निकाल
दिनांक- 03.03.2014
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार व्यंकटेशन पंडीतराव मस्के यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे,मयत पंडीत सुर्यभान मस्के हे तक्रारदार यांचे पिता होते. दि.10.02.2013 रोजी सकाळी 6.30 वाजेचे सुमारास मयत हे सावळेश्वर ते कळंब रोडवर सावळेश्वर गावाच्या पूढे पुलाजवळ रोडच्या कडेन घराकडे येत होते. कळंब रोडवरुन पांढ-या रंगाची महेंद्रा मॅस जिप जिचा नंबर एम.एच.25 आर 2459 पॅसेजर घेऊन भरधाव वेगाने आली. चालकाचा वाहनावरील ताबा सूटला. सदरील वाहनाने तक्रारदार यांचे वडिलांना पाठीमागून जोराची ठोस मारली. तक्रारदार यांचे वडील हे गंभीर जखमी होऊन रोडवर पडले. तक्रारदार व इतर नातेवाईकांनी मयत पंडीत यांना खाजगी वाहनाने दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी ते मयत झाल्याचे सांगितले. सदरील अपघाता बाबत दि.10.02.2013 रोजी पोलिस स्टेशन वडगांव ता.केज मध्ये तक्रार देण्यात आली. पोलिसांनी वाहन चालक रविंद्र जगदाळे यांचे विरुध्द वाहन निष्काळजीपणे चालविले व अपघात केला म्हणून तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा तयार केला. मयत पंडीत यांचा इन्व्क्वेस्ट पंचनामा केला. प्रेत शवविच्छेदनासाठी पाठविले. तक्रारदार यांनी जनता शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत क्लेम मिळावा म्हणून रितसर अर्ज कृषी अधिकारी यांचेकडे दिला. मयत पंडीत हे व्यवसायाने शेतकरी होते. त्यांचे नांवे मौजे सावळेश्वर ता.केज येथे शेत जमिन नोंदविल्या होत्या. कृषी अधिकारी यांनी क्लेम स्विकारल्यानंतर सर्व कागदपत्र ब्रोकर्स कंपनी म्हणजे सामनेवाले क्र.2 यांचेकडे पूढील कार्यवाहीसाठी पाठविले. सदरील क्लेम व दस्ताऐवज सामनेवाले क्र.3 विमा कंपनीकडे क्लेम मंजूर करण्यासाठी पाठविण्यात आला.सामनेवाले क्र.3 यांनी दि.18.04.2013 रोजी तक्रारदार यांचा क्लेम नामंजूर केला. क्लेम नामंजूर करण्याचे कारण मयत पंडीत हे वयोमर्यादा वर्ष 10 ते 75 मध्ये बसत नाही असे लिहिलेले आहे. तक्रारदार यांचे वडिलांचे वय 59 वर्षाचे होते. तक्रारदार यांचे वडिलांचे वया बाबत शवविच्छेदन अहवाल व मृत्यू प्रमाणपत्रामध्ये नोंद केलेली आहे. सामनेवाले क्र.3 यांनी कोणत्याही योग्य व वाजवी कारणासाठी तक्रारदार यांचा क्लेम नाकारला आहे. सबब, तक्रारदार यांनी विनंती केली आहे की, शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत रक्कम रु.1,00,000/- व त्यावर व्याज देण्याचे आदेश सामनेवाले क्र.3 विमा कंपनीला देण्यात यावेत. तसेच तक्रारदार यांनी शारिरीक व मानसिक स्वरुपाचा त्रास सोसावा लागलेला आहे. त्या बाबतही नुकसान भरपाई मिळावी.
सामनेवाले क्र.1 हे मंचासमोर हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे.सामनेवाले क्र.1 यांचे कथन की, तक्रारदार यांचे वडील हे दि.10.02.2013 रोजी अपघातामध्ये मयत झाले. मयत हे व्यवसायाने शेतकरी होते. त्रकारदार यांनी विमा क्लेम सामनेवाले क्र.1 यांचेकडे दाखल केला. सामनेवाले क्र.1 यांनी संपूर्ण कागदपत्र सामनेवाल क्र.2 मार्फत सामनेवाले क्र.3 यांचेकडे दि.20.03.2013 रोजी पाठविले. सामनेवाले क्र.1 यांनी सेवेत कोणतीही त्रूटी ठेवलेली नाही.
सामनेवाले क्र.2 हे मंचासमोर हजर झाले. सामनेवाले क्र.2 यांचे कथन की, ते विमा विनियामक व विकास प्राधिकरण मान्यताप्राप्त विमा सेवा देणारी संस्था आहे.ते मध्यस्थ म्हणून काम करतात. कृषी अधिका-याकडून मिळालेला क्लेमची छाननी करणे, कागदपत्राची पूर्तता करुन घेऊन तो विमा कंपनीकडे पाठविण्याची सेवा देण्याचे काम करतात. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत कोणतीही त्रूटी ठेवलेली नाही.
सामनेवाले क्र.3 विमा कंपनी हे मंचासमोर हजर झाले. सामनेवाले क्र.3 यांचे कथन की, मयत यांचे वय 75 पेक्षा जास्त असल्यामुळे तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाहीत. सामनेवाले क्र.3 यांनी योग्य व रास्त कारणासाठी क्लेम नाकारला आहे. तक्रारदार यांचे वडिलांची हमी विमा पॉलिसी अंतर्गत नियमामध्ये बसत नसल्यामुळे सामनेवाले क्र.3 हेक नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाहीत. सबब, तक्रारदार यांची तक्रार रदद करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
तक्रारदार यांनी नि.4 सोबत दाखल केलेले दस्ताचे अवलोकन केले. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्राचेक अवलोकन केले. सामनेवाले क्र.2 व 3 यांनी दाखल केलेल्या शपथपत्राचे अवलोकन केले. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. सामनेवाले यांनी विमा रक्कम न देऊन सेवेत त्रुटी केली
आहे ही बाब तक्रारदार शाबीत करतात काय ? होय.
2. तक्रारदार हे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत
रक्कम मिळण्यास पात्र आहेत काय ? होय.
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2 ः-
तक्रार व तक्रारीसोबत दाखल केलेले कागदपत्र तसेच सामनेवाले यांनी दाखल केलेले शपथपत्र यांचे अवलोकन केले असता, तक्रारदार यांचे वडिलांचा अपघातात मृत्यू झाल्या बाबत वाद नाही. तक्रारदार यांचे वडील व्यवसायाने शेतकरी हाते या बाबतही वाद नाही. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 कडे क्लेम दाखल केला. तो क्लेम सामनेवाले क्र.2 मार्फत सामनेवाले क्र.2 यांचेकडे पाठविला या बाबतही वाद नाही.
सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदार यांचा क्लेम खालील कारणासाठी नामंजूर केला आहे. मयत पंडीत यांचे वय हे 75 वर्षा पेक्षा जास्त होते. त्यामुळे शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत ज्या शर्ती व अटी आहेत त्यानुसार मयत शेतक-याचे वय 75 वर्षा पेक्षा जास्त असल्यास त्यांला शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळू शकत नाही असे सामनेवाले क्र.3 यांचे कथन आहे. सामनेवाले क्र.3 यांचे वकील श्री. वाघमारे यांनी या मंचाचे लक्ष मयत पंडीत मस्के यांनी भारत निवडणूक आयोग यांनी दिलेले ओळखपत्र दाखल केले व असा यूक्तीवाद केला की, मयत पंडीत हे दि.01.01.2006 रोजी 77 वर्ष वयाच होते. म्हणजेच अपघात ज्या दिवशी झाला व ते मयत झाले त्या दिवशी त्यांचे वय 80 वर्षा पेक्षा जास्त होते. सबब, ते शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत लाभ् मिळण्यास पात्र नाहीत.
तक्रारदार यांचे वकिलांनी या मंचाचे लक्ष तक्रारदार यांनी दाखल केलेला मृत्यूचा दाखला, पोलिसांनी दिलेली खबर, इन्क्वेस्ट पंचनामा व शवविच्छेदन अहवाल यावर वेधले व मयत पंडीत यांचे वय ते मयत झाले त्यादिवशी 59 वर्ष होते असे निदर्शनास आणले. सदरील दस्ताऐवज यांचे अवलोकन केले असता मयत पंडीत यांचे वय 59 वर्ष दर्शवलेले आहे.
या मंचापूढे असा प्रश्न उपस्थित झाला की, भारतीय निवडूणक आयोग यांचेमध्ये दिलेले वय ग्राहय धरावे काय अगर तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेले दस्ताऐवज मध्ये नमूद केलेले वय ग्राहय धरावे. निवडणूक आयोगाने जे ओळखपत्र दिले आहे ते देत असताना जन्म तारीख बाबत दाखला घेतला जात नाही. सर्वसाधारणपणे अंदाजे वय त्यामध्ये नमूद केलेले असते. प्रत्यक्ष वयामध्ये फरक असू शकतो. तक्रारदार यांनी दाखल केलेला दस्त म्हणजे इन्क्वेस्ट पंचनामा, शवविच्छेदन अहवाल व इतर कागदपत्र यांचे अवलोकन केले असता मयत पंडीत यांचे वय 59 वर्षाचे होते ही बाब निदर्शनास येते. मयत पंडीत यांना चार वारसदार आहेत. ग्रामपंचायत कार्यालयाने जे प्रमाणपत्र दिले आहे त्यामध्ये रमाबाई शहाजीराव आपटे ही सर्वात मोठी मूलगी आहे व तिचे वय 45 दर्शवलेले आहे. सदरील वयाचा विचार केला असता मयत पंडीत यांचे वय 75 वर्षा पेक्षा कमी आहे हे निदर्शनास येते. सबब, सामनेवाले क्र.3 यांचे वकिलांनी केलेला यूक्तीवाद की पंडीत यांचे वय मृत्यू समयी 75 वर्षा पेक्षा जास्त होते हे ग्राहय धरता येत नाही. सबब, या मंचाने सर्व कागदपत्राचे अवलोकन केले असता मयत पंडीत यांचे वय 75 वर्षा पेक्षा कमी आहे ही बाब सिध्द होते. म्हणून तक्रारदार हे शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत रक्कम रु.1,00,000/- मिळण्यास पात्र आहेत. सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदार यांचा क्लेम नाकारुन सेवेत त्रूटी ठेवलेली आहे. तक्रारदार यांना सदरील तक्रार दाखल करावी लागली त्यामुळे तक्रारदार यांना शारीरिक व मानसिक झाला व खर्च करावा लागा म्हणून शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.1500/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/- मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत.
मुददा क्र.1 ते 3 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2) सामनेवाले क्र.3 यांना आदेश देण्यात येतो की,तक्रारदार यांना
शेतकरी अपघात विमा रक्कम रु.1,00,000/- निकाल
कळाल्यापासून 30 दिवसांचे आंत या मंचात भरावी, रक्कम न
दिल्यास वरील रक्कमेवर दि.26.9.2013 पासून ते संपूर्ण रक्कम
मिळेपर्यत द.सा.द.शे.9 टक्के प्रमाणे व्याज दयावे.
3) सामनेवाले क्र.3 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदार यांना
मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु.1,500/- व तक्रारीच्या
खर्चापोटी रु.1000/- दयावेत.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड
जयंत पारवेकर
लघुलेखक