन केले असता खालील नमूद केलेल्या बाबीविषयी वाद नाही. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून टीश्यू कल्चर केळीची 1800 रोपे रक्कम रु.23,400/- खरेदी केली. तक्रारदार यांनी सदरील रोपे त्यांची शेत जमिन क्र.8 मध्ये लावली आहेत.
तक्रारदार यांनी त्यांचे यूक्तीवादामध्ये सांगितले की, सामनेवाले क्र.1 यांचेकडून घेतलेले केळीचे रोपे त्यांनी त्यांचे शेतात लावली. सदरील केळीचे रोपे लावताना योग्य ती काळजी घेतली होती. सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदार यांना रोपे लावण्याबददल मार्गदर्शन केले. तक्रारदार यांनी असे नमूद केले आहे की, सामनेवाले यांनी दिलेल्या पावतीमध्ये व बूकींग फार्म मध्ये वेगवेगळया रोपाच्या जाती लिहील्याचे दिसून आले. महत्वाच्या बाबी बिलामध्ये नमूद केल्या नाहीत. तक्रारदार यांनी केळीची रोपे लावल्या नंतर काही रोपाची वाढ योग्यरित्या झाली नाही. म्हणून त्यांनी तहसीलदार व कृषी अधिकारी यांचेकडे तक्रारी दिल्या. सदरील अधिकारी यांनी तक्रारदार यांचे शेतामध्ये येऊन पिकाची पाहणी केली व पंचनामाक केला. रोंपा पैकी 14 ते 16 टक्के रोपे विषाणूजन्य रोगामूळे निस्तेज व पिवळसर असल्याचे दिसून आले. सामनेवाले यांनी विषाणूजन्य रोपाची विक्री करुन सेवेत त्रूटी ठेवली आहे. तक्रारदार यांना शेतात मशागतीसाठी खर्च करावा लागला तसेच खते, औषधे यासाठी मोठया प्रमाणात खर्च करावा लागला. पिकाची व रोपाची योग्य वाढ न झाल्यामुळे तक्रारदार यांना खूपमोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले. तक्रारदार यांनी असे कथन केले आहे की, त्यांनी केलेली मागणी योग्य व वाजवी आहे.
सामनेवाले क्र.1यांनी त्यांचे पुराव्यात व लेखी यूक्तीवादामध्ये तक्रारदारयांचे म्हणणे स्पष्टपणे नाकारले आहे. सामनेवाले क्र.1 यांचा असा यूक्तीवाद आहे की,तक्रारदार यांनी व्यापारी कारणासाठी सदरील रोपाची खरेदी केली आहे. त्यामुळे ते ग्राहक या संज्ञेत बसत नाहीत. सामनेवाले यांनी असे कथन केले आहे की, कृषी अधिकारी व तहसीलदार यांनी केलेल्या पंचनाम्यात फक्त 15 ते 16 टक्के रोपे यांची योग्य वाढ झाली नाही असे नमूद केले आहे. सदरील वाढ ही काही दुषित हवामानामूळे (Viral Infection ) होऊ शकली नाही व सामनेवाले त्यांस जबाबदार नाहीत. सामनेवाले क्र.1 यांचे सक्षम अधिकारी यांनी तक्रारदार यांचे शेतास भेट दिली व 10.02.2012 रोजी त्यांचा रिपोर्ट दिला. त्या रिपोर्ट मध्ये केवळ 2 ते 3 टक्के रोपे यांची योग्य प्रकारे वाढ झाली नाही असे नमूद केले आहे. केळीचे रोपे हे लावते वेळी त्यांचे योग्य ती काळजी घ्यावी लागते. काही रोपाची वाढ काही नैसर्गिक कारणामूळे होऊ शकत नाही.त्यामुळे सामनेवाले यांना जबाबदार धरता येणार नाही. सामनेवाले यांनी असा यूक्तीवाद केला की, तक्रारदार यांनी सदरील रोपे तपासून ती सदोष आहेत या बाबत कोणताही पुरावा सादर केला नाही. सबब, तक्रारदार यांची तक्रार रदद करण्यात यावी.
तक्रारदार व सामनेवाले यांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्राचे काळजीपूर्वक या मंचाने अवलोकन केले तसेच वर नमूद केलेला यूक्तीवाद लक्षात घेतला. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून त्यांचे शेतात लागवडीसाठी एकूण 1800 केळीच्या रोपाची खरेदी केली. सदरील केळीची रोपे तक्रारदार यांनी त्यांचे शेतात लावली. तक्रारदार यांचे कथन की, या रोपापैकी 30 टक्के रोपाची वाढ झाली नाही. तक्रारदार यांनी दाखल केलेला कृषी अधिकारी यांचा पाहणी रिपोर्ट व पंचनामा यांचे अवलोकन केले असता त्यामध्ये असे नमूद केले आहे की, सरासरी 15 ते 16 टक्के रोपाची वाढ अत्यल्प प्रमाणात झालेली आहे व इतर रोपाची वाढ ही योग्य प्रकारे झालेली आहे. सदर पंचनामा करते वेळेस तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या 1800 रोपा पैकी प्रत्यक्ष किती रोपाची वाढ झाली नाही या बाबत पंचनाम्यामध्ये कोणताही स्पष्ट उल्लेख आढळून येत नाही. प्रत्यक्ष किती रोपाची वाढ झाली नाही हे घटनास्थळावरुन निरिक्षण करुन पंचनाम्या वेळी नोंदविणे शक्य होते. केवळ 15 ते 16 टक्के रोपाची वाढ झाली नाही हे ठोबळमानाने नमूद केलेले आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या फोटोचे अवलोकन केले असता सदरील फोटोमध्ये फक्त एका झाडा जवळ दोन इसम बसलेले दिसतात. त्या झाडाची वाढ झालेली दिसत नाही. दूस-या फोटोचे अवलोकन केले असता केळीच्या झाडाची उगवण ही योग्य प्रकारे झालेली दिसून येते व त्यांला केळी लागलेली दिसत आहे. तक्रारदार यांनी तक्रारीत असे कथन केले आहे की, कृषी अधिकारी यांनी कृषी विद्यापीठ परभणी यांचे तज्ञ बोलावून केळी रोपे तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये घेऊन गेले. सदरील तपासणी अहवाल तक्रारदार यांनी या मंचासमोर दाखल केलेला नाही. त्यामुळे शास्त्रीयदृष्टया खरोखरच रोपामध्ये दोष होता काय या बाबत निष्कर्ष काढता येत नाही.
सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे शेतास भेट देऊन सक्षम व्यक्तीने रिपोर्ट तयार केला आहे तो दाखल केला आहे. त्यामध्ये 3 टक्के रोपाची वाढ योग्य प्रकारे झाली नाही असे नमूद केले आहे. तसेच तक्रारदार यांनी सदरील रिपोर्ट वर सही केल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण पुराव्याचे अवलोकन केले असता या मंचाचे असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांनी लावलेल्या रोपा पैकी काही रोपाची वाढ योग्य प्रकारे झाली नाही. सरासरी जवळपास 10 टक्के रोपाची वाढ योग्य प्रकारे झालेले दिसून येत नाही. तक्रारदार यांनी तक्रारीमध्ये संपूर्ण केळीच्या रोपाची लागवड करण्यासाठी केलेंला खर्च नमूद केला आहे. फवारणी खर्च ही नमूद केलेला आहे. इतर केळीच्या रोपाची वाढ योग्य प्रकारे झालेली आहे व तक्रारदार यांना त्यापासून उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी जो खर्च तक्रारीत नमूद केला आहे तेवढा खर्चाचे तक्रारदार यांचे नुकसान झाले आहे असे म्हणता येणार नाही. सामनेवाले यांनी पुरवलेली रोपे व त्यामध्ये काही प्रमाणात सदोष रोपे यांचे अवलोकन केले असता या मंचाचे मत की, तक्रारदार हे सामनेवाले यांनी सदोष रोपे पुरवली म्हणून त्यांचे नुकसानीसाठी रु.7,000/- मिळण्यास पात्र आहेत. तसेच शेत मशागतीसाठी,खतावर करावा लागलेला खर्च याकामी रक्कम रु.10,000/- मिळण्यास पात्र आहेत. तसेच तक्रारदार यांनी सदरील तक्रार दाखल करावी लागली. तक्रारदार हे शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1500/- मिळण्यास पात्र आहेत.
मुददा क्र,1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) सामनेवाले क्र.1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदार
यांना केळीच्या रोपाची नुकसान भरपाई रक्कम रु.7,000/-
(अक्षरी रुपये सात हजार फक्त) व शेतीतील मशागती व
खताची रक्कम रु.10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) असे
एकूण रक्कम रु.17,000/- (अक्षरी रुपये सतरा हजार फक्त)
निकाल कळाल्यापासून 30 दिवसांचे आंत दयावेत, न
दिल्यास तक्रार दाखल दि.13.09.2013 पासून पुर्ण रक्कम वसुल
होईलपर्यत द.सा.द.शे 10 टक्के व्याज दराने संपूर्ण रक्कम दयावी.
3) सामनेवाले क्र.1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदार
यांना शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3,000/- व
तक्रारीच्या खर्चापोटी रककम रु.1500/- दयावेत.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड
जयंत पारवेकर
लघुलेखक