Maharashtra

Latur

CC/40/2021

विजय कुमार विठोबा खेडेकर - Complainant(s)

Versus

कार्यकारी अभियंता, म. रा. वि. वि. कं. लि. - Opp.Party(s)

अ‍ॅड. एम. ए. शिंदे

18 Apr 2024

ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
जिल्‍हा परिषदेचे गेट क्र.2 शेजारी, लातूर - 413512
 
Complaint Case No. CC/40/2021
( Date of Filing : 04 Feb 2021 )
 
1. विजय कुमार विठोबा खेडेकर
f
...........Complainant(s)
Versus
1. कार्यकारी अभियंता, म. रा. वि. वि. कं. लि.
f
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Amol B. Giram PRESIDENT
 HON'BLE MRS. Rekha R. Jadhav MEMBER
 HON'BLE MR. Ravindra S. Rathodkar MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 18 Apr 2024
Final Order / Judgement

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 40/2021.                              तक्रार नोंदणी दिनांक : 01/02/2021.                                                                             तक्रार निर्णय दिनांक : 18/04/2024.

                                                                                       कालावधी : 03 वर्षे 02 महिने 17 दिवस

 

विजयकुमार पिता विठोबा खेडेकर,

व्यवसाय : शेती, रा. एकुर्गा, ता. जि. लातूर.                                               :-         तक्रारकर्ता

 

                        विरुध्द

 

(1) कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.,

     पॉवर हाऊस, साळे गल्ली, लातूर, ता. जि. लातूर.

(2) सहायक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.,

     उपविभाग मुरुड, ता. जि. लातूर.

(3) कनिष्ठ अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.,

     शाखा : बोपला, ता. जि. लातूर.                                                           :-         विरुध्द पक्ष

 

गणपूर्ती :          श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्‍यक्ष

                        श्रीमती रेखा जाधव, सदस्य

                        श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य

                                   

तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :-  महेश ए. शिंदे

विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :-  आर. बी. जानते

 

आदेश 

 

श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्‍यक्ष यांचे द्वारा :-

(1)       तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, मौजे एकुर्गा, ता. जि. लातूर शिवारामध्ये त्यांना गट क्र. 72 व 73 मध्ये क्षेत्र 1 हे. 05 आर. शेतजमीन आहे. त्यांनी विरुध्द पक्ष (यापुढे 'विद्युत वितरण कंपनी') यांच्याकडून विद्युत पंपाकरिता विद्युत जोडणी घेतलेली असून त्यांचा ग्राहक क्रमांक 610410346071 आहे. ते विद्युत वितरण कंपनीच्या विद्युत देयकांचा भरणा करीत असून त्यांच्याकडे थकबाकी नाही. त्यांच्या शेतजमीन क्षेत्रातून विद्युत वाहिनी गेलेली असून त्या AB Switch तारा आहेत.

(2)       तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, कुपनलिकेच्या पाण्यावर त्यांनी सन 2017-2018 मध्ये ऊस पिकाची लागवड केलेली होती आणि ते ऊस पीक विकास सहकारी साखर कारखाना लि., निवळी यांच्याकडे गाळपासाठी दिलेले होते.

(3)       तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, सन 2018-19 च्या हंगामामध्ये त्यांच्या ऊस पिकाची 22 ते 25 कांड्यापर्यंत वाढ झालेली होती. दि.21/12/2018 रोजी सकाळी 11.00 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शेतजमिनीतील विद्युत वितरण कंपनीचे 'ए' 'बी' स्वीच नादुरुस्त असल्यामुळे विद्युत वितरण कंपनीने अल्युमिनियम तारेने बायपास करुन (थेट तारेने जोडून) 'बी' फेजचा जम्पर निसटून 'ए' 'बी' स्वीच लोखंडी चॅनलला चिटकला आणि प्रचंड स्पार्कींग होऊन ठिणग्या पडून बांधावरील गवताने पेट घेतला. ती आग वाढून गट क्र. 72 व 73 मध्ये असणा-या ऊसाच्या पाचटाला आग लागून तक्रारकर्ता यांचे 1 हे. 05 आर ऊस पीक जळून खाक झाले. तसेच त्यांचा ठिबक संच, 5 पी.व्ही.सी. पाईप, 29 तुषार संच, 5 आंब्याचे व 2 नारळाचे झाडे आगीमध्ये जळाले आणि त्यांचे एकूण रु.4,50,000/- चे नुकसान झाले.

(4)       तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, घटनेबद्दल कळविल्यानंतर विद्युत वितरण कंपनीने, तहसील व पोलीस यंत्रणने पंचनामा केलेला आहे. तक्रारकर्ता यांनी घटनेपूर्वी अनेकवेळा विद्युत वितरण कंपनीस 'ए' 'बी' स्वीच दुरुस्त करण्याबद्दल लेखी व मौखिकरित्या कळविलेले होते; परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. विद्युत वितरण कंपनीचा निष्काळजीपणा व हलगर्जीपणामुळे घटना घडलेली आहे. नुकसान भरपाई देण्याबद्दल तक्रारकर्ता यांनी लेखी अर्ज व सूचनापत्र पाठविले असता विद्युत वितरण कंपनीने दखल घेतली नाही. उक्त विवेचनाअंती सेवा देण्यामध्ये त्रुटी केल्याचे नमूद करुन रु.4,50,000/- नुकसान भरपाई; आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.50,000/- व ग्राहक तक्रार खर्च रु.5,000/- देण्याकरिता विद्युत वितरण कंपनीस आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.

(5)       विद्युत वितरण कंपनीने लेखी निवेदनपत्र दाखल केले. त्यांचे कथन असे की, तक्रारकर्ता यांनी खोट्या व बनावट माहिती व कागदपत्रांच्या आधारे ग्राहक तक्रार दाखल केलेली असल्यामुळे रद्द करण्यात यावी. दि.21/12/2018 रोजी अपघात झालेला असून ग्राहक तक्रार दि.4/2/2021 रोजी दाखल केल्यामुळे मुदतबाह्य आहे. श्रध्दा टायर वर्क्स व वॉशिंग सेंटर, एकुर्गा यांचे मालक श्री. जालिंदर गणपती भालेकर यांच्या निष्काळजीपणामुळे अपघात झालेला असल्यामुळे त्यांना आवश्यक पक्षकार करणे गरजेचे आहे. तक्रारकर्ता हे दि.13/9/2013 पासून थकबाकीदार आहेत.

(6)       विद्युत वितरण कंपनीचे पुढे कथन असे की, पैसे कमविण्याच्या उद्देशाने ऊस पीक घेतलेले असल्यामुळे तक्रारकर्ता 'ग्राहक' संज्ञेत येत नाहीत. ऊस जळीत प्रकरणामध्ये केव्हाही संपूर्ण ऊस जळून खाक होत नाही. तक्रारकर्ता यांनी विद्युत देयकानुसार विद्युत ग्राहक क्र. 610410346071 करिता थकबाकी रक्कम भरणा केलेली नाही. तक्रारकर्ता यांनी अधिका-यांशी संगनमत करुन खोटे पंचनामे तयार केले आणि त्यावरुन विद्युत निरीक्षक, लातूर यांनी संगनमत करुन चुकीचा अहवाल दिला.

(7)       विद्युत वितरण कंपनीचे पुढे कथन असे की, दि.21/12/2018 रोजी 2.38 वाजता श्री. इंगळे नाना व श्री. राजु घुले यांनी दुरध्वनीवरुन एकुर्गा शिवारामध्ये वाहिनी तुटून 1-2 शेतक-यांचे ऊस पीक पेटल्याचे कळविल्यानंतर उपअभियंता, सब-डिव्हीजन, मुरुड यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी तक्रारकर्ता यांचे शेत हे एकुर्गा गावालगत असून दुपारी 2.20 वाजता गावामध्ये श्रध्दा टायर वर्क्स व वॉशिंग सेंटरचे मालक श्री. जालिंदर गणपती भालेकर हे ट्रॅक्टरमध्ये हवा भरता असताना टायरची डिस्क वर उडाली आणि दुकानाच्या वर असणा-या फेज व न्युट्रल तारा तुटल्या. त्या तारा तुटताना त्यांचा स्पर्श जवळच असलेल्या 11 के.व्ही. तारांना होऊन 33/11 के.व्ही. बोपला येथून निघणारे 11 के.व्ही. एकुर्गा फिडर दुपारी 2.20 वाजता ट्रीप झाले. गावामध्ये एल.टी. फॉल्ट होत असताना सदर 'ए' 'बी' स्वीचवर स्पार्कींग झाल्याचे प्रथमदर्शनी वाटते आणि श्रध्दा टायर वर्क्स व वॉशिंग सेंटरचे मालक जालिंदर गणपती भालेकर यांच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाला.

(8)       विद्युत वितरण कंपनीने पुढे कथन असे की, तथाकथित घटनेमध्ये तक्रारकर्ता यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही  आणि कारखान्याकडून ऊसाचे देयक रु.57,675/- तक्रारकर्ता यांना दिले आहे. तक्रारकर्ता यांनी सन 2018-2019 मध्ये विलास सहकारी साखर कारखाना लि., वैशाली नगर, निवळी येथे ऊस गाळपासाठी दिला आणि कारखान्याने जळीत कपात केलेली नाही.

(9)       विद्युत वितरण कंपनीने पुढे कथन असे की, त्यांचा 'ए' 'बी' स्वीच केव्हाही खराब नव्हता आणि तो दुरुस्त करण्याबद्दल तक्रारकर्ता यांनी लेखी किंवा मौखिकरित्या कळविलेले नव्हते. अंतिमत: ग्राहक तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती केलेली आहे.

(10)     तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विद्युत वितरण कंपनीचे लेखी निवेदनपत्र व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्‍यात येतात आणि त्‍या मुद्दयांची कारणमीमांसा त्‍यांच्‍यापुढे दिलेल्‍या उत्‍तराकरिता खालीलप्रमाणे देण्‍यात येते.

मुद्दे                                                                                                उत्तर

 

 

(1) तक्रारकर्ता हे विद्युत वितरण कंपनीचे 'ग्राहक' आहेत काय ?                                होय

(2) ग्राहक तक्रार मुदतबाह्य आहे काय ?                                                                    नाही

(3) विद्युत वितरण कंपनीने तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या

      सेवेमध्‍ये त्रुटी केल्‍याचे सिध्‍द होते काय ?                                                               नाही         

(4) मुद्दा क्र.1 च्‍या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय  ?                        नाही

(5) काय आदेश  ?                                                                                     अंतिम आदेशाप्रमाणे

 

 

 

कारणमीमांसा

(11)     मुद्दा क्र. 1 :- विद्युत वितरण कंपनीने घेतलेली प्राथमिक हरकत अशी की, तक्रारकर्ता यांनी पैसे कमविण्याच्या उद्देशाने ऊस पीक घेतल्यामुळे ते 'ग्राहक' संज्ञेत येत नाहीत. अभिलेखावर दाखल केलेल्या वीज आकार देयकाचे अवलोकन केले असता तक्रारकर्ता यांनी विद्युत वितरण कंपनीकडून ग्राहक क्र. 610410346080 द्वारे शेती प्रयोजनार्थ विद्युत जोडणी घेतल्याचे दिसते. हे सत्य आहे की, तक्रारकर्ता हे शेतजमिनीतील कुपनलिकेच्या विद्युत पंपाकरिता विद्युत जोडणीचा वापर करीत आहेत आणि विद्युत पंपाद्वारे पिकांना पाणी पुरवठा करण्यात येऊन पिकापासून उत्पन्न घेण्यात येते. असे दिसते की, तक्रारकर्ता हे शेतकरी आहेत आणि त्यांच्या अत्यल्प शेतजमिनीमध्ये ऊसाचे नगदी पीक घेऊन उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करतात. तक्रारकर्ता यांचा शेती व्यवसाय व शेतीजमिनीचे अत्यल्प क्षेत्र पाहता त्यांनी उपजीविका भागविण्यासाठी ऊस पीक घेतल्याचे मान्य करावे लागेल. त्यामुळे ऊस पिकास पाणी देण्यासाठी विद्युत पंपाकरिता घेतलेल्या विद्युत जोडणीमागे नफा मिळविण्याचा व्यापारी उद्देश असू शकतो, हे ग्राह्य धरता येत नाही. त्या अनुषंगाने विद्युत वितरण कंपनीची हरकत अमान्य करण्यात येते आणि तक्रारकर्ता त्यांचे 'ग्राहक' असल्याच्या निष्कर्षाप्रत येऊन मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.

(12)     मुद्दा क्र. 2 :- विद्युत वितरण कंपनीने पुढे अशी हरकत घेतली की, दि.21/12/2018 रोजी अपघात झालेला असून ग्राहक तक्रार दि.4/2/2021 रोजी दाखल केल्यामुळे मुदतबाह्य आहे. मा. राष्ट्रीय आयोगाच्या निर्देशानुसार कोरोणा रोगाच्या साथीमध्ये दि.15/3/2020 ते 28/2/2022 कालावधीमध्ये मुदत संपुष्टात येत असल्यास त्या कालावधीमध्ये सवलत दिलेली आहे. विद्युत वितरण कंपनीच्या कथनानुसार दि.20/12/2020 रोजी मुदत संपुष्टात येत असली तरी त्या कालावधीमध्ये मुदतीची सवलत असल्यामुळे तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार मुदतबाह्य ठरत नाही आणि मुद्दा क्र.2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.

(13)     मुद्दा क्र. 3 ते 5 :- मुद्दा क्र. 3 ते 5 परस्परपुरक असल्यामुळे त्यांचे विवेचन एकत्रपणे करण्यात येते. तक्रारकर्ता यांचे कथन असे की, दि.21/12/2018 रोजी सकाळी 11.00 वाजता त्यांच्या शेतजमिनीतील विद्युत वितरण कंपनीचे 'ए' 'बी' स्वीच नादुरुस्त असल्यामुळे विद्युत वितरण कंपनीने अल्युमिनियम तारेने बायपास करुन (थेट तारेने जोडून) 'बी' फेजचा जम्पर निसटून 'ए' 'बी' स्वीच लोखंडी चॅनलला चिटकला आणि प्रचंड स्पार्कींग होऊन ठिणग्या पडून त्यांचे ऊस पीक, फळ झाडे व अन्य शेती उपयुक्त साहित्य नष्ट होऊन आर्थिक नुकसान झाले. उलटपक्षी, विद्युत वितरण कंपनीच्या प्रतिवादानुसार शेतक-यांचे ऊस पीक पेटल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर उपअभियंता, सब-डिव्हीजन, मुरुड यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता एकुर्गा गावामध्ये श्रध्दा टायर वर्क्स व वॉशिंग सेंटरचे मालक श्री. जालिंदर गणपती भालेकर हे ट्रॅक्टरमध्ये हवा भरता असताना टायरची डिस्क वर उडाली आणि दुकानाच्या वर असणा-या फेज व न्युट्रल तारा तुटल्या. त्या तारा तुटताना त्यांचा स्पर्श जवळच असलेल्या 11 के.व्ही. तारांना होऊन 33/11 के.व्ही. बोपला येथून निघणारे 11 के.व्ही. एकुर्गा फिडर दुपारी 2.20 वाजता ट्रीप झाले. गावामध्ये एल. टी. फॉल्ट होत असताना सदर'ए' 'बी' स्वीचवर स्पार्कींग झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याचे नमूद केले आहे.

(14)     असे दिसते की, तहसील व पोलीस यंत्रणेद्वारे घटनेचा पंचनामा केलेला आहे. संलग्न प्रकरणामध्ये विद्युत निरीक्षक, विद्युत निरीक्षण विभाग, लातूर यांनी घटनेची चौकशी करुन अपघाताचा निष्कर्ष खालीलप्रमाणे नोंदविलेला आहे.

            अपघाताचा निष्कर्ष :- महावितरण कंपनी यांनी सादर केलेली अपघाताची सूचना व अहवाल, घटनास्थळ पंचनामा, अपघातस्थळाचे प्रत्यक्ष केलेले निरीक्षण व तपासणी, नोंदविलेले जबाब व चौकशी यावरुन खालीलप्रमाणे निष्कर्ष अभिप्राय आहे.

            "दिनांक 21/12/2018 रोजी मौजे एकुरर्गा, ता. जि. लातूर येथील श्री. हंसराज विश्वनाथ पाटील यांचे शेतातील वीज कंपनीचे ए.बी. स्वीच नादुरुस्त आहे. त्यास वीज कंपनीने ॲल्युमिनियम तारेने बायपास केले (थेट तारेने जोडले). त्यामधील बी फेजचा जम्पर निसटून ए.बी. स्वीच लोखंडी चॅनलला चिटकला व प्रचंड स्पार्कींग होऊन ठिणग्या प्रथम 1) श्री. हंसराज विश्वनाथ पाटील यांच्या शेतात असलेल्या ऊसात व ऊसाच्या पाचटावर पडल्या. त्यामुळे आग लागली व ती आग त्यालगत इतर ऊसाचे शेतकरी 2) प्रभावती श्रीकृष्ण पाटील 3) संभाजी नामदेव नागटिळक 4) नंदकुमार विठोबा खेडकर 5) विजयकुमार विठोबा खेडकर 6) सुभद्राबाई नामदेव नागटिळक 7) राजकुमार शेषेराव खेडकर 8) समाधान बाजीराव अडसूळ 9) शिवाजी किसन नागटिळक  10) अर्जून किसन नागटिळक 11) देविदास किसन नागटिळक यांच्या ऊसास आग लागली व यामध्ये गट नं. 72, 73, 74, 76 मधील एकूण अकरा शेतक-याचा ऊस व शेतातील साहित्य जळाले. यामध्ये केंद्रीय विद्युत प्राधिकरण विनियम, 2010 नियम क्र. 73, 18, 12, 46 चा भंग झाला. यास वीज कंपनी पूर्णपणे जबाबदार आहे. त्यामुळे संबंधीत वरील सर्व ऊस जळीत शेतक-यास महावितरणने नुकसान भरपाई देण्याची शिफारस करण्यात येते."

 

            तसेच विद्युत वितरण कंपनीतर्फे ऊस जळीत घटनेची चौकशी करण्यात आलेली आहे. परिशिष्ट 13 मधील कलम 21 मध्ये नोंदविलेला शेरा खालीलप्रमाणे आहे.

            "On dt 21/12/2018 at 14.20PM, In Shradha tyre works and washing centre premise of owner Shri Jalindhar Ganpati Bhalekar, during puncture repair work tractor tyre disc blown above accidentally and stuck with LT live lines due to which 1no phase and 1no neutral wire of LT line was found to be broken and at the same time 11kv live line B phase comes in contact with LT line on immediate next pole. Sugarcane is found burnt at far distance from line fault. After inspecting sugarcane burnt spot. It is found that 11kv line is at safe distance from ground level. AB switch is not in working condition. Line not broken and no sparking marks seen on conductors and insulators."

(15)     अभिलेखावर जालिंदर गणपतराव भालेकर यांचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले असून त्यांच्या निवेदनानुसार दि.21/12/2018 रोजी कसल्याही प्रकारची ट्रॅक्टरच्या टायरची डिक्स वर उडाल्याबद्दल घटना घडलेली नाही.          

(16)     उभय पक्षांचा वाद-प्रतिवाद पाहता व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता श्री. हंसराज विश्वनाथ पाटील यांचे शेतातील वीज कंपनीचे 'ए' 'बी' स्वीच नादुरुस्त होते आणि त्यास वीज कंपनीने ॲल्युमिनियम तारेने बायपास केल्याचे व त्यामधील 'बी' फेजचा जम्पर निसटून 'ए' 'बी' स्वीच लोखंडी चॅनलला चिटकून निर्माण झालेल्या ठिणग्यामुळे ऊस पिकाने पेट घेतला, हे मान्य करावे लागेल.

(17)     विद्युत तारेमधून ठिणग्या पडण्याची घटना श्री. हंसराज विश्वनाथ पाटील यांच्या शेतजमिनीमध्ये घडलेली आहे आणि श्री. हंसराज विश्वनाथ पाटील यांच्या ऊस पिकाने पेट घेतल्यानंतर त्याची आग अन्य शेतक-यांच्या ऊस पिकामध्ये म्हणजेच तक्रारकर्ता यांच्या ऊस पिकास लागल्याचे दिसून येते.

(18)     तक्रारकर्ता यांनी अभिलेखावर खालीलप्रमाणे न्यायनिर्णय दाखल केलेले आहेत.

            मा. राष्ट्रीय आयोग :- "शांताबाई संभाजी इंगळे /विरुध्द/ महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.", रिव्हीजन पिटीशन नं. 1048/2017, निर्णय दि. 13/10/2017.

            मा. राष्ट्रीय आयोग :- "कर्नाटक राज्य विद्युत मंडळ /विरुध्द/ निलकांता गौडा सिध्दगौडा पाटील", रिव्हीजन पिटीशन नं. 37/2002, निर्णय दि. 11/2/2002.

            मा. राष्ट्रीय आयोग :- "जगन्नाथ कृष्णाजी जमाले /विरुध्द/ महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.", रिव्हीजन पिटीशन नं. 3703/2014, निर्णय दि. 8/9/2017.

                मा. राष्ट्रीय आयोग :- "अंकुश /विरुध्द/ अधीक्षक अभियंता", रिव्हीजन पिटीशन नं. 2054/2015, निर्णय दि. 24/11/2015.

                मा. आंध्रप्रदेश राज्य आयोग :- "ए.पी. साऊथर्न पॉवर डिस्ट्रीब्युशन कंपनी लि. /विरुध्द/ जी. सुब्बारामा नायडू", प्रथम अपिल क्र. 119/2008, निर्णय दि. 20/1/2009.

            मा. चंदीगड राज्य आयोग :- "एच.व्ही.पी.एन. /विरुध्द/ भाग राम", अपिल क्र. 391/2006, निर्णय दि. 5/10/2006.

(19)     विद्युत वितरण कंपनीतर्फे ग्राहक तक्रार क्र. 192/2020 मध्ये दाखल केलेले न्यायनिर्णय अवलोकनार्थ घ्यावेत, असे निवेदन केले. त्यानुसार त्यांचे न्यायनिर्णय खालीलप्रमाणे आहेत.

            मा. महाराष्ट्र राज्य आयोग, औरंगाबाद परिक्रमा पीठ :- "महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. /विरुध्द/ राजाबाई हरिश्चंद्र शिंदगे", प्रथम अपिल क्र. 277/2012, निर्णय दि. 13/1/2015.

            मा. महाराष्ट्र राज्य आयोग :- "महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. /विरुध्द/ बाबुलाल कुबेरचंद गांधी", प्रथम अपिल क्र. 227/2007, निर्णय दि. 10/3/2010.

(20)     तक्रारकर्ता यांनी दाखल केलेल्या मा. राष्ट्रीय आयोगाचा "शांताबाई संभाजी इंगळे /विरुध्द/ महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि." न्यायनिर्णय वगळता अन्य न्यायनिर्णयामध्ये विद्युत वाहिनीच्या तारांमधून निर्माण झालेल्या ठिणग्यांमुळे पिकाच्या नुकसानीस विद्युत कंपनी / मंडळास जबाबदार धरलेले आहे. उलटपक्षी, विद्युत वितरण कंपनीने दाखल केलेल्या न्यायनिर्णयामध्ये व मा. राष्ट्रीय आयोगाच्या "शांताबाई संभाजी इंगळे /विरुध्द/ महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि." मध्ये तक्रारकर्ता 'ग्राहक' नसल्याचे अधोरेखीत केले आहे.

(21)     प्रस्तुत प्रकरणामध्ये तक्रारकर्ता हे विद्युत वितरण कंपनीकडून त्यांच्या शेतजमिनीमध्ये असणा-या कुपनलिकेच्या विद्युत पंपाकरिता विद्युत पुरवठा घेत असले आणि त्या विद्युत जोडणीकरिता ते विद्युत वितरण कंपनीचे "ग्राहक" असले तरी घडलेल्या ऊस जळीत घटनेच्या अनुषंगाने विद्युत वितरण कंपनीचे कृत्य सेवेतील त्रुटी ठरेल काय ? हा मुद्दा विचारार्थ येतो.

(22)     असे दिसते की, श्री. हंसराज विश्वनाथ पाटील यांच्या शेतामध्ये असणारे विद्युत वितरण कंपनीचे 'ए' 'बी' स्वीच नादुरुस्त होते आणि त्यास वीज कंपनीने ॲल्युमिनियम तारेने बायपास केल्याचे व त्यामधील बी फेजचा जम्पर निसटून 'ए' 'बी' स्वीच लोखंडी चॅनलला चिटकून निर्माण झालेल्या ठिणग्यामुळे ऊस पिकाने पेट घेतलेला आहे. निर्विवादपणे, श्री. हंसराज विश्वनाथ पाटील यांच्या शेतजमिनीमध्ये असणा-या ऊसाची आग पसरत जाऊन तक्रारकर्ता यांचे ऊस पेटलेले आहे. हे स्वंयस्पष्‍ट आहे की, तक्रारकर्ता यांच्या शेतजमिनीमध्ये असणा-या विद्युत वाहिनीमध्ये दोष निर्माण होऊन किंवा तेथे ठिणग्या पडलेल्या नाहीत. आमच्या मते, ज्यावेळी निष्काळजीपणा किंवा सेवा त्रुटीचा मुद्दा उपस्थित होतो, त्यावेळी तो निष्काळजीपणा किंवा सेवेतील त्रुटी ही संबंधीत घेतलेल्या सेवेस किंवा सेवेच्या कृतीस थेटरित्या जोडले जाणे आवश्यक ठरते.  तक्रारकर्ता यांनी ज्या विद्युत पुरवठ्याच्या अनुषंगाने 'ग्राहक' नात्याने ग्राहक तक्रार दाखल केली, त्या विद्युत पुरवठ्याच्या अनुषंगाने कथित घटना घडलेली नाही. असे दिसते की, अन्यत्र घडलेल्या घटनेची आग पसरत येऊन तक्रारकर्ता यांचे ऊस पीक जळाल्यामुळे त्या घटनेचा तक्रारकर्ता यांच्या विद्युत जोडणीशी प्रत्यक्ष व थेट संबंध स्थापित होत नाही. तक्रारकर्ता यांना देण्यात आलेल्या विद्युत जोडणीमध्ये दोष असल्यामुळे किंवा तक्रारकर्ता यांच्या शेतजमिनीमध्ये असणा-या विद्युत तारांमध्ये घर्षण होऊन ऊस पीक जळालेले नाही. त्या अनुषंगाने विद्युत वितरण कंपनीने तक्रारकर्ता यांच्या विद्युत जोडणीच्या अनुषंगाने सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होत नाही.

(23)     उक्त विवेचनाअंती विद्युत वितरण कंपनीने तक्रारकर्ता यांना दिलेल्या विद्युत जोडणीच्या अनुषंगाने त्रुटी केल्याचे सिध्द होत नसल्यामुळे तक्रारकर्ता हे अनुतोषास पात्र ठरत नाहीत. त्यामुळे मुद्दा क्र. 3 व 4 चे उत्तर नकारार्थी देऊन मुद्दा क्र.5 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.

 

 

आदेश

 

                            (1) ग्राहक तक्रार नामंजूर करण्‍यात येते.        

                            (2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.

 

 

(श्री. रविंद्र शे. राठोडकर)             (श्रीमती रेखा  जाधव)                 (श्री. अमोल बा. गिराम)

             सदस्‍य                                         सदस्‍य                                            अध्यक्ष

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)

-०-

 
 
[HON'BLE MR. Amol B. Giram]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Rekha R. Jadhav]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. Ravindra S. Rathodkar]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.