(श्री मनोहर गोपाळराव चिलबुले, मा.अध्यक्ष)
(पारित दिनांक – 07/06/2014)
तक्रारकर्ती डॉ. सौ. आरती अभय केळकर हयांनी ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 12 प्रमाणे प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे. सदर तक्रारीची संक्षिप्त पार्श्वभूमी पुढीलप्रमाणे –
1. वि.प.क्र. मेसर्स मेसर्स के.बी.असोसिएटस ही भागीदारी फर्म असून रोहिणी निलय बंड हया भागिदारी फर्मच्या भागिदार म्हणून व्यवहार पाहतात. वि.प.फर्म प्लॉट खरेदी करुन अगर विकसनासाठी घेवून त्यावर सदनिका बांधून गरजू ग्राहकांना विकण्याचा व्यवसाय करते. सदर फर्मने सर्व्हे नं. 143/1, 142/2, 182 आणि 183 आराजी अनुक्रमे 1.76, 1.62, 3.38 आणि 1.58 हेक्टर आर अशा एकुण-8.34 हेक्टर मौजा अंबाझारी, हिंगणा, ता, हिंगणा जि. नागपूर वर स्वप्नसृष्टी नांवाने मोकळा प्लॉट व त्यावर बांधकाम करुन देण्याची स्किम जाहीरातीव्दारे प्रसिध्द केली. सदर स्किम प्रमाणे प्लॉट क्र. ए/12 आराजी 20,000 चौ.फुट (1858चौ.मि.) व त्यावर 750 चौ.फुट (70.604 चौ.मि.) जागेत घराचे बांधकाम विकत घेण्याचा दि. 19.06.2006 रोजी नोंदणीकृत करार केला. प्लॉट व त्यावरील घराशिवाय इलेक्ट्रिक मिटर, वॉटर फिल्टर, गिझर पाणी साठविण्यासाठी छतावर टाकी आणि करारनाम्याच्या परिच्छेद क्र. 15 मध्ये नमुद केलेल्या इतर सुविधा देण्याचे वि.प.ने कबुल केले होते.
दि.19.06.2006 च्या करारनाम्याप्रमाणे तक्रारकर्तीने संपूर्ण रक्कम रु.7,00,000/- देऊन सुध्दा वि.प.ने बांधकाम पूर्ण केले नाही. आपसी समझोत्याप्रमाणे करारात नमुद केलेल्या रु. 7,00,000/- ऐवजी एकुण मुल्य रुपये 12,00,000/- देण्याचे तक्रारकर्तीने कबुल केले. तसेच दि.01.05.2008 रोजीचे भेटीत वरील रकमे शिवाय रु. 50,000/- अधिक देण्याचे तक्रारकर्तीने कबुल केले व वि.प.ला वेळोवेळी एकुण रु. 12,50,000/- दिले परंतु वि.प.ने कबुल केल्याप्रमाणे आक्टोंबर 2010 पर्यंत वरील सर्व सुविधांसह बांधकाम पूर्ण करुन दिले नाही तसेच इलेक्ट्रीक मिटर,पाण्याची टाकी व दारे खिडक्या लावल्या नसून बांधकाम निष्कृष्ठ दर्जाचे आहे. त्यामुळे वि.प.ला दिनांक 19.10.2012 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली ती दि. 23.10.2012 रोजी मिळाली . सदर
नोटीसला वि.प.ने दि. 31.10.2012 रोजी उत्तर पाठविले आणि तीन चार महिन्यांचा वेळ मागितला परंतु त्यानंतरही बांधकाम पूर्ण करुन खरेदीखत करुन दिले नाही, म्हणून तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रारीत वि.प.विरुध्द खालील प्रमाणे मागण्या केल्या आहेत.
1. वि.प.ने कराराप्रमाणे प्लॉट व त्यावरील बांधकाचे नोंदणीकृत खरेदीखत
तक्रारकर्तीस करुन देण्याचा आदेश व्हावा.
2. तक्रारकर्तीस झालेल्या शारिरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई
रु.1,00,000/- देण्याचा वि.प.ला आदेश व्हावा.
3. तक्रारखर्चाबाबत रु. 50,000 देण्याचा वि.प. विरुध्द आदेश व्हावा.
2. विरुध्दपक्ष सौ.रोहणी निलय बंड हयांना प्रकृती अस्वास्थामुळे मंचा समक्ष वारंवार उपस्थित होणे शक्य नसल्याने त्यांचे फर्मचे दुसरे भागीदार महेश प्रभाकर डोळस यांचे सहीने लेखी उत्तर दाखल करुन तक्रार अर्जास सक्त विरोध केला. मात्र त्यानंतर सतत गैरहजर राहिले त्यामुळे प्रकरण उपलब्ध पुराव्याच्या आधारे निकाली काढण्यांत आले.
3. विरुध्दपक्षाने आपल्या लेखी जबाबात तक्रारीत नमुद प्लॉट व त्यावरील बांधकामासह विकण्याचा तक्रारकर्ती बरोबर करार केला व त्याबाबत दि.19.06.2006 रोजी नोंदणीकृत करारनामा लिहून दिल्याचे कबुल केले आहे. मात्र मालमत्तेची किंमत रु. 7,00,000/- ठरली होती हे नाकबूल केले आहे. त्यांचे म्हणणे असे कि, प्रत्यक्षात किंमत रु. 12,00,000/- ठरली होती परंतु तक्रारकर्तीस स्टेट बॅकेचे कर्ज घ्यावयाचे असल्यामुळे सदर कर्ज व्यवहारासाठी करारनाम्यात मालमत्तेची किंमत तक्रारकर्तीचे विनंतीवरुन रु.7,00,000/- नमुद केली होती. रु. 7,00,000/-किंमत नमुद असलेला नोंदणीकृत करारनामा दि.19.06.2006 चा आणि रु. 12,00,000/-किंमत नमुद असलेला आपसी समझोता दि. 15.05.2006 चा आहे यावरुनच मालमत्तेची किंमत रु. 12,00,000/- ठरली होती हे स्पष्ट होते. दि.1.05.2008 च्या भेटीत तक्रारकर्तीने वि.प.ला रु. 50,,000/-देण्याचे कबूल केले व ते दिले हे देखिल वि.प.ने नाकबुल केले आहे. त्यांचे म्हणणे असे कि, दि. 1.5.2008 व 2.05.2008 च्या पत्राप्रमाणे तक्रारकर्ती व इतर प्लॉट धारकांना रु. 50,000/- कशाबाबत द्यावयाचे आहेत हे वि.प.ने सविस्तर कळविले होते. परंतु दि. 2.05.2006 च्या पत्राप्रमाणे ठरलेल्या अनु.क्र. 1 ते 6 हया सदरा खालील पैसे सुध्दा तक्रारकर्तीने दिलेले नसून तो खर्च विरुध्द पक्षालाच सोसावा लागला. अर्थातच ठरल्याप्रमाणे जास्तीचे रु. 50,000/- देखिल तक्रारकर्तीने दिलेले नाहीत.
कराराप्रमाणे इलेक्ट्रीक मिटर,पाण्याची टाकी व घरास दारे व खिडक्या लावलेल्या नाही तसेच अप्रोच रोड बनविला नाही हे वि.प.ने नाकबूल केले आहे. तसेच बांधकाम निकृष्ठ दर्जाचे आहे व त्यातून पाणी झिरपते परंतु वि.प.ने दुरुस्तीचे काम केले नाही हे देखिल नाकबूल केले आहे.त्यांचे म्हणणे असे कि, आजपर्यंत तक्रारकर्तीने केवळ रु, 11,00,000/- दिलेले आहेत. बाकी राहिलेली रक्कम देवून खरेदीखत नोंदवून घ्यावे अशी वि.ने तक्रारकर्तीस वारंवार विनंती करुनही तक्रारकर्तीने तसे केले नसल्याचे म्हटले आहे.
तक्रारकर्ती वि.प.ची ग्राहक आहे व वि.प.ने त्रृटीपूर्ण सेवा दिली आहे किंवा अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला असल्याचे नाकारले आहे. सदरचे प्रकरण करार भंगाचे असल्यामुळे त्यासाठी तक्रारकर्तीने दिवाणी न्यायालयात दाद मागणे आवश्यक असून मंचाला सदर प्रकरण चालविण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले आहे. प्लॉट व घराचे बांधकाम कराराप्रमाणे पूर्ण झाले असून वि.प.ने दि.31.10.2012 चे उत्तरात तसे कळविले असल्याचे म्हटले आहे. तक्रारीस कोणतेही कारण घडले नसल्याने तक्रार खर्चासह खारीज करण्याची विनंती केली आहे.
4. तक्रारकर्ती व वि.प.च्या परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील मंचाचे निष्कर्ष व त्याबाबतची कारणमिमांसा खालीलप्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) वि.प. ने सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार
केला आहे काय ? होय.
2) तक्रारकर्ती मागणीप्रमाणे दाद मिळण्यास
पात्र आहे काय ? अंशतः पात्र आहे.
3) अंतिम आदेश काय ? तक्रार अंशतः मंजूर.
-कारण मिमांसा-
मुद्दा क्र. 1 बाबत –
5. सदर प्रकरणात तक्रारीचा विषय असलेला मौजा अंबाझरी, हिंगणा, ता. हिंगणा जि. नागपूर येथील वि.प.ने (“वि.प.” म्हणजे मे.के.बी.असोसिएटस तर्फे- भागीदार सौ.रोहणी निलय बंड असे वाचण्यात यावे) विकसित केलेल्या “स्वप्नसृष्टी” स्किम मधील प्लॉट क्र. ए/12 आराजी 20,000चौ.फुट (1858चौ.मि.) व त्यावर 750चौ.फुट (70.604चौ.मि.) जागेत घराचे बांधकाम तक्रारकर्तीस रु.12,00,000/- किंमतीस विकण्याचा करार केल्याचे वि.प.ला मान्य आहे. तसा उल्लेख असलेला दि.15.05.2006 चा उभय पक्षांनी सही केलेला आपसी समझोत्याचा करार (M.O.U.) तक्रारकर्तीने दस्त क्र. 2 प्रमाणे दाखल केला आहे व त्यांत विक्रीच्या करारनाम्यात उभयपक्षांच्या सोयीसाठी व बॅकेकडून कर्ज घेण्यासाठी मालमत्तेची किंमत रु. 7,00,000/- दर्शविण्याचे ठरले असल्याचे नमुद केले आहे. तसेच या रकमेशिवाय तक्रारकर्तीने अधिकचे रु. 50,000/- देण्याचे मान्य केले होते, ही बाब देखिल उभय पक्षांना मान्य आहे. परंतु तक्रारकर्तीने ही सर्व रक्कम रु.12,50,000/- वि.प.ला दिले असतांना देखिल वि.प.ने कबुल केल्याप्रमाणे इलेक्ट्रीक मिटर,पाण्याची टाकी व दारे खिडक्या लावल्या नाहीत व बांधकाम निष्कृष्ठ दर्जाचे असल्याने पाणी झिरपते हे वि.प.ने नाकबुल केले आहे. तक्रारकर्तीने वि.प.ला दिलेल्या पैशाच्या पावत्या दाखल केल्या आहेत त्याप्रमाणे खालील प्रमाणे पैसे दिलेले आहेत.
दिनांक | दिलेली रक्कम |
15.05.2006 | 1,00,000/- |
31.05.2006 | 1,00,000/ |
12.07.2006 | 1,00,000/ |
20.09.2006 | 1,00,000/ |
27.02.2007 | 1,00,000/ |
| 5,00,000/- |
वरील प्रमाणे रु. 5,00,000/- मिळाल्याबाबत एकाच कागदावर वि.प.ने वेळोवेळी पोच दिली आहे व ती तक्रारकर्तीने (M.O.U.) दस्त क्र. 2 सोबत दाखल केली आहे. याशिवाय तक्रारकर्तीने खालील पावत्या दाखल केल्या आहेत.
पावती क्र. | दिनांक | रुपये |
347 | 11.05.2006 | 1,00,000 /- |
171 | 15.05.2006 | 1,00,000 /- |
391 | 30.10.2006 | 2,00,000/- (SBI DD No.503826 Dt. 28 OCT 2006) |
440 | 7.09.2007 | 1,00,000 /- |
483 | 24.07.2008 | 25,000/- |
485 | 7.08.2008 | 1,75,000/- |
वरील पावत्यांप्रमाणे तक्रारकर्तीने प्रत्यक्ष प्लॉट व घर रु. 12,00,000/- मध्ये खरेदीचा करार केला मात्र नोंदणीकृत करारनामा दस्त क्र. 3 मध्ये नोंदणीशुल्क वाचविण्यासाठी मालमत्तेचे मुल्य रु.7,00,000/- दर्शविले. प्रत्यक्षात वि.प.ला रु. 12,00,000/- दिल्याच्या पावत्या दाखल केल्या आहेत. वरील प्रमाणे तक्रारकर्तीने दाखल केलेल्या कोणत्याही पावत्या वि.प.ने नाकारलेल्या नाहीत म्हणून केवळ रु. 11,00,000/- मिळाले हे वि.प.चे म्हणणे स्विकारता येत नाही. तक्रारकर्तीने आपल्या तक्रारीत वि.प.ला वरील पावत्याप्रमाणे एकुण रु. 12,00,000/- शिवाय दस्त क्र. 5 दि.02.05.2008 च्या वि.प.च्या पत्रात नमुद केल्याप्रमाणे अधिकची ठरलेली रक्कम रु. 50,000/- दिली असल्याचे म्हटले असले तरी रु. 50,000/- दिल्या बाबतचा पुरावा सादर केलेला नाही.
6. तसेच तक्रारकर्तीने वि.प.ने कबुल केल्याप्रमाणे रस्ता करुन दिला नाही, इलेक्ट्रीक मिटर,पाण्याची टाकी व दारे खिडक्या लावल्या नाहीत व बांधकाम निष्कृष्ठ दर्जाचे असल्याने पाणी झिरपते असे स्वतःच्या शपथपत्रावर सांगितले आहे. बांधकामात सदर त्रृटी असल्याचे तक्रारकर्तीने दिलेली नोटीस दस्त क्र. 9 दि. 19.10.2012 मध्ये देखिल नमुद आहे. त्यास वि.प.ने दस्त क्र. 10 प्रमाणे दि. 31.10.2012 रोजी उत्तर पाठविले त्यांत रस्ता व पाण्याची टाकी हया सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या असून दारे आणि खिडक्यांचे काम चालू आहे ते तीन चार महिन्यांत पूर्ण होईल आणि पाणी गळतीची समस्या देखिल दूर करुन देण्यांत येईल असे नमुद केले आहे. परंतू वरील प्रमाणे बांधकामातील त्रृटी दुर करुन कराराप्रमाणे बांधकाम पूर्ण झाले असल्याचा कोणताही स्वतंत्र पुरावा दाखल केलेला नाही. वरील प्रमाणे फ्लॅटची ठरलेली किंमत रु. 12,00,000/- दिल्याचे तक्रारकर्तीने दाखल केलेल्या पावत्यांप्रमाणे सिध्द केले आहे. मात्र बांधकाम खर्चात वाढ झाल्यामुळे अधिकची कबुल केलेली रक्कम रु. 50,000/- दिल्याचे पुराव्या अभावी तक्रारकर्ती सिध्द करु शकलेली नाही. असे असले तरी कराराप्रमाणे पूर्ण सुविधांयुक्त बांधकाम करुन देणे आणि उर्वरित रक्मम रु. 50,000/- घेवून प्लॉट व त्यावर बांधलेल्या घराचे नोंदणीकृत खरेदीखत लिहून व नोंदून देणे ही वि.प.ची कायदेशीर जबाबदारी आहे. परंतु ती जबाबदारी वि.प.ने पार पाडलेली नाही ही ग्राहकाप्रती सेवेतील न्यूनता आहे. म्हणून मुद्या क्र. 1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
मुद्या क्र. 2 बाबत –
7. वि.प. ने तक्रारकर्तीकडून तिला विक्रीचा करार केलेल्या प्लॉट व त्यावरील बांधकामाची किंमत रु. 12,00,000/- घेतली असून कराराप्रमाणे पूर्ण सुविधा उपलब्ध करुन दिल्या नाही व बांधकाम खर्च वाढल्यामुळे घेणे असलेली अतिरिक्त रक्कम रु.50,000/-घेवून खरेदीखत लिहून व नोंदवून दिले नाही. त्यामुळे तक्रारकर्ती ठरलेली अतिरिक्त रक्कम रु. 50,000/- विरुध्दपक्षास देवून कराराप्रमाणे सर्व सुविधायुक्त प्लॉट व घराचे खरेदीखत लिहून व नोंदवून मिळण्यास आणि ताबा मिळण्यास पात्र आहे. याशिवाय शारिरिक व मानसिक त्रासा बद्दल रु.10,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.5,000/- मिळण्यास पात्र आहे. म्हणून मुद्या क्र. 2 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविला आहे.
8. वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
1) विरुध्दपक्षाने दि. 15जून 2006 च्या करारनाम्याप्रमाणे तक्रारकर्तीस
मौजा अंबाझारी, हिंगणा, ता, हिंगणा जि. नागपूर येथील वि.प.ने
विकसित केलेल्या ‘’ स्वप्नसृष्टी ‘’ स्किम मधील प्लॉट क्र. ए/12
आराजी 20,000चौ.फुट(1858चौ.मि.) व त्यावरील 750 चौ.फुट
(70.604चौ.मि.)जागेवरील करारातील सर्व सुविधांनी युक्त घराचे
खरेदीखत तक्रारकर्तीकडून अतिरिक्त बांधकाम खर्चाची ठरलेली रक्कम
रु.50,000/-(अक्षरी रुपये पन्नास हजार फक्त) घेवून लिहून व नोंदवून
द्यावे.
2) खरेदखत लिहीण्याचा व नोंदणीचा खर्च तक्रारकर्तीने करावा.
3) वि.प. ने तक्रारकर्तीस शारिरिक व मानसिक त्रासाबाबत रु.10,000/-
(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारखर्च रु.5,000/-
(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) द्यावा.
4) आदेशाची पुर्तता आदेशाचे तारखेपासून 2 महिन्यांचे आंत करावी.
5) सदर आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामुल्य द्यावी.
6) प्रकरणाची ब व क फाईल तक्रारकर्त्यास परत करावी.