निकाल
दिनांक- 10.10.2014
(द्वारा- श्रीमती मजुंषा चितलांगे, सदस्या )
तक्रारदार सुरेख कारंजकर यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी सदोष वाहन विक्री करुन सेवा देण्यास कसूर केला म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे, तक्रारदार यांनी सामनेवाले क्र. 1 यांचेकडून दि.3.8.2011 रोजी टी.व्ही. एस. कंपनीची जाईव्ह मोटार सायकल खरेदी केली. ज्यांचा चेसीज नं.MD625AV17A1E32853 असा आहे व इंजिन नंबर OV1EA1033132 असा आहे. वाहन निळया रंगाचे आहे. सामनेवाले क्र.1 यांनी सामनेवाले क्र. 2 यांची पावती तक्रारदार यांना दिली. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहे. वाहनाचा नंबर एम.एण्च.-23-झेड-3278 असा आहे. वाहनाचे इंजिन दोषयुक्त आहे. सदर इंजिन हे नवीन इंजिन प्रमाणे चालत नव्हते. तक्रारदाराने सामनेवाले क्र. 1 कडे वारंवार सदर इंजिनमध्ये येत असलेल्या आवाजा बाबत तक्रार केली. परंतु त्यांनी वरवर काम करुन दिले. परंतु इंजिन मधील आवाज दुरुस्त होत नव्हता. तक्रारदार हे सामनेवाले क्र. 1 यांचे सांगणे प्रमाणे सामनेवाले क्र. 2कडे वाहन दाखवण्यास गेले. परंतु सामनेवाले क्र. 2 यांचेकडे इंजिन मधील आवाज बंद झाला नाही. तकारदारास वाहन हे अहमदनगर येथे घेऊन जावे लागले त्यामुळे तक्रारदारास आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. तक्रारदार यांनी दि.18.3.2013 रोजी सदर वाहन सामनेवाले क्र.2 कडे दूरुस्तीकरिता दिले, तक्रारदार यांने सदर वाहन दूरुस्त न करुन दिल्यामूळे दि.13.4.2013 रोजी नोटीस पाठविली.
सामनेवाले यांनी दोषयूक्त वाहन विक्री केल्यामुळे तक्रारदाराने दि.20.3.2013 रोजी सामनेवाले क्र. 2 यांना नोटीस पाठवून वाहन परत घ्यावे किंवा तिची रक्कम परत करावी असे कळविले. नोटीसचे उत्तर तक्रारदारास सामनेवाले क्र. 2 यांनी दि.4.4.2013 रोजी पाठविले. सदर उत्तर हे दिशाभूल करणारे आहे. तक्रारदार हे दि.2.5.2013 रोजी बीड रोउ साकत फाटया जवळून वाहनावरुन जात असताना गेअर बॉक्समध्ये अचानक मोठा आवाज होऊन सदर वाहन चालू स्थितीत बंद पडले व त्यामुळे तक्रारदाराचा अपघात होऊन त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यासाठी तक्रारदारास रु.10,000/- खर्च आला. अपघातानंतर दि.4.5.2013 रोजी सदर वाहन सामनेवाले क्र. 2 कडे दुरुस्तीकरिता दिले होते. परंतु सामनेवाले क्र. 2 यांनी सदर वाहन दुरुस्त करुन न दिल्यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाले क्र. 3 यांना दि.7.5.2013 रोजी नोटीस पाठवून कळविले. सामनेवाले क्र. 3यांनी आजपर्यत कोणतीही दखल घेतली नाही व नोटीसचे उत्तरही दिले नाही. सदर वाहन हे तक्रार दाखल करेपर्यत सामनेवाले क्र. 2यांचे ताब्यात आहे.
तक्रारदाराने सदर तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, सदोष वाहन विक्री केल्यामुळे सदर वाहनाची किंमत रु.47,923/-, अपघाताचे शारीरिक नुकसान रु.10,,000/-, मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.20,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- असे एकूण रु.82,923/- सामनेवाले क्र.1 ते 3 कडून संयूक्तीक किंवा वैयक्तीकरित्या रक्कम मिळेपर्यत 12 टक्के व्याज देण्याचा आदेश व्हावा.
सामनेवाले क्र.1 ते 3 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे नि.12 अन्वये दाखल केले आहे. सदर वाहन हे तक्रारदार यांनी सामनेवाले क्र. 2 अहमदनगर येथून खरेदी केलेले आहे. त्यामुळे सदर मंचास ही तक्रार चालविण्याचा अधिकार नाही. वाहनाचे इंजिन हे दोषयूक्त नाही. त्यामध्ये उत्पादकीय दोष नाही. तक्रारदार हे ज्या ज्या वेळी वाहन दूरुस्तीसाठी घेऊन आले त्या त्या वेळी त्यांना वाहन दूरुस्त करुन दिलेले आहे त्यांची नोंद जॉब कार्डवर आहे. तक्रारदार यांने वाहन सामनेवाले यांचेकडे कोणकोणत्या तारखेस नेले होते यांचा उल्लेख जाणूनबूजून केलेला नाही. तक्रारदाराने दि.2.3.2013 रोजी पाठविलेल्या नोटीस मधील मजकूर खोटा आहे. त्या नोटीसला दिलेले उत्तर बरोबर आहे. तक्रारदाराने दि.18.3.2013 रोजी वाहन दूरुस्तीसाठी आणले होते परंतु तो वाहन परत घेऊन जाण्यासाठी दि.22.4.2013 रोजी आला. त्यांने सांगितल्याप्रमाणे वाहन दूरुस्त करुन दिलेले आहे. त्याबाबत सामनेवाले क्र. 2 यांचे जॉब कार्डवर तक्रारदाराने सही देखील केलेली आहे. अपघाता बददलची माहीती चूक व खोटी आहे. तक्रारदाराने दि.4.5.2013 रोजी वाहन दूरुस्तीसाठी दिले होले ते वाहन दूरुस्त करुन दि.11.5.2013 रोजी परत दिले आहे. सदर वाहन सामनेवाले यांचेकडेच आहे हे म्हणणे चूक व खोटे आहे. परत तक्रारदाराने दि.29.5.2013 रोजी वाहन दूरुस्तीसाठी आणले होते. तक्रारदाराचे म्हणण्याप्रमाणे वाहनातील दोष दूरुस्त करुन दिले. परंतु वाहन घेऊन न गेल्यामुळे सामनेवाले क्र. 2 यांनी तक्रारदारास दि.13.6.2013 व दि.18.6.2013 रोजी रजिस्टर्ड पोस्टाने पत्र पाठविले. सदर पत्र त्यांस दि.18.6.2013 व दि.22.6.2013 रोजी मिळाले आहे. तेव्हापासून सदर वाहन सामनेवाले क्र. 2 यांचेकडे आहे. विनाकारण त्रास देण्याचे हेतूने व जास्त पैसे उकळणेसाठी सदर तक्रार दाखल केली आहे. सदर वाहन दोषयूक्त नाही. सदर वाहन वॉरंटीमध्ये विनामुल्य दूरुस्त करुन दिलेले आहे. सामनेवाले यांचे सेवेत कोणतीही त्रूटी नाही. म्हणून तक्रारदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र, कागदपत्र तसेच सामनेवाले क्र.1 ते 3 यांचा लेखी जवाब, श्री.अरंविद भन्साळी यांचे शपथपत्र व कागदपत्र यांचे बारकाईने अवलोकन केले. तक्रारदाराचे वकील श्री. धांडे व सामनेवाले यांचे वकील श्री. ए.एस.कूलकर्णी यांचा युक्तीवाद ऐकला. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. वाहनातील दोष हा उत्पादकीय दोष आहे ही बाब तक्रारदार
यांनी सिध्द केली आहे काय ? नाही.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारास दयावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे
हि बाब तक्रारदार यांनी सिध्द केली आहे काय ? नाही.
3. तक्रारदार तक्रारीतील मागणी मिळण्यास पात्र आहे काय ? नाही.
4. सदरील मंचास तक्रार चालविण्याचा अधिकार आहे काय ? नाही.
5. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमिंमासा
मुददा क्र.1 ते 5 ः-
तक्रारदार यांच्या वकिलांनी असा युक्तीवाद केला की, सामनेवाले क्र.1 कडून दि.3.8.2011 रोजी टी.व्ही. एस. कंपनीची जाईव ही मोटार सायकल खरेदी केली. खरेंदी केल्यानंतर बीड येथे नोंदणी केली. मोटार सायकलचा क्रमांक एम.एण्च.-23-झेड-3278 असा आहे. सदर मोटार सायकलचे उत्पादकीय वर्ष 2010 आहे. वापरत असतांना सदर मोटर सायकलचे इंजिन दोषयुक्त आहे असे निदर्शनास आले. सामनेवाले क्र 1 कडे वारंवार सदर इंजिन बाबत तक्रार केली आहे. सामनेवाले क्र 2 यांचेकडे वाहन दूरुस्तीसाठी घेऊन गेले असता तक्रारदारास मानसिक त्रास झाला. सदर मोटर सायकलमध्ये गेअर टाकंताना जोरात अहवाल यायचा व वाहन केव्हाही बंद पडायचे. सदर मोटर सायकल दूरुस्त होत नसल्यामुळे सामनेवाले क्र 2 यांना नोटीस दिली. सदर नोटीसचे सामनेवाले क्र 2 यांनी उत्तर दिले. तसेच तक्रारदार यांने दि.13.4.2013 रोजी नोटीस पाठविली होती. तरी सामनेवाले क्र 2 यांनी सदर मोटार सायकल दूरुस्त न करताच परत केली. नादूरुस्त मोटर सायकल वापरत असल्यामुळे दि.2.5.2013 रोजी तक्रारदाराचे सदर विवादीत वाहनामध्ये जोरात आवाज होऊन अचानक बंद पडल्यामुळे तक्रारदाराचा अपघात झाला. तदनंतर परत दि.4.5.2013 रोजी सामनेवाले क्र 2 कडे सदर वाहन दूरुस्तीकरीता पाठवले होते परंतु वाहन सामनेवाले क्र 2 यांनी दूरुस्त न करता परत पाठवले. सबब, सामनेवाले क्र 1 ते 3 यांनी दोषयुक्त वारहन दूरुस्त न करुन व त्यांची किंमत परत न करुन तक्रारदार यांचे कधीही भरुन न निघणारे नुकसान झाले. त्यामुळे तक्रारदारास शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे तक्रारदारा यांस सामनेवाले क्र 1 ते 3 यांच्याकडून तक्रारीतील मागणी देण्यात यावी व तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात यावी.
सामनेवाले यांच्या वकिलांनी लेखी युक्तीवाद दाखल केला. त्यांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांने तक्रारीतील विवादीत वाहन हे सामनेवाले क्र 2 यांच्या अहमदनगर शोरुम मध्ये खरेदी केले आहे. तसेच तक्रारदार सामनेवाले क्र 2 यांना वेळोवेळी दिलेल्या नोटीस मध्ये सदर वाहन हे सामनेवाले क्र 1 कडून खरेदी केल्याचा उल्लेख नाही. सामनेवाले क्र 2 यांच्याकडून खरेदी केल्याचा उल्लेख आहे. सामनेवाले क्र 1 हे केवळ तकारीमध्ये सामनेवाले म्हणून नमूद केले असल्यामुळे या मंचास तक्रार चालविण्यचा अधिकार नाही कारण की, तक्रारदारास सदर वाहन हे सामनेवाले क्र 2 यांनी वेळोवेळी दूरुस्त करुन दिले आहे. त्याबाबतचे जॉब कार्ड मंचासमोर दाखल केले आहे. तदनंतर तक्रारदाराने दि.28.5.2013 रोजी सदर वाहन हे दूरुस्तीसाठी सामनेवाले क्र 2 यांच्याकडे अहमदनगर येथे शोरुम मध्ये आणले होते. त्यावेळी तक्रारदाराने सदर वाहनात इंजिन बाबत दूरुस्ती सांगितली नव्हती. त्यावेळेस फक्त शॉकअप आईल सील बदलणे व किलोमिटर केबल बदलणे एवढयाच सुचना दिल्या होत्या. सामनेवाले यांनी सदर वाहन दूरुस्त करुन तक्रारदारास घेऊन जाण्याचे कळविले. त्याबाबतचे दि.16.6.2013 व दि.18.6.2013 चे पत्र मंचासमोर दाखल केले आहे. व रजिसट्रर्ड पोस्टाने पाठवले आहे. त्या पावत्या मंचासमोर दाखल केल्या आहेत. त्यानंतरही तक्रारदार हे वाहन घेऊन गेले नाही. सदर वाहनामुळे तक्रारदारास अपघात झाला नाही. सबब सामनेवाले क्र 2 यांनी तक्रारदारास कोणतीही सेवा देण्यात कसूर केलेला नाही.
तक्रारदाराने सदर वाहनाचे इंजिन सदोष आहे हे सिध्द करण्यासाठी सदर वाहन हे योग्य त्या तज्ञा मार्फत तपासणी करणे गरजेचे आहे. सदर वाहनाची तपासणी तज्ञा मार्फत केली नाही. राज्य आयोगाचा निकालाची प्रत दाखल करण्यात आली आहे.
Mahrashtra State Consumer Dispute Redressal Commission, Mumbai,
Circuit, Bench at Auranbad.
Fist appeal no.A/1157/2008
Vasant Sonu Chandratre Vs. TVS Motor Company Ltd and ors.
वर नमूद केलेले युक्तीवाद लक्षात घेतला. तक्रारदार यांनी दाखल केलेले पुराव्याचे शपथपत्र व कागदपत्र यांचे अवलोकन केले. तसेच सामनेवाले क्र 2 यांनी दाखल केलेले कागदपत्र यांचे अवलोकन केले. यावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांने दि.3.8.2011 रोजी सामनेवाले क्र 2 म्हणजे भन्साळी टी.व्ही.एस. अहमदनगर येथून तक्रारीतील विवादीत वाहन (JIVE) खरेदी केली आहे ही बाब सिध्द होते. खरेदी केल्यानंतर सदर वाहना मध्ये वेळोवेळी झालेला बिघड दूरुस्त करण्यासाठी तक्रारदार यांने सामनेवाले क्र 2 यांच्याकडे वाहन दाखविले व सदर वाहनात जे काही दूरुस्त करावयाचे आहे असे निर्देश करुन सामनेवाले क्र.2 कडून दूरुस्त करुन घेतली. त्याबाबतचे वेळोवेळी दूरुस्त केलेले जॉब कार्ड हे मंचासमोर दाखल आहे. यावरुन असे निदर्शनास येते की, सामनेवाले क्र 2 यांनी तक्रारदारास वेळोवेळी तक्रारदाराची मोटर सायकल मध्ये आवश्यक त्या दूरुस्त्या करुन दिल्या आहे. ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांचा यूक्तीवाद यांचे अवलोकन केले त्यांच्या युक्तीवादानुसार तक्रारदार यांने सदरील मोटार सायकल ही सामनेवाले क्र 1 कडून खरेदी केली आहे परंतु ही बाब सिध्द करण्यासाठी तक्रारदार यांने कोणताही ठोस पुरावा मंचासमोर दाखल केला नाही. तसेच तक्रारदार यांने दि.20.3.2013 व दि.13.4.2013 या दोन्ही नोटीस फक्त सामनेवाले क्र 2 यांना पाठविल्या आहे. त्या नोटीसचे अवलोकन केले असता त्यामध्ये सामनेवाले क्र 1 यांच्या कडून वाहन घेतल्या बाबतचा कोणताही उल्लेख नमूद केला नाही. तसेच सदर नोटीसची प्रत सामनेवाले क्र 1 ला पाठविली नाही. यावरुन तक्रारदार यांने सामनेवाले क्र 1 कडून मोटार सायकल खरेदी केली असा निष्कर्ष काढता येणार नाही.
तक्रारदार यांने मंचासमोर सदरील मोटर सायकल तपासणी करिता पाठविण्याचा अर्ज केला. तो अर्ज मा. मंचाने मंजूर करुन सदरील वाहन योग्य तज्ञामार्फत तपासण्याची मंजूरी दिली. परंतु तक्रारदार यांने वाहन तपासणी कामी कोणतही कार्यवाही केली नाही. त्यामुळे सदर वाहना मध्ये कोणता उत्पादकीय दोष आहे हे तक्रारदार सिध्द करु शकले नाही. तक्रारदार यांने सदर वाहनामध्ये असलेले दोष सिध्द करण्यासाठी कोणत्याही तज्ञाचा अहवाल तसेच प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले नाही. सदरील वाहनामध्ये उत्पादकीय दोष आहे हे सिध्द करण्यासाठी सदरील वाहन हे सक्षम व्यक्तीकडून किंवा कार्यशाळेतून तपासून त्यांचा अहवाल मंचासमोर येणे गरजेचे आहे. त्याबाबतचा कोणताही अहवाल सादर केला नाही. त्यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदारास दयावयाच्या सेवेत त्रूटी ठेवली आहे असे म्हणता येणार नाही. तसेच सामनेवाले क्र 2 यांनी दि.13.6.2013 व दि.18.6.2013 च्या पत्रानुसार वाहन घेऊन जाण्यास कळविले आहे.
सामनेवाले क्र.2 यांनी दाखल केलेले मा. राज्य आयोग, मुंबई सर्किट बेंच(परिक्रमा खंडपीठ) औरंगाबाद यांच्या न्यायनिर्णयाचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारदाराच्या तक्रारीची वस्तूस्थिती ही सदर मा. राज्य आयोगाच्या निर्णयास अनुसरुन असे तक्रारीतील वस्तूस्थिती तंतोतंत लागू आहे. सदर न्यायनिर्णय लक्षात घेतला आहे.
सामनेवाले यांचे वकिलांनी असा युक्तीवाद केला की, सदरील तक्रार चालविण्याचा मंचास अधिकार नाही. सामनेवाले यांचे वकील यांच्या मते सदरील वाहन हे सामनेवाले क्र 2 यांच्याकडून खरेदी केले आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेली वाहनाची खरेदी पावती (टॅक्स इनव्हाईस) ही सुध्दा सामनेवाले क्र 2 यांची आहे. तक्रारदार यांने दि.20.3.2012, दि.13.4.2013 व दि.7.5.2013 रोजी पाठविलेल्या नोटीसमध्ये वाहन हे सामनेवाले क्र 1 कडून खरेदी केल्याचा उल्लेख नाही. तसेच नोटीसची प्रत ही सामनेवाले क्र 1 ला पाठविले नाही. केवळ तक्रारीत सामनेवाले क्र 1 कडून खरेदी केलेल्याचा उल्लेख असल्यामुळे व सामनेवाले क्र 1 यांना तक्रारीत समाविष्ट केले असल्यामुळे सदर तक्रार मा. मंचाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. तक्रारदार यांने सदरील वाहन हे सामनेवाले क्र 2 यांच्या अहमदनगर येथील शोरुम मधून खरेदी केली आहे. तसेच तक्रारदार यांने तक्रारीस कारण न्यायामंचाच्या अधिकार क्षेत्रात येते ही बाब सिध्द केली नाही. तक्रारदार यांनी दाव्यास कारण कोठे घडले हे सिध्द केले नाही. तक्रारदार यांचे सदरील वाहन अहमदनगर येथून खरेदी कले आहे. तसेच वेळोवेळी सदरील वाहनास केलेली आवश्यक दूरुस्त्या हया सुध्दा अहमदनगर येथे सामनेवाले क्र 2 यांच्या शोरुम मध्ये केले आहे. या अनुषंगाने तक्रारदारास अहमदनगर येथील मंचात वाद दाखल करता येतो. सबब, तक्रार दाखल करण्याचे कारण या मंचाच्या अधिकार क्षेत्रात घडले नाही. सबब, सदर तक्रार या मंचास चालविण्याचा अधिकार नाही असे मंचाचे मत आहे. वर नमूद केलेल्या कारणमिंमासा वरुन तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रार रदद होण्यास पात्र आहे.
मुददा क्र..1 ते 5 चे उत्तर नकारार्थी देत आहोत.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2)
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्री.रविंद राठोडकर श्रीमती मंजूषा चितलांगे श्री.विनायक लोंढे,
सदस्य सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड