निकाल
दिनांक- 16.01.2014
(द्वारा- श्री.विनायक लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार विजुबाई महादेव आडागळे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे, म्हणून नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे, तक्रारदार हे मौजे महासांगवी ता.पाटोदा जि.बीड येथील रहिवाशी असून तक्रारदार यांचे उदरनिर्वाहचे साधन शेती आहे. तक्रारदार यांचे पती नामे महादेव आडागळे यांचा दि.13.06.2010 रोजी सर्पदंशाने निधन झाले. सदरील अपघात हा पाटोदा पोलीस स्टेशन अंतर्गत झाला. सदरील अपघातची खबर पाटोदा पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलीसांनी घटनेची चौकशी करुन फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 174 अन्वये मरणोत्तर पंचनामा, घटनास्थळ पंचनामा केला. तक्रारदार यांचे पती हे व्यवसायाने शेतकरी होते. महाराष्ट्र शासनाने सर्व शेतक-यांसाठी कल्याणकारी योजनेअंतर्गत शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना सुरु केलेली आहे. सामनेवाला क्र.3 यांचेकडे महाराष्ट्रातील सर्व शेतक-यांचा विमा काढलेला आहे. अपघातात मयत झालेल्या शेतक-यास कृषी अधिकारी यांच्या मार्फत क्लेम फॉर्म भरुन तो क्लेम फॉर्म सामनेवाला क्र.2 मार्फत सामनेवाला क्र.3 इन्शुरन्स कंपनीकडे पाठवायचा असतो. तक्रारदार यांचे पती मयत झाल्यानंतर तक्रारदार यांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी सामनेवाला क्र.1 यांच्याकडे रितसर अर्ज केला. सामनेवाला क्र.1 यांनी सामनेवाला क्र.2 यांच्याकडे तो अर्ज पाठविला. सामनेवाला क्र.2 यांनी तो प्रस्ताव सामनेवाला क्र.3 यांच्याकडे पाठविला. तक्रारदार यांनी क्लेम कामी संपूर्ण पुर्तता केलेली असतानाही सामनेवाला यांनी त्यावर काही कारवाई केली नाही, सदरील क्लेम दाखल केल्यानंतर त्यावर एक महिन्याच्या आत कारवाई करणे सामनेवाला यांच्यावर बंधनकारक आहे. सबब तक्रारदार यांना शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कम रु.1,00,000/- मिळणेकामी व तक्रारदार यांना झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
सामनेवाला क्र.1 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी आपले लेखी निवेदन सादर केले. सामनेवाला क्र.1 यांचे कथन की, तक्रारदार यांचा शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा प्रस्ताव हा पुढील कारवाईसाठी सादर केलेला आहे. तक्रारदार यास सामनेवाला क्र.1 यांनी वेळोवेळी सहकार्य केलेले आहे. सामनेवाला 1 यांचेकडे तक्रारदार यांची कोणतीही प्रस्तावाची कारवाई प्रलंबित नाही.
सामनेवाला क्र.2 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी आपले लेखी निवेदन सादर केले. सामनेवाला क्र.2 यांचे कथन की, ते मध्यस्थ सल्लागार म्हणून शासनास विनामोबदला सहाय्य करतात. शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना राबविण्यासाठी सामनेवाला क्र.2 हे कृषी अधिकारी अगर तहसिलदार यांच्याकडून आलेले प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्यात काही अपुर्तता आहे काय? याची छाननी करुन त्या प्रस्तावाची पुर्तता करुन घेऊन विमा कंपनीकडे पाठविण्याचे काम करतात. त्या कामी ते कोणताही मोबदला घेत नाही. सामनेवाला क्र.2 यांचे कथन की, तक्रारदार यांचा प्रस्ताव सामनेवाला क्र.2 यांना प्राप्त झालेला नाही त्यामुळे त्यांनी सेवेत त्रुटी ठेवलेली नाही.
सामनेवाला क्र.3 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे सादर केले. सामनेवाला क्र.3 यांचे कथन की, तक्रारदार यांनी क्लेम दाखल करण्याचे कागदपत्राची पुर्तता केली नाही. सदरील कागदपत्र दि.14.08.2011 पर्यंत सामनेवाला यांच्याकडे दाखल केले नाही. म्हणून तक्रारदार यांचा क्लेम नामंजूर केला आहे. तक्रारदार यांचा क्लेम हा कालबाहय असल्यामुळे तक्रारदार यांना सदरील तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडले नाही.सबब सामनेवाला क्र.3 यांची विनंती की, तक्रारदार यांचा अर्ज रदद करण्यात यावा.
तक्रारदार यांचे स्वतःचे शपथपत्र मंचासमोर हजर केले.तसेच निशाणी 4 अन्वये कागदपत्र हजर केले. सामनेवाला क्र.3 यांनी सक्षम अधिकारी शिवाजी उलमुले यांचे शपथपत्र दाखल केले. तक्रारदार यांचे वकील श्री.धांडे व सामनेवाला क्र.3 यांचे वकील श्री.जाधव यांचा युक्तीवाद ऐकला. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर 1) तक्रारदार यांचा क्लेम नाकारुन सामनेवाला क्र.3
यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे, ही बाब तक्रारदार
यांनी शाबीत केली आहे काय? होय.
2) तक्रारदार हे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा
योजनेअंतर्गत रक्कम मिळण्यास पात्र आहे काय? होय. 3) आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुददा क्र.1 ते 3 ः- तक्रारदार यांचे वकील श्री.धांडे यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांचे पती सर्पदंशाने मयत झाले. तक्रारदार यांचे पती शेती करुन उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या नावे शेतजमिन नोंदलेली आहे. तक्रारदार यांचे पती मयत झाल्यानंतर तक्रारदार यांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कम रु.1,00,000/- मिळण्यासाठी सामनेवाला क्र.1 यांच्याकडे क्लेम दाखल केला व सोबत सर्व कागदपत्राची पुर्तता केली. तो क्लेम सामनेवाला क्र.3 यांना प्राप्त होऊनही सामनेवाला क्र.3 यांनी सदरील योजनेअंतर्गत प्रस्ताव मंजूर केला नाही व तक्रारदार यांना शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कम प्रदान केली नाही. सदरील प्रस्ताव नामंजूर करण्यास कोणतेही संयुक्तिक कारण घडलेले नाही.
सामनेवाला यांचे वकील श्री.जाधव यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांनी आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता न केल्यामुळे तक्रारदार यांचा क्लेम नामंजूर करण्यात आला आहे. सबब तक्रारदार यांची तक्रार रदद करण्यात यावी.
वर नमुद केलेला युक्तीवाद लक्षात घेतला. तसेच तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र व शपथपत्राचे अवलोकन केले. सामनेवाला क्र.3 यांनी दाखल केलेल्या शपथपत्राचे अवलोकन केले. तक्रारदार यांचे पती महादेव आडागळे हे दि.13.06.2010 रोजी सर्पदंशाने मयत झाले. सदरील बाब ही तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पोलीस पेपरवरुन सिध्द होते. तक्रारदार यांच्या पतीच्या नावे मौजे महासांगवी तालुका पाटोदा या ठिकाणी शेतजमिन नोंदवलेली आहे. सबब तक्रारदार यांचे पती हे व्यवसायाने शेतकरी होते. महाराष्ट्र शासनाने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत सामनेवाला क्र.3 यांच्याकडे विम्याची रक्कम भरलेली आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांच्याकडे सदरील शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत लाभ मिळावा म्हणून क्लेम सादर केलेला आहे व त्या सोबत सर्व कागदपत्राची पुर्तता केलेली आहे. तो क्लेम सामनेवाला क्र.3 यांना प्राप्त झालेला आहे. सामनेवाला क्र.3 यांनी तो प्रस्ताव केवळ कागदपत्र मुदतीत मिळाले नाही म्हणून नाकारलेला आहे. महाराष्ट्र शासनाने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना ही शेतक-यांच्या हितासाठी राबविलेली आहे. बरेचशे शेतकरी हे अशिक्षित असल्यामुळे व त्यांना कायद्याचे ज्ञान नसल्यामुळे त्यांच्याकडून प्रस्ताव दाखल करण्यास विलंब होतो. तो प्रस्ताव कृषी अधिकारी अगर तहसिलदार यांच्याकडे दाखल केला जातो, कृषी अधिकारी अगर तहसिलदार यांनी प्रस्तावासोबत योग्य ते कागदपत्र सादर केले आहे किंवा नाही, याची छाननी करणे गरजेचे असते. ब-याच वेळेला कागदपत्राची पुर्तता करुन घेतली जात नाही. त्यामुळे क्लेम दाखल करण्यास विलंब होतो. केवळ त्या कारणावरुन तक्रारदार यांचा क्लेम नाकारणे संयुक्तिक नाही.सबब या मंचाचे मते सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदार यांचा क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवलेली आहे. तक्रारदार हे सामनेवाला क्र.3 यांच्याकडून शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कम रु.1,00,000/- मिळण्यास पात्र आहे. तसेच तक्रारदार यांना झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.1500/- व तक्रारीचा खर्च रु.1,000/- मिळण्यास पात्र आहे. सबब मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2) सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदारास शेतकरी व्यक्तीगत अपघात
विमा योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम रु.1,00,000/-(अक्षरी रु. एक
लाख) निकाल कळाल्यापासून 30 दिवसाचे आत द्यावी. सदर रक्कम
विहीत मुदतीत न दिल्यास संपूर्ण रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून
वसूल होईपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज द्यावे.
3) सामनेवाला क्र.3 यांनी, तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरिक
त्रासापोटी रक्कम रु.1500/- व तक्रारीचा खर्च रु.1,000/-द्यावे.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य अध्यक्ष