निकाल
दिनांक- 19.06.2014
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली आहे म्हणून नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे, तक्रारदार हे मौजे लवूळ ता.माजलगांव जि.बीड येथे राहतात. तक्रारदार हे शेती व्यवसाय करुन आपल्या कूटूंबाची उपजिवीका भागवतात. सामनेवाले क्र.1 व 2 हे महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनी संस्था असून सदरील विज पुरवठयाचे कामाचे व्यवस्थापन,देखरेख, सुरक्षितता, दुरुती इत्यादी कामे करतात.
तक्रारदार यांचे मौजे लवूळ गांवी सर्व्हे नंबर 14 ही शेत जमिन आहे. तक्रारदार हे सदरील जमिनीत दरवर्षी पिकाची लागवड करुन उत्पन्न घेतात. तक्रारदार यांनी सर्व्हे नंब.14 मध्ये 8 एकर क्षेत्रात सन 2011-12 चे गळीत हंगामात ऊस देण्यासाठी ऊसाची लागवड केली. सदर ऊस पिकास पाणी देण्यासाठी पाईप लाईनची व्यवस्था केलेली आहे. सदर ऊस पिकास पाणी पुरवठा करण्यासाठी सामनेवाले यांनी तक्रारदार यांना विज ग्राहक क्र.585070001932 नुसार विज सेवा पूरविली आहे. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत. तक्रारदार हे विज बिल नियमित भरत आहेत. सामनेवाले यांनी विज पूरवठा डि.पी. संचाची नियमितपणे देखभाल,सूरक्षितता इत्यादी दक्षता घेण्याची जबाबदारी सामनेवाले यांचेवर आहे.
तक्रारदार व त्या भागातील शेतक-यांना विज पूरवठा करण्यासाठी विज पूरवठयाची डि.पी. संच तक्रारदार यांचें सर्व्हे नंबर 14 चे दक्षिणेकडील बांधावर बसवलेले आहे. सदरील विज पुरवठयाची डि.पी. बसवताना तक्रारदार व इतर शेतक-याचे कोणतेही नुकसान होणार नाही यांची हमी सामनेवाले यांनी घेतलेली आहे. तसेच डि.पी. ची नियमित देखभाल करण्याची जबाबदारी सामनेवाले यांची होती.
तक्रारदार यांनी लागवड केलेले ऊस पिक येण्यासाठी मेहनत मशागत केलेली आहे. ऊस पिक अंतीम टप्प्यात आले होते. दि.30.3.2012 रोजी दुपारी 2.30 वाजेचे सुमारास तक्रारदार यांचे सर्व्हे नंबर 14 मध्ये बसवलेल्या विज पूरवठयाची डि.पी. संच विद्यूत वायरमध्ये शार्टसर्किट झाले. थिणगी तक्रारदार यांचे ऊसात पडली. संपूर्ण ऊस जळून खाक झाला. तक्रारदार यांनी सदर घटने बाबत माहीती तात्काळ तहसीलदार यांना दिली. तसेच पोलिस स्टेशन यांना खबर दिली. सामनेवाले यांचे अधिका-यांनाही तक्रारदार यांचे ऊस जळाल्या बाबत खबर देण्यात आली. तहसीलदार यांनी दि.31.3.2012 रोजी प्रत्यक्ष पाहणी करुन पंचनामा केला. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा केला. तक्रारदार यांचे ऊसाचे पिकाचे उत्पादन एकरी 50 टन एवढे निघते. तक्रारदार यांनी 400 टन ऊसाचे नुकसान झाले आहे. प्रत्येकी टनाला रु.2,000/- एवढा भाव मिळतो. तक्रारदार यांचे एकूण रु.8,00,000/- चे नुकसान झाले आहे.
तक्रारदार यांनी पूढे असे कथन केले आहे की, गळीत हंगाम 2013-14 मध्ये तक्रारदार यांनी 8 एकर ऊसाचा खोडावा केला. विद्यूत तारांच्या स्पार्कीगमुळे जळून गेला आहे. त्याकामी तक्रारदार यांचे रु.8,00,000/- चे नुकसान झाले आहे.
तक्रारदार यांनी सामनेवाले यांचें कार्यालयात वेळोवेळी विज तारांची दूरुस्ती करणे बाबत विनंती केली होती. सामनेवाले यांचे कर्मचा-यांनी त्याकडे दूर्लक्ष केले. त्यामुळे विद्यूत वाहक तारामध्ये स्पार्कीग होऊन तक्रारदार यांचा ऊस जळाला आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना नुकसान भरपाई देणेकामी नोटीस पाठविली. सामनेवाले यांनी नुकसान भरपाई देण्यास नकार दिला. तक्रारदार यांची मागणी की, सन 2011-12 व 2013-14 या गळीत हंगामातील तक्रारदार यांचे झालेले नुकसान रक्कम रु.16,00,000/- सामनेवाले यांनी दयावेत व त्यावर 18 टक्के व्याज दयावे असे आदेश देण्यात यावेत.
सामनेवाले हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी नि.14 अन्वये लेखी म्हणणे दाखल केले आहे. सामनेवाले यांचे कथन की, संबधीत शेतक-याच्या मागणीवरुन त्या त्या भागात डि.पी. संच बसवण्यात आलेले आहे. डि.पी. संच हे बांधाच्या शेजारी बसविण्यात आलेले आहे. सदरील डि.पी. वरुन संबंधीत शेतक-याला व्यवस्थीत विज पूरवठा व्हावा यासाठी बसवण्यात आल्या आहेत. सामनेवाले यांनी डि.पी. संचाची नियमित देखभाल केलेली आहे.सामनेवाले यांचे कथन की, तक्रारदार सामनेवाले यांचेकडे कधीही डि.पी. संच व वायरमध्ये दोष आहे या बाबत कळविले नाही. सामनेवाले याचे अधिका-यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली असता त्यांना डि.पी.मध्ये कूठलाही दोष आढळून आला नाही. सदर डि.पी. व तक्रारदार यांचे ऊसाचे पिकत बरेच अंतर आहे. तक्रारदार यांचे ऊसास नुकतीच नवीन फुटवे (पालवी) फुटत होती. सदरील घटना ही एक अपघात आहे. तक्रारदार यांनी खोटे उत्पन्न दाखवले आहे. तक्रारदार यांचे शेतातील फक्त पाचट जळालेले आहे. ऊस जळाल्यानंतर शेतक-यांनी तात्काळ त्यांची माहीती साखर कारखान्याला दयायची असते. सदर साखर कारखाना सदर ऊस ताबडतोब तोडून घेऊन जातात. त्या बाबत तक्रारदार यांनी कोणतीही कारवाई केलेली दिसत नाही. सबब, तक्रारदार यांची तक्रार रदद करण्यात यावी.
तक्रारदार यांनी नि.5 सोबत दस्त हजर केले आहेत. तक्रारदार यांनी मुखत्तार विलास शिंदे यांचे शपथपत्र नि.18 वर दाखल केले आहे. तसेच नि.20 सोबत दस्त हजर केले आहे. तक्रारदार यांनी देविदास वचिष्ठ शिंदे, गजानन शिंदे, रमेश शिंदे, दिलीप राठोड यांचे शपथपत्र दाखल केले आहे. सामनेवाले यांनी मनीष राठोड यांचे नि.15 अन्वये शपथपत्र दाखल केलें आहे. तक्रारदार यांनी लेखी यूक्तीवाद नि.29 वर दाखल केला आहे. तक्रारदार यांचे वकील श्री.कूलकर्णी यांचा यूक्तीवाद ऐकला. सामनेवाले यांचे वकील श्री.पाटील यांचा यूक्तीवाद ऐकला. तक्रारदार व सामनेवाले यांनी दाखल केलेले शपथपत्र व दस्ताचे अवलोकन केले. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रूटी
ठेवी आहे ही बाब तक्रारदार शाबीत करतात काय ? होय
2. तक्रारदार यांचे शेतातील ऊसाचे नुकसान सामनेवाले यांनी
सेवेत त्रूटी ठेवली आहे त्यामुळे झाले आहे ही बाब तक्रारदार
शाबीत करतात काय ? होय.
3. तक्रारदार हे किती नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत ? अंशतः
4. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 ते 3 ः-
तक्रारदार यांचे वकील श्री.कूलकर्णी यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार राधाबाई शिंदे या वयोवृध्द असून त्यांचेमार्फत सदरील तक्रारदार त्यांचे मुख्यत्यार व नातू विलास शिंदे यांनी सदरील तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार यांचे नांवे सर्व्हे नंबर 14 मध्ये 8 एकर शेत जमिन आहे. सदरील शेत जमिनीचे बाबत सामनेवाले यांचे इलेक्ट्रीकल डि.पी. बसवलेली आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून विज पूरवठा घेऊन ऊसाचे पिक केलेले होते. सामनेवाले यांनी विज डि.पी.ची व तारांची व्यवस्थीत देखभाल न केल्यामुळे दि.30.03.2012 रोजी विजेचे तारामध्ये स्पॉर्कीग होऊन त्यांची थिणगी तक्रारदार यांचे ऊसामध्ये पडली. त्यामुळे तक्रारदार यांचे शेतातील 8 एकर ऊस जळून गेला. त्या बाबत सामनेवाले यांचेकडे तक्रार देऊनही त्यांनी योग्य ती काळजी घेतली नाही. सदरील नुकसानी बाबत तक्रारदार यांनी पोलिस निरीक्षक माजलगांव यांचेकडे रितसार तक्रार नोंदविली. तसेच सामनेवाले यांचे सक्षम अधिका-याकडे अर्ज दिला. तहसीलदार यांना सदरील घटने बाबत कळविण्यात आले. तहसीलदार यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सदरील घटनेत तक्रारदार यांचे रु.5,50,000/- चे नुकसान झाले. तक्रारदार यांनी पूढे असा यूक्तीवाद केला आहे की, तक्रारदार यांनी सन 2013-14 मध्ये सदरील शेतात 8 एकर ऊसाचे पिक केले होते. ऊस पिक तोडून गेल्यानंतर शेतात पाचाटाचे आछादन टाकले होते. सदरील डि.पी.तून पून्हा वायरमध्ये स्पॉर्कीग होऊन ती थिणगी पाचाटावर पडली त्यामध्ये तक्रारदार यांचे ऊस जळून गेला. त्यामध्ये तक्रारदार यांचे शेतातील ऊसाचे रु.8,00,000/- चे नुकसान झाले. तक्रारदार यांचे वकील श्री.कूलकर्णी यांनी असा यूक्तीवाद केला की, सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे शेतावर असलेली डि.पी. व ताराची योग्य देखभाल न केल्यामुळे तारा एकमेकांना लागून थिणगी पडून तक्रारदार यांचे शेतातील ऊस जळाला आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली आहे.
सामनेवाले यांचें वकील श्री. पाटील यांनी असा युकतीवाद केला की, सामनेवाले यांचे निष्काळजीपणामुळे ऊसास आग लागली नाही. सामनेवाले यांचे अधिका-यांनी घटनास्थळावर जाऊन निरिक्षण केले असता त्यांना डि.पी. मध्हये व वायरमध्ये कोणताही दोश आढळून आला नाही. सामनेवाले यांचे वकील यांनी असा यूक्तीवाद केला की, तक्रारदार यांचे 7/12 चा उतारा पाहिला असता तक्रारदार म्हणतात तेवढा ऊस शेतामध्ये लावलेला नव्हता. तसेच तक्रारदार यांचे ऊस नेटकाच तूटून गेलेला होता व शेतामध्ये पाचट पडलेले होते. सर्वसाधारण शेतकरी ते पाचट पेटवून देतात व तदनंतर खोडव्याची वाढ होते. सदरील पाचट जळाल्यामुळे तक्रारदार यांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. तक्रारदार यांनी जे फोटोग्राफ दाखल केलेले आहे ते तक्रारदार यांचेच शेतातील ऊसाचे आहेत ही बाब सिध्द केलेली नाही. तसेच काही कारणामुळे ऊस जळाला तर साखर कारखाना तो ऊस ताबडतोब गाळपासाठी घेऊन जातात. त्या बाबतही तक्रारदार यांनी कोणताही पुरावा सादर केलेला नाही. सबब, तक्रारदार यांची तक्रार रदद करण्यात यावी.
संपूर्ण कागदपत्र व पुराव्याचे अवलोकन केले असता तक्रारदार राधाबाई शिंदे यांचे नांवे सर्व्हे क्र.14 मध्ये 6 एकर क्षेत्र असल्याचे दिसून येते. सदरील 6 एकर क्षेत्रामध्ये 4 एकर ऊस लागवड केल्याचे निदर्शनास येते. सदरील सर्व्हे नंबर 14 हा तक्रारदार राधाबाई व शिवाजी काशीनाथ शिंदे यांचे नांवे आहे.7/12 उता-याचे अवलोकन केले असता, ऊस कोणाच्या क्षेत्रामध्ये लागला होता या बाबत स्पष्ट निर्देश केल्याचे दिसून येत नाही. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या अर्जाचे अवलोकन केले असता दि.30.3.रोजी डि.पी.च्या वायरमध्ये स्पॉर्कीग होऊन त्यांची थिणगी ऊसाचे शेतात पडली. त्यामुळे ऊसाला आग लागली ही बाब प्रथमदर्शनी निदर्शनास येते. तक्रारदार यांनी असे कथन केले आहे की, रु.5,00,000/- चे नुकसान झालेले आहे. तक्रारदार यांचे शेतात उभ्या असलेल्या पिकाचे अवलोकन केले असता व 7/12 मध्ये नमूद केल्याप्रमाणे ऊसाचे लागवड क्षेत्र लक्षात घेतले असता तसेच कारखान्याकडून मिळणारा ऊसाचा भाव लक्षात घेता, ऊसाचे वय लक्षात घेता एकरी उत्पादन क्षमता लक्षात घेता व त्यापासून मिळणारे उत्पन्न लक्षात घेता या मंचाचे मत की, दि.30.03.2012 रोजी ऊस जळाला त्यांचे सुमारे रु.2,50,000/- चे नुकसान झाल्याचे निदर्शनास येते. सबब, दि.30.3.2012 रोजी तक्रारदार यांचे शेतातील ऊस जळून नुकसान झाले. त्यांचे नुकसानीसाठी तक्रारदार हे रु.2,50,000/- मिळण्यास पात्र आहेत.
तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पुराव्यावरुन पुढे असे निदर्शनास येंते की, तक्रारदार यांचे शेतात ऊस तोड झाल्यानंतर दि.26.6.2013 रोजी इलेक्ट्रीक वायरच्या तारा एकमेकास घासल्यामुळे थिणगी पडून तोडून नेलेल्या ऊसाचे शेत असलेलया पाचाटाला आग लागली त्यामुळे उगवण्याच्या परिस्थीतीत असलेला ऊस जळून गेला. सदरील घटने बाबत पोलिसांनी केलेल्या पंचनाम्याचे अवलोकन केले असता त्या पंचनाम्यात ऊसाचा खोडवा फूटूण्यासाठी व पाणी कमी लागल्यामुळे ऊसाचे पाचट अंथरलेले होते. खोडवा फूटूण्याचा बेतात होता. त्यावेळी आग लागून शेतातील पाचट जळालेले दिसते. खोडावा चांगला फूटण्यासाठी सर्वसाधारण शेतकरी हे शेतात असलेले पाचट हे पेटवून देतात परंतु तक्रारदार यांनी कमी पाणी लागण्यासाठी सदरील पाचट शेतामध्येच ठेवले होते. परिस्थीतीचे अवलोकन केले असता तक्रारदार यांचे ऊसाचे फार मोठे नुकसान झाले असा निष्कर्ष काढता येत नाही. सदरील ऊसाचे पाचट जळाल्यामुळे खोडवा फुटूण्याचे वेळेस आग लागली व नुकसान झाले. सदरील बाबीचा विचार केला असता तक्रारदार हे नुकसान भरपाई पोटी रक्कम रु.1,00,000/- मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
वर नमुद केलेल्या कारणामिमांसे वरुन या मंचाचे मत की, तक्रारदार हे एकूण नुकसान भरपाई रक्कम रु.3,50,000/- मिळण्यास पात्र आहेत. तसेच मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु.4,000/- व तक्रारीचा खर्च रु.2,000/- मिळण्यास पात्र आहेत.
मुददा क्र.1 ते 3 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2)
3)
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्री.रविंद्र राठोडकर श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड
जयंत पारवेकर
लघुलेखक