निकालपत्र
निकाल दिनांक – ३१/०३/२०२१
(द्वारा मा.सदस्य : श्री.महेश निळकंठ ढाके)
___________________________________________________________
१. तक्रारदार ही मौजे येळी ता.पाथर्डी जि. अहमदनगर येथील रहिवासी आहे. तक्रारदार ही मयत बाबासाहेब जयवंत कराड यांची पत्नी तिचे मयत पतीचे नावे मौजे येळी, ता.पाथर्डी या ठिकाणी गट नंबर ३४१ पैकी ० हे २४ आर या ठिकाणी शेतजमीन मिळकत आहे. तक्रारदार हिचे पतीचा सामनेवाले कंपनीकडे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविला होता. दिनांक १७-०५-२०१६ रोजी तक्रारदार हिचे पती मोटार सायकल नंबर एमएच-१४-डी ८३४२ यावरून नगर-पाथर्डी रोडने बेलश्वर फाटा येथुन सावकाश जात असतांना आशर नंबर एमएच-०४-ईबी-१२७९ या वाहनाने मोटार सायकलला जोराची धडक दिली. त्यात अपघात होऊन तक्रारदार यांचे पती जागीच झाले. सदर अपघाताचे संदर्भात भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ५७/२०१६ अन्वये टेम्पो वरील चालक यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केलेला आहे. तक्रारदार यांचे पतीचे अपघाती मृत्यू झाल्यानंतर सिव्हील हॉस्पीटल, अहमदनगर येथे शवविच्छेदन करण्यात आले. त्यांनतर संपुर्ण कागदपत्रांसहीत सामनेवाले यांचे तालुका कृषी अधिकारी पाथर्डी यांचेकडे विमा दावा दाखल केला. मात्र सामनेवाले यांनी मयताचे नावामध्ये तफावत असल्याने तक्रारदाराची विमा फाईल बंद करण्यात आली, असे पत्राद्वारे कळविले. अशाप्रकारे तक्रारदार यांचा विमा दावा सामनेवाले विमा कंपनीने विनाकारण अडवणुक करून तक्रारदार यांना क्लेमची रक्कम अदा केलेली नाही. म्हणुन तक्रारदाराला सदर तक्रार या आयोगात दाखल करून परिच्छेद क्रमांक ८ प्रमाणे मागणी केली आहे.
२. तक्रारदार यांनी तक्रारीचे पुष्ट्यर्थ निशाणी १ (ड) सोबत कागदपत्रांचे छायांकीत प्रती दाखल केलेल्या आहेत. त्यामध्ये विमा क्लेम फॉर्म, मरणोत्तर पंचनामा, पोस्ट मॉर्टम रिपोर्ट, घटनास्थळ पंचनामा, मयताचा शाळा सोडल्याचा दाखला, नमुना ६ (क) ची प्रत, सातबारा उतारा, ८ अ चा उतारा, सामनेवाले यांना पाठविलेली पत्राची प्रत, तक्रारदाराचे प्रतिज्ञापत्र, मयताचे मतदान कार्ड, विमा कंपनीने विमा क्लेम नाकारलेचे पत्र दाखल आहे.
३. सामनेवाले यांनी त्यांची लेखी कैफीयत निशाणी ५ प्रमाणे दाखल केली आहे. त्यामध्ये सामनेवाले यांनी असे म्हटले आहे की, तक्रारदार हिने विमा दाव्यासोबत दाखल केलेल्या कागपत्रांप्रमाणे विमा दावा पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला. त्यानंतर सदर कागदपत्रांची पडताळणी केली असता मयत बाबासाहेब यांचे नाव रेव्हेन्यु रेकॉर्डवर, पोलीस पेपर्सवर तसेच इतर संबंधीत कागदपत्रांमध्ये वेगळे दिसुन आले. त्यामुळे विमा पॉलिसीचे अटी व शर्तींप्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदाराचा विमा दावा योग्य कारणानाने नाकारुन दिनांक २८-०७-२०१७ रोजीचे पत्राअन्वये कळविले आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत कोणतेही त्रुटी दिली नाही त्यामुळे तक्रारदार यांची तक्रारी खारीज करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
सामनेवाले यांनी निशाणी ९ वर लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे.
४. तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र, शपथपत्र व त्यांचे वकील श्री.एस.बी. मुळे यांनी केलेला युक्तिवाद तसेच सामनेवाले यांनी दाखल केलेले कागदपत्र, शपथपत्र, त्यांचे वकील श्री. ए.के. बंग यांनी केलेला युक्तिवाद यावरून न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांचे उत्तर आम्ही सकारण खालील विवेचनाप्रमाणे देत आहोत.
अ.नं. | मुद्दे | निष्कर्ष |
(१) | तक्ररादार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | होय |
(२) | तक्रारदार नुकसान भरपाईची रक्कम मिळणेस पात्र आहे काय ? | होय |
(३) | आदेश काय | अंतिम आदेशा प्रमाणे |
कारणमिमांसा
५. मुद्दा क्र. (१) : तक्रारदार हिचे मयत पती बाबासाहेब जयवंत कराड यांचा सामनेवाले यांच्याकडे शासनाच्या निर्णयानुसार गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कम रूपये २,००,०००/- चा विमा उतरविला होता, ही बाब सामनेवाले यांना मान्य आहे, यावरून तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहे, हि बाब स्पष्ट होते. सबब मुददा क्र.१ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
६. मुद्दा क्र. (२) - तक्रारदार हिचे पती दिनांक १७-०५-२०१६ रोजी तक्रारदार हिचे पती मोटार सायकल नंबर एमएच-१४-डी ८३४२ यावरून नगर-पाथर्डी रोडने बेलश्वर फाटा येथुन सावकाश जात असतांना आयशर नंबर एमएच-०४-ईबी-१२७९ या वाहनाने मोटार सायकलला जोराची धडक दिली. त्यात अपघात होऊन तक्रारदार यांचे पती जागीच झाले. सदर अपघाताचे संदर्भात भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ५७/२०१६ अन्वये टेम्पो वरील चालक यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केलेला आहे. तक्रारदार यांचे पतीचे अपघाती मृत्यू झाल्यानंतर सिव्हील हॉस्पीटल, अहमदनगर येथे शवविच्छेदन करण्यात आले. त्यांनतर संपुर्ण कागदपत्रांसहीत सामनेवाले यांचे तालुका कृषी अधिकारी पाथर्डी यांचेकडे विमा दावा दाखल केला. मात्र सामनेवाले यांनी मयताचे नावामध्ये तफावत असल्याने तक्रारदाराची विमा फाईल बंद करण्यात आली, असे पत्राद्वारे कळविले
याबाबत सामनेवाले यांनी असा बचाव घेतला की, तक्रारदार हिने विमा दाव्यासोबत दाखल केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली असता मयत बाबासाहेब यांचे नाव रेव्हेन्यु रेकॉर्डवर, पोलीस पेपर्सवर तसेच इतर संबंधीत कागदपत्रांमध्ये वेगळे दिसुन आले. त्यामुळे विमा पॉलिसीचे अटी व शर्तींप्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदाराचा विमा दावा योग्य कारणानाने नाकारुन दिनांक २८-०७-२०१७ रोजीचे पत्रान्वये कळविले आहे.
यासाठी आयोगाने प्रकरणात दाखल केलेले दस्तऐवजांचे अवलोकन केले असता तक्रारदार हिने विमा दाव्यासोबत दाखल केलेल्या काही कागदपत्रांमध्ये सदर प्रतिज्ञापत्रामध्ये तक्रारदार यांनी त्यांचे पती नामे बाबासाहेब जयवंता कराड व बाबासाहेब जयवंत कराड दोन्ही नावाची व्यक्ती एकच असुन त्या अपघातात मयत झालेले तक्रारदार हिचा पती असुन दुसरा कोणी नाही, असे नमुद केले आहे. सदर प्रतिज्ञापत्र नोटरी, भारत सरकार यांचे समोर केलेले आहे. सदरचे प्रतिज्ञापत्राची छायांकीत प्रत तक्रारदार हिने निशाणी १डी/१२ वर दाखल केलेली आहे.
परंतु सदरच्या प्रकरणात तक्रारदार हिने मयताचे नाव बाबासाहेब जयवंत कराड होते, हे सिध्द करणारे कागदपत्र किंवा शपथपत्र दाखल करणे गरजेचे होते. परंतु तसे केले नाही. मात्र युक्तिवादादरम्यान सामनेवाले यांच्या वकिलांनी असे सांगितले की, तक्रारदाराने दोन्ही नाव एकाच व्यक्तीचे आहेत ही बाब स्पष्ट करण्यासाठी शपथपत्र दिले तर क्लेमची रक्कम देण्यास हरकत नाही. त्यामुळे तक्रारदार हिने सामनेवाले यांच्याकडे Indeminity Bond सामनेवाले यांच्या नियमाप्रमाणे भरून द्यावा. भविष्यात काही नावावरून वाद उपस्थित झाला तर सदरची क्लेमची रक्कम तक्रारदार भरून देईल, असे नमुद असणे गरजेचे आहे. त्यामुळे सामनेवाले यांच्याकडे सदरचा Bond करून द्यावा व त्यानंतर सामनेवाले यांनी तक्रारदार हिला विमा दाव्याची रक्कम द्यावी, या निष्कर्षाप्रत हा आयोग येत आहे.
तक्रारदार हिच्या पतीचा अपघाती मृत्यु झाला व त्याचा विमा योजनेअंतर्गत विमा उतरविला होता. त्यामुळे तक्रारदार हि विमा दाव्याची नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यास पात्र ठरते, असे आयोगाचे मत आहे.
वरील विवेचनावरून सामनेवाले यांनी विमा दावा नाकारला, यासाठी तक्रारदाराला मानसिक त्रास झाला, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे तक्रारदाराची सदरची मागणी देता येणार नाही. मात्र विमा दाव्याची रक्कम तक्रारदार हि मिळण्यास पात्र ठरते. सबब मुद्दा क्रमांक २ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
७. मुद्दा क्र. (३) : मुद्दा क्रमांक १ व २ वरील विवेचनावरून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
१. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. |
२. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना Indeminity Bond नियमाप्रमाणे करून द्यावा. सदरचा Bond सामनेवाले यांना प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसाचे आत सामनेवाले यांनी विमा दाव्याची रक्कम रूपये २,००,०००/- (अक्षरी दोन लाख मात्र) तक्रारदार हिस द्यावी व ती रक्कम मुदतीत न दिल्यास त्यावर आदेशाच्या दिनांकापासुन रक्कम प्राप्त होईपर्यंत द.सा.द.शे. ९ टक्के दराने व्याज द्यावे. |
३. तक्रारदार हिने शारीरिक, मानसिक व आर्थिक खर्च स्वतः सहन करावा. |
४. वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी आदेशाची प्रत मिळण्यापासून ३० दिवसाच्या आत करावी. |
५. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्क देण्यात यावी. |
६. तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी. |