निकालपत्र
निकाल दिनांक – २५/०२/२०२१
(द्वारा मा.सदस्या : श्रीमती.चारु विनोद डोंगरे)
___________________________________________________________
१. तक्रारदार ही मौजे ईमामपूर, ता.जि. अहमदनगर येथील रहिवासी आहे. तक्रारदार ही मयत महादेव देवराम मोकोटे यांची पत्नी आहे. तिचे मयत पतीचे नावे मौजे ईमामपूर, ता.जि. अहमदनगर येथे शेतजमीन मिळकत गट नंबर ५६५, ३७२, ३५१, २४० व २३९ अशी शेतजमीन आहे. तक्रारदार हिचे पतीचा सामनेवाले कंपनीकडे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविला होता. दिनांक १०-१०-२०१६ रोजी तक्रारदार हिचे पती शिरूर येथे अपार्टमेंटच्या बांधकामावर सेंटरींग सुताराचे काम करीत असतांना चौथ्या मजल्यावरून अपघाताने खाली पडले. त्यात गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरीता माणिकचंद हॉस्पिटल, शिरूर येथे नेले व नंतर आनंद ऋषीजी हॉस्पीटल मध्ये अॅडमीट करण्यात आले. परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांना सिव्हील हॉस्पीटल, अहमदनगर येथे अॅडमीट केले. दिनांक २३-११-२०१७ रोजी त्यांचा मृत्यु झाला. सदर अपघाताची खबर शिरूर पोलीस स्टेशन येथे देण्यात आली आणि सिव्हील हॉस्पीटल, अहमदनगर येथे पोस्ट मार्टेम करण्यात आले. त्यांनतर संपुर्ण कागदपत्रांसहीत सामनेवाले यांचे नोडल ऑफिसर म्हणजेच तालुका कृषी अधिकारी यांचेकडे विमा दावा दाखल केला. परंतु सामनेवाले यांनी सदरचा विमा दावा चुकीचे कारणाने नाकारला आहे. म्हणुन तक्रारदाराला सदर तक्रार या आयोगात दाखल करून परिच्छेद क्रमांक १० प्रमाणे मागणी केली आहे.
२. सामनेवाले यांनी त्यांची लेखी कैफीयत निशाणी ११ प्रमाणे दाखल केली आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे मयत पती महादेव देवराम मोकाटे यांचा विमा उतरविलेला होता ही बाब मान्य केली आहे. परंतु त्यांनी पुढे असे नमुद केले की, सदरील पॉलीसीचा कालावधी संपण्याचे तीन महिन्यांचे आत अथवा पॉलिसी संपल्यानंतर तीन महिनेचे आत तक्रारदाराने विमा दावा सादर करणे गरजेचे होते. पॉलसी ही दिनांक ३०-११-२०१६ रोजी संपणार होती. त्यांनी सदर विमा दावा हा दिनांक ०६-०४-२०१७ चे आत दाखल करणे गरजेचे होते. परंतु तक्रारदार यांनी दिनांक १२-०३-२०१८ रोजी दाखल केला. त्यामुळे पॉलिसीचे अटी व शर्तीनुसार पॉलसी कालावधी संपल्यानंतर विमा दावा सादर केला आहे. त्यामुळे पॉलिसीचे अटी व शर्तीनुसार सदर विमा दावा हा दिनांक २०-०३-२०१८ रोजी नाकारला आहे, अशा प्रकारे सामनेवाले यांनी योग्य कारणाने विमा दावा नाकारला आहे. सामनेवाले यांनी कोणतीही सेवेत त्रुटी दिली नाही, सबब तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात यावी, अशी विनंती केली.
३. तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र, शपथपत्र व त्यांचे वकील श्री.नितीन काळे यांनी केलेला युक्तिवाद तसेच सामनेवाले यांनी दाखल केलेले कागदपत्र, शपथपत्र, त्यांचे वकील श्री. एस.पी. मेहेर यांनी केलेला युक्तिवाद यावरून न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांचे उत्तर आम्ही सकारण खालील विवेचनाप्रमाणे देत आहोत.
अ.नं. | मुद्दे | निष्कर्ष |
(१) | तक्ररादार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | होय |
(२) | सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवेत त्रुटी दिली आहे काय ? | होय |
(३) | तक्रारदार नुकसान भरपाईची रक्कम मिळणेस पात्र आहे काय ? | होय |
(४) | आदेश काय | अंतिम आदेशा प्रमाणे |
कारणमिमांसा
४. मुद्दा क्र. (१) : तक्रारदार हिचे मयत पती महादेव देवराम मोकाटे यांचा सामनेवाले यांच्याकडे शासनाच्या निर्णयानुसार गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा रक्कम रूपये २,००,०००/- उतरविला होता, ही बाब सामनेवाले यांना मान्य आहे, यावरून तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहे, असे सिध्द होते. सबब मुददा क्र.१ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
५. मुद्दा क्र. (२ व ३) - तक्रारदार हिचे मयत पती शेतकरी असलेबाबत सातबारा उतारा तिने प्रकरणात दाखल केलेला आहे. तसेच तक्रारदार हिचे पतीचा दिनांक १०-१०-२०१६ रोजी शिरूर येथे अपार्टमेंटच्या बांधकामावर सेंटरींग सुताराचे काम करत असतांना चोथ्या मजल्यावरून पडुन अपघात झाला व त्यात गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरीता माणिकचंद हॉस्पिटल, शिरूर येथे नेले व नंतर आनंद ऋषीजी हॉस्पीटल मध्ये अॅडमीट करण्यात आले. परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांना सिव्हील हॉस्पीटल, अहमदनगर येथे अॅडमीट केले. दिनांक २३-११-२०१७ रोजी त्यांचा मृत्यु झाला. तक्रारदाराने प्रकरणात पोस्ट मार्टम रिपोर्ट दाखल केलेला आहे. तसेच हॉस्पीटलमध्ये होते याबाबतचे कागदपत्र तक्रारदारातर्फे दाखल केलेले आहे. सामनेवाले यांनी तक्रारदाराच्या या कथनाला त्याचे लेखी कैफीयतीमध्ये असा बचाव घेतला की, तकारदार हिचे मयत पतीचा विमा दावा तक्रारदार हिने उशीरा सादर केलेला नाही. विमा दावा सादर करण्यास विलंब झाला आहे. तिला विमा दाव्याचे अटी व शर्तीप्रमाणे विमा कालावधी संपण्याचे तीन महिन्यांचे आत अथवा पॉलिसी कालावधी संपल्यानंतर तीन महिनेचे आत दावा दाखल करणे गरजेचे आहे. परंतु तक्रारदार हिने दिनांक १२-०३-२०१८ रोजी सदरचा विमा दावा दाखल केलेला आहे. सामनेवाले यांनी कैफीयतीमध्ये विमा दावा दिनांक ०६-०४-२०१७ पर्यंत दाखल करणे आवश्यक होते. परंतु तक्रारदार हिने सदर विमा दावा विमा दिनांक १२-०३-२०१८ रोजी दाखल केलेला आहे. तक्रारदाराला पॉलिसीचे अटी व शर्तीनुसार विमा दावा विलंबाने दाखल केलेला आहे, या कारणास्तव विमा दावा नाकारलेला आहे. तसेच सामनेवाले यांनी लेखी युक्तिवादामध्ये खालील न्यायनिवाड्यांचा उल्लेख केला आहे.
- New India Assurance Co.Ltd. Vs. Sh. Deepak Anand, Sole Proprietor. M/s Jennex International Exports [2014(3) CPR 394 (NC)]
- New India Assurance Co.Ltd. Vs. Mrs. Shikha Bhatia & Anr [2013(2) CPR 140 (NC)]
- New India Assurance Co.Ltd. Vs. M/s. Anil Traders [2010(4) CPR 35 (NC)]
परंतु सदरचे न्यायनिवाडे या प्रकरणात लागु पडत नाही. तसेच सामनेवाले यांचे या कथनावर तक्रारदार यांनी त्यांचे लेखी युक्तिवादात असे कथन केले की, तक्रारदार ही तिच्या पतीचे मृत्युनंतर मानसिक स्थिती बरोबर नव्हती व तिला संपुर्ण कागदपत्र जमा करणेसाठी वेळ लागला. यामुळे ९० दिवसानंतर तिने विमा दवा सादर केला, या संपुर्ण कारणामुळे तिला दावा सादर करण्यास उशीर झाला. सदर विमा दावा हा वेळेत दाखल करणे ही बाब Directory असुन Mandatory नाही. तसेच विमा दावा उशीरा दाखल केला व पॉलिसीचे अटीचा भंग केला, असे म्हणता येणार नाही व सदरची अट या प्रकरणात लागु पडत नाही. तक्रारदार यांनी त्यांचा विमा दावा नोडल ऑफीसर यांचेकडे पाठविला म्हणजेच तो सामनेवाले यांना प्राप्त झाला असे ग्रहित धरण्यात येते, कारण नोडेल ऑफीसरने सामनेवालेकडे विमा दावा पाठविणे हि त्यांची जबाबदारी आहे. सदरचा विमा दावा उशीरा प्राप्त झाला, यासाठी तक्रारदारास जबाबदार धरता येणार नाही. तसेच तक्रारदार हिचे पतीचा अपघातात मृत्यु झाला, ही बाब दाखल कागदपत्रांवरून स्पष्ट होते. त्यामुळे सदरची नुकसानीबाबत विमा दाव्याची रक्कम मिळणेस तक्रारदार ही पात्र ठरते. सामनेवाले यांनी चुकीचे कारणाने सदरचा विमा दावा नाकारला आहे व सेवेत त्रुटी दिली आहे. त्यामुळे सदरची तक्रार ही मंजुर करण्यात येत आहे. तक्रारदार ही विमा दावा मिळणेस पात्र ठरते, असे आयोगाचे मत आहे. सबब मुद्दा क्रमांक २ व ३ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
६ मुद्दा क्र. (४) : मुद्दा क्रमांक १, २ व ३ वरील विवेचनावरून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
१. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. |
२. सामनेवाले यांनी तक्रारदारास विमा दाव्याची रक्कम रूपये २,००,०००/- (अक्षरी दोन लाख मात्र) व त्यावर तक्रार दाखल दिनांक ११-०७-२०१८ पासून संपुर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. ९ टक्के दराने व्याज द्यावे. |
३. सामनेवाले यांनी तक्रारदार हिस शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रूपये ७,०००/- (अक्षरी सात हजार) व सदर तक्रार अर्जाचा खर्च रूपये ३,०००/- (अक्षरी तीन हजार) द्यावा. |
४. वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी आदेशाची प्रत मिळण्यापासून ३० दिवसाच्या आत करावी. |
५. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्क देण्यात यावी. |
६. तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी. |