निकालपत्र
निकाल दिनांक – १८/०१/२०२०
(द्वारा मा.सदस्या : श्रीमती.चारु विनोद डोंगरे)
___________________________________________________________
१. तक्रारदार ही मौजे कोल्हार बु., तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी आहे. तक्रारदार ही मृतक संतोष रामदास लोंढे याची आई आहे. तक्रारदाराचे नावे शेतजमीन गट नंबर ९६६/३, मौजे कोल्हार बु. ता.राहुरी, जि.अहमदनगर येथे आहे. तक्रारदार हिचा मुलाचा सामनेवाले यांच्याकडे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविला होता. दिनांक ३१-०७-२०१७ रोजी सकाळी ६.३० वाजचे सुमारास कोल्हार खु. शिवारातुन व चिंचोली गावचे शिवारातून हॉटेल कोहिनूर समारून नगर-मनमाड रोडने पायी जात असतांना समोरून येणा-या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली व तक्रारदार हिचे मुलाचा अपघात झाला. त्यामध्ये तो गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यु झाला. त्यानंतर त्याचे ग्रामीण रूग्णालय, राहुरी, जि.अहमदनगर येथे शवविच्छेदन करण्यात आले. सदरहु घटनेची खबर राहुरी पोलीस स्टेशन यांना देण्यात आली. त्यानुसार गुन्हा र.नं. I २७८/२०१७ नोंदविण्यात आला. त्यानंतर तक्रारदार हिने संपुर्ण कागदपत्रांसह सामनेवाले यांच्याकडे विमा दावा सादर केला. मात्र सामनेवाले यांनी विमा दावा नाकारला. त्यामुळे तक्रारदार हिने मंचात तक्रार दाखल केली व परिच्छेद क्रमांक ६ प्रमाणे मागणी केली आहे.
२. सामनेवाले यांनी त्यांची लेखी कैफीयत प्रकरणात दाखल केली. सदरहु लेखी कैफीयतीमध्ये त्यांनी तक्रारदार हिच्या मुलाचा विमा उतरविला होता व सदरहु विम्याचा कालावधी मान्य केलेला आहे. सामनेवाले यांनी त्यांच्या लेखी कैफीयतीत असा बचाव घेतला की, तक्रारदार यांनी क्लेम सादर करतांना सातबारा उतारा व फेरफार दाखल केला नाही. त्यामुळे तक्रारदार हिचे मुलगा ज्यावेळी पॉलिसी उतरविण्यात आली त्यावेळी शेतकरी होते, हे बाब स्पष्ट झाली नाही. पॉलीसीच्या अटी व शर्तीनुसार ज्यावेळी पॉलिसी उतरविली होती, त्यावेळी शेतकरी असणे आवश्यक आहे. त्यामुळे सामनेवाले यांनी पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार सदरचा विमा दावा नामंजुर केला. यामध्ये सामनेवाले यांनी तक्रारदाराला सेवेत त्रुटी दिली नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी, अशी विनंती सामनेवाले यांनी केली आहे.
३. तक्रारदार हिने दाखल केलेले कागदपत्र, शपथपत्र व त्यांचे वकील श्री.नितीन काळे यांनी दाखल केलेला लेखी युक्तिवाद व तोंडी युक्तिवाद तसेच सामनेवाले यांनी दाखल केलेले कागदपत्र, शपथपत्र व त्यांचे वकील श्री.अशोक के. बंग यांनी केलेला युक्तिवाद यावरून न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांचे उत्तर आम्ही सकारण खालील विवेचनाप्रमाणे देत आहोत.
अ.नं. | मुद्दे | निष्कर्ष |
(१) | तक्ररादार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | होय |
(२) | सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवेत त्रुटी दिली आहे काय ? | होय |
(३) | तक्रारदार नुकसान भरपाईची रक्कम मिळणेस पात्र आहे काय ? | होय |
(४) | आदेश काय | अंतिम आदेशा प्रमाणे |
कारणमिमांसा
४. मुद्दा क्र. (१) : तक्रारदार ही मौजे कोल्हार बु., तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी आहे. तक्रारदार हिचे मुलाचा रोड अपघातात जखमी होऊन मृत्यू झाला व तक्रारदार हिचे मृतक मुलाचे नावे शेतजमीन गट नंबर ९६६/३, मौजे कोल्हार बु. ता.राहुरी, जि. अहमदनगर येथे आहे.ही बाब सिध्द करणेसाठी तक्रारदार हिने सातबारा उतारा दाखल केला आहे. यावरून मृतक शेतकरी होते, ही बाब सिध्द होते. शासन निर्णयाप्रमाणे शेतक-यांचा सामनेवाले यांच्याकडे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अतंर्गत विमा उतरविण्यात येतो, ही बाब सामनेवाले यांना मान्य आहे. तसेच तक्रारदार ही मृतक मुलाची आई असुन वारस प्रकाराची नोंदवहीची छायांकीत प्रत तक्रारदार हिने दाखल केली आहे. यावरून स्पष्ट होते की, तक्रारदार ही मृतकाची वारस म्हणून तिने सदर तक्रार दाखल केली आहे व त्या अनुशंगाने तक्रारदार ही सामनेवाले यांची ग्राहक आहे, ही बाब सिध्द होते. सबब मुददा क्र.१ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
५. मुद्दा क्र. (२ व ३) - तक्रारदार हिने तिच्या मुलाच्या मृत्यु दिनांक ३१-०७-२०१७ नंतर सामनेवाले यांच्याकडे संपुर्ण कागदपत्रांसह विमा दावा सादर केला. परंतु सामनेवाले यांनी विमा दाव्यासोबत सातबारा उतारा व फेरफार नोंद सादर केली नाही. त्यामुळे तक्रारदार हिचे मुलगा ज्यावेळी पॉलिसी उतरविण्यात आली त्यावेळी शेतकरी होता, ही बाब दिसुन येत नाही म्हणुन नाकारला. परंतु प्रकरणाचे अवलोकन केले असता दाखल कागदपत्राप्रमाणे तक्रारदार हिने तिचा मुलगा शेतकरी असलेबाबतचा पुरावा म्हणुन सातबारा उतारा सादर केला आहे. त्यामध्ये तक्रारदार हिचे मयत मुलाचे नाव नमुद आहे. तसेच फेरफारची नोंदवहीमध्ये तक्रारदार हिचे पतीचे मृत्युनंतर तिचे व इतर ४ वारसांची नोंद ८ (अ) च्या उता-यावर केली आहे. तसेच फेरफार नोंदवहीमध्ये तक्रारदार हिचे मयत मुलाच्या नावे आहे. यावरून ही बाब स्पष्ट होत की, संपुर्ण आवश्यक दस्तऐवजामध्ये तक्रारदार हिचे मयत मुलाचे नाव नमुद आहे. त्यामुळे सामनेवालेने घेतलेला बचाव हा ग्राह्य धरता येणार नाही. तसेच तक्रारदार हिने तिच्या लेखी युक्तिवादासाठी मा. महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई यांचे औरंगाबाद खंडपीठ यांचा पुढील न्यायनिवाडाचा आधार घेतला आहे.
FA No.116/2014 – Dt.11-07-2014
The United India Insurance Co.Ltd. Vs. Sayyad Ismail s/o
Sayyad Khudboddin
यामध्ये निर्णीत केले आहे की, सदरची पॉलिसी ही शासनाने समाजातील शेतक-यांसाठी सोशल वेलफेअर स्किमनुसार काढलेली आहे. तसेच शासनाच्या जी.आर.मध्ये हि बाब नमुद नाही. त्यामुळे करारनाम्यामधील अट ग्राह्य धरण्यात येणार नाही. सदरची अट योग्य नाही व विमाधारक हा शेतकरी आहे, ही बाब सातबारा उता-यावरून स्पष्ट झाली आहे. त्यामुळे सदरहू अपील हे नामंजुर करण्यात आली. यावरून सामनेवाले यांनी घेतलेला बचाव की, ज्यावेळी पॉलिसी उतरवीली त्यावेळी तक्रारदार हिचे मुलाचे नाव शेतकरी म्हणुन सातबारा उता-यावर नव्हते म्हणुन वीमा दावा देता येणार नाही, हे कारण संयुक्तीक नाही. तक्रारदार हिने सदर तक्रारीत दाखल केलेल्या कागदपत्रावरून तक्रारदार हिचे मयत मुलाच्या नावाची नोंदणी कागदपत्रांवर केलेली आहे. त्यामुळे पॉलिसी उतरवीली त्यावेळी तक्रारदार हिचा मुलगा शेतकरी होता, हे दाखल कागदपत्रांवरून स्पष्ट होते. सामनेवाले यांनी घेतलेला बचाव ग्राह्य धरता येणार नाही. सामनेवाले यांनी चुकीचे कारणाने विमादावा नाकारला आहे. अशाप्रकारे सामनेवाले यांनी सेवेत त्रुटी दिली ही बाब स्पष्ट होते.
६. तक्रारदार हिचे मुलाचा अपघातात मृत्यू झाला, ही बाब पोलीस पेपर्सवरून स्पष्ट झाली आहे व त्याविषयी सामनेवाले यांच्यात कोणताही वाद नाही. सबब संपुर्ण कागदपत्रांवरून तक्रारदार हिने तिची तक्रार सिध्द केली आहे. त्यामुळे तक्रारदार ही विमा दाव्याची नुकसान भरपाईची रक्कम विमा दावा नाकारल्याच्या दिनांकापासुन व्याजासह मिळण्यास पात्र ठरते, या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब मुद्दा क्र.२ व ३ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
तक्रारदार हिला सदरची तक्रार सामनेवाले यांनी विमा दावा नाकारला म्हणुन मंचात तक्रार दाखल करावी लागली. त्यासाठी तिला मानसिक व शारीरिक त्रासही सहन करावा लागला, या त्रासापोटी काही रक्कम तक्रारदार हिस देणे न्यायाचे ठरेल.
७. मुद्दा क्र. (४) : मुद्दा क्रमांक १, २ व ३ वरील विवेचनावरून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
१. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. |
२. सामनेवाले यांनी तक्रारदारास विमा दाव्याची रक्कम रूपये २,००,०००/- (अक्षरी दोन लाख मात्र) व त्यावर दिनांक १३-०४-२०१८ पासून संपुर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. ९ टक्के दराने व्याज द्यावे. |
३. सामनेवाले यांनी तक्रारदार हिस शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रूपये ५,०००/- (अक्षरी पाच हजार) व सदर तक्रार अर्जाचा खर्च रूपये ३,०००/- (अक्षरी तीन हजार) द्यावा. |
४ वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी आदेशाची प्रत मिळण्यापासून ३० दिवसाच्या आत करावी. |
५. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्क देण्यात यावी. |
६. तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी. |