निकालपत्र
निकाल दिनांक – १७/०३/२०२१
(द्वारा मा.सदस्यः श्री.महेश निळकंठ ढाके)
__________________________________________________________
१. तक्रारदाराने तक्रार ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ अन्वये दाखल केली आहे.
२. तक्रारदाराने तक्रारीत असे कथन केले आहे की, तक्रारदार हे मौजे उक्कडगांव ता. श्रीरामपूर जि.अहमदनगर येथील रहिवासी आहेत. तक्रारदर यांना ट्रक खरेदी करावयाचे होते. त्यासाठी ते सामनेवाले क्रमांक २ शुभम मोटार्स यांचेकडे गले. त्यानंतर त्यांनी दिनांक १५-०२-२०१२ रोजी रक्कम रूपये १०,९४,४८७/- बिल Shubmo.1112-01500 हा सामनेवाले क्रमांक १ टाटा मोटार्स कंपनीचे वाहन खरेदी केले. तक्रारदाराने त्यासाठी सामनेवाले क्रमांक ३ यांचेकडून कर्ज प्रकरण केले. या प्रकारे तक्रारदार हे सामनेवाले क्रमांक १ ते ३ यांचे ग्राहक आहेत. तक्रारदाराने वाहन खरेदी केले, त्यावेळी सामनेवाले क्रमांक २ यांनी वाहनाची क्वॉलीटी, त्याचे मायलेज चांगले असल्याबाबत सागितले. सदरहू वानहाचे मॉडले नं. LPT1109HEX2 त्याचा रजि.नं. MH17AG4149 असा होता. सदहू वाहनासाठी तक्रारदाराने सामनेवाले क्रमांक ३ यांचेकडे कर्ज प्रकरण केले होते. त्यासाठी त्याचा मासिक हप्ता रूपये ३०,०००/- असा होता.
३. तक्रारदार यांनी वाहन खरेदी केल्यानंतर कमीतकमी २० दिवसांनी दिनांक ०७-०३-२०१२ रोजी ट्रक मधून आवाज येत होता. त्यामुळे सामनेवाले क्रमांक २ यांना तक्रारदाराने कळविले. त्यानुसार सामनेवाले क्रमांक २ यांनी रिपेरींग करून तक्रारदाराच्या ताब्यात ते वाहन दिले. परंतु काही दिवसानंतर सदरहू वाहनामध्ये इंजीनचा आवाज, ब्रेक डाऊन, वॉश पंप व अॅव्हरेज कमी असे अनेक दोष निर्माण झाले. त्यामुळे तक्रारदाराने पुन्हा सदरहु वाहन सामनेवाले क्रमांक २ यांचे शोरूमकडे रिपेरींगसाठी दिले. सामनेवाले क्रमांक २ यांनी ७-८ दिवस त्यांचेकडे वाहन ठेवले व दुरूस्त करून ते तक्रारदाराला परत दिले. परंतु पुन्हा त्यामध्ये दोष निर्माण झाले. अशा प्रकारे वारंवार वाहनामध्ये दोष निर्माण होत होते. सामनेवाले क्रमांक २ यांचे इंजीनीअर यांनी सदरहू वाहनाची तपासणी केली व त्यामध्ये दोष आहेत असे सांगितले. वाहन सर्व्हीसींगला दिल्यानंतर त्यामधील दोष सामनेवाले क्रमांक २ यांनी दुरूस्त करून दिले. परंतु वाहनामध्ये दोष उत्पन्न होत होते. त्यामुळे तक्रारदाराला मानसिक त्रास झाला व इतर खर्च करावा लागला. तक्रारदाराने सामनेवाले क्रमांक १ व २ यांना सदरहु वाहन बदलून दुस-या वाहनाची मागणी केली. परंतु सामनेवाले क्रमंक १ व २ यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला व तक्रारदाराची मागणी पुर्ण केली नाही. वाहनाची दुरूस्ती चालू असतांना सामनवाले क्रमांक ३ यांचे हप्ते तक्रारदाराने भरले. परंतु त्यानंतर तक्रारदाराचे काही हप्ते थकले. त्यामुळे सामनेवाले क्रमांक ३ यांनी तक्रारदाराला कोणतीही पूर्व सूचना न देता त्यांचे वाहन ताब्यात घेतले. तक्रारदाराने सामनेवाले क्रमांक ३ यांना अनेकदा विनंती केली व कळविले की, सदरहु वाहन हे डीफेक्टीव असल्यामुळे तक्रारदाराला त्याचा उपभोग घेता येत नाही. त्यामुळे तक्रारदार हे मासिक हप्ता भरू शकलेले नाही. पुढे हप्ता भरण्याची तयारी दर्शविली मात्र समानेवाले क्रमांक ३ यांनी सदरहु वानह ताब्यात घेतेले. त्यामुळे तक्रारदाराने आयोगात तक्रार दाखल करून परिच्छेद १५ प्रमाणे मागणी केली आहे.
४. सदर तक्रारीत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अहमदनगर यांनी ग्राहक तक्रार क्रमांक ३७०/१० मध्ये दिनांक ०२-०२-२०१८ रोजी अंतीम आदेश पारीत करून तक्रार अंशतः मंजुर करण्यात आली होती. सामनेवाले यांनी वर नमुद आदशाचेविरूध्द मा. महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई, परिक्रमा खंडपीठ औरंगाबाद यांचेकडे अपील दाखल केले होते. सदर अपील क्रमांक १३६/२०१८ प्रथम अपील मध्ये मा. महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई, परिक्रमा खंडपीठ औरंगाबाद यांनी अपील मंजुर करून सदरील तक्रारीतील आदेश रद्द केला. सदर तक्रारी संबधी कायदा, वस्तुस्थिती व परिस्थितीनुसार गुणवत्ता ठरविणेबाबत व तक्रारीत न्याय करणेसाठी मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अहमदनगर यांचेकडे प्रकरण परत पाठविले. उभयपक्षकार यांना दिनांक २७-०२-२०२० रोजी मे. जिल्हा तक्रार निवारण आयोग अहमदनगर यांचेसमोर हजर राहण्याचा आदेश दिला.
मा. महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई, परिक्रमा खंडपीठ औरंगाबाद यांनी प्रथम अपील क्रमांक १३६/२०१८ मध्ये पारीत केलेल्या आदेशाअन्वये सदरील तक्रार पुन्हा अहमदनगर जिल्हा आयोगसमोर सुनावणीकरीता घेण्यात आली. त्यानुसार दिनांक २७-०२-२०२० रोजी सामनेवाले क्र.३ हे मे. आयोगासमोर हजर झाले व त्यांनी लेखी युक्तिवाद दाखल केला. निशाणी ५२ वर सामनेवालेचा लेखी युक्तिवाद दाखल आहे. निशाणी ५३ वर तक्रारदाराने लेखी युक्तिवाद दाखल केला. तक्रारदार व सामनेवाले यांचे वकिलांचा युक्तिवाद ऐकण्यात आला.
५. तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, त्यांनी दाखल केलेले दस्तऐवज, सामनेवालेचे पुराव्याचे शपथपत्र, त्यांनी दाखल केलेले दस्तऐवज यांचे अवलोकन करता न्याय निर्णयासाठी पुढील मुद्दे कारणमिमंसेसह सादर करण्यात येत आहे.
अ.नं. | मुद्दे | निष्कर्ष |
(१) | तक्रारदार हे सामनेवालेचे ग्राहक आहे आहेत काय ? | होय |
(२) | सामनेवाले क्रमांक १ व २ यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? | नाही |
(३) | सामनेवाले क्रमांक ३ यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? | होय |
(४) | तक्रारदार हे सामनेवाले क्रमांक ३ कडुन तक्रारीत नमुद केलेली मागणी मिळणेस पात्र आहे काय | होय |
(५) | आदेश काय | अंतिम आदेशा प्रमाणे |
कारणमिमांसा
६. मुद्दा क्र. (१) – तक्रारदार यांनी सामनेवाले क्रमांक १ यांनी उत्पादीत केलेले ट्रॅक्टर सामनेवाले क्रमांक २ यांचेकडुन खरेदी केले व सदरील वाहनासाठी तक्रारदार यांनी सामनेवाले क्रमांक ३ यांचेकडुन कर्ज प्रकरण केले होते. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाले क्रमांक १ ते ३ यांचे ग्राहक आहेत, ही बाब सिध्द होते. म्हणुन मुद्दा क्रमांक १ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
७. मुद्दा क्र. (२) – तक्रारदाराने त्यांचे तक्रारीमध्ये असे कथन केले आहे की, सदर वाहनामध्ये उत्पादकीय दोष होता. त्यामुळे सदरचे वाहन हे खरेदी केल्यानंतर लगेच त्यामध्ये दोष उत्पन्न. परंतू वाहनामध्ये उत्पादकीय दोष होता ही बाब स्पष्ट करण्यासाठी तक्रारदाराने तज्ञ अहवाल प्रकरणात दाखल करणे आवश्यक होते. प्रकरणात सदरहू वाहनामध्ये उत्पादकीय दोष होता याबाबतची कोणतीही कागदपत्रे व पुरावा तक्रारदार यांनी दाखल केलेली नाहीत. यामुळे वाहनामध्ये उत्पादकीय दोष होता किंवा नाही, ही बाब आयोगासमोर स्पष्ट झाली नाही. सामनेवाला क्रमांक १ यांना या प्रकरणात जबाबदार धरता येणार नाही, असे आयोगाचे मत आहे.
तक्रारदार यांनी सामनेवाला क्रमांक १ या कंपनीचा सामनेवाला क्रमांक २ यांचेकडून दिनांक १५-०२-२०१२ रोजी रूपये १०,९४,४८७/- ला ट्रक खरेदी केला. सदरहू ट्रक खरेदी केल्याबाबतचे बिल प्रकरणात दाखल आहे. सदरहु वाहनाला रजि.नं.MH17AG4149 असा देणेत आलेला होता. सदर वाहन खरेदी करण्यासाठी तक्रारदाराने सामनेवाला नं.३ यांचेकडून कर्ज प्रकरण केले होते. त्याचा मासिक हप्ता रक्कम रूपये ३०,०००/- असा होता. दिनांक ०७-०३-२०१२ रोजी म्हणजे वाहन खरेदी केल्यानंतर किमान २० दिवसातच सदरहू वाहनाचे इंजीन मधून आवाज येऊ लागला. म्हणुन तक्रारदाराने सामनेवाला क्रमांक २ शोरूमकडे याबाबत तक्रार केली. सामनेवाला क्रमांक २ शोरूम यांनी सदरहू वाहनामधील दोष दुर करून तक्रारदाराला सदरचे वाहन ताब्यात दिले. परंतू यानंतर पुन्हा सदरहू वाहनामध्ये इंजीनचा आवाज, ब्रेक डाऊन, वॉश पंप, लो अॅव्हरेज अशा अनेक तक्रारी निर्माण झाल्या. त्यामुळे तक्रारदाराने सदरहू वाहन पुन्हा सामनेवाला क्रमांक २ यांचेकडे दुरूस्तीसाठी दिले. सामनेवाला क्रमांक २ यांचे इंजीनीअर यांनी सदरहू वाहन दुरूस्त करून पुन्हा तक्रारदाराचे ताब्यात दिले. परंतू त्या नंतरही सदरहू वाहनामधील दोष हे निर्माण होत राहिले . याबाबी सामनेवाला क्रमांक २ यांना मान्य आहेत. तसेच सामनेवाला क्रमांक २ यांनी त्यांचे लेखी कैफीयतीमध्ये वाहनामध्ये दोष उत्पन्न झाल्यानंतर तक्रारदाराने सदरहू वाहन सामनेवाला क्रमांक २ यांचेकडे देऊन त्यातील दोष सामनेवाला क्रमांक २ यांनी दुरूस्त करून तक्रारदाराला वेळोवेळी दिलेले आहेत, असे नमुद नमुद केलेले आहे. सामनेवाले क्रमांक २ यांनी दाखल केलेले निशाणी ३२ सोबत सर्व्हीसींगची दिनांक १२-०४-२०१२ ते १०-०९-२०१२ पर्यंतची कागदपत्रे दाखल केलेली आहेत. यावरून ही बाब स्पष्ट होते की, वाहनामध्ये दोष निर्माण झाले व सामनेवाला क्रमांक २ यांनी सदरहु दोष वेळोवेळी काढुन दिले आहेत. त्यामुळे सामनेवाले क्रमांक २ त्यांचे सेवेत कोणतीही त्रुटी केली नाही, या निष्कर्षाप्रत हा आयोग येत आहे. सामनेवाले क्रमांक २ यांना या प्रकरणात जबाबदार धरता येणार नाही. सबब मुद्दा क्रमांक २ चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे. सबब मुद्दा क्रमांक २ लक्षात घेता सदरची तक्रार सामनेवाले क्रमांक १ व २ यांचेविरूध्द खारीज करण्यात येत आहे.
८. मुद्दा क्र. (३ व ४) – सदर तक्रारीत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अहमदनगर यांनी ग्राहक तक्रार क्रमांक ३७०/१० मध्ये दिनांक ०२-०२-२०१८ रोजी अंतीम आदेश पारीत करून तक्रार अंशतः मंजुर करण्यात आली होती. सामनेवाले यांनी वर नमुद आदशाचेविरूध्द मा. महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई, परिक्रमा खंडपीठ औरंगाबाद यांचेकडे अपील दाखल केले होते. सदर अपील क्रमांक १३६/२०१८ प्रथम अपील मध्ये मा. महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई, परिक्रमा खंडपीठ औरंगाबाद यांनी अपील मंजुर करून सदरील तक्रारीतील आदेश रद्द केला. सदर तक्रारी संबधी कायदा, वस्तुस्थिती व परिस्थितीनुसार गुणवत्ता ठरविणेबाबत व तक्रारीत न्याय करणेसाठी मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अहमदनगर यांचेकडे प्रकरण परत पाठविले. त्यानुसार सदर प्रकरणामध्ये सुनावणी घेण्यात आली.
तक्रारदार यांनी सामनेवाले क्रमांक १ यांनी उत्पादीत केलेले ट्रॅक्टर सामनेवाले क्रमांक २ यांचेकडुन खरेदी केले व सदरील वाहनासाठी तक्रारदार यांनी सामनेवाले क्रमांक ३ यांचेकडुन कर्ज प्रकरण केले होते. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाले क्रमांक १ ते ३ यांचे ग्राहक आहेत, ही बाब सिध्द होते.
सदरील मुळ तक्रारीत निशाणी ३४ ला तक्रारदाराने तक्रारीत नमुद वाहन हे सामनेवाले क्रमांक ३ ने ताब्यात घेतले होते, असे नमुद केले आहे. सदरील वाहन हे तारण असुन तक्रारीत नमुद वाहन हे तक्रारदाराला न कळविता बळजबरीने घेतले आहे आणि सदरील वाहन हे सामनेवाले क्रमांक ३ हे परस्पर विकण्याचे तयारीत आहे आणि वाहन विकल्यास तक्रारदाराचे कधी न भरून निघणारे नुकसान होईल यासाठी तक्रारदाराला त्याचे वाहन परत मिळावे यासाठी अर्ज दाखल केला होता. सदरील अर्जावर म्हणणे दाखल करणेसाठी सामनेवाले क्रमांक ३ यांनी मुदत मागीतली होती परंतु सामनेवाले क्रमांक ३ यांनी त्यांचे म्हणणे प्रकरणात दाखल केलेले नाही. त्यामुळे दिनांक २२-०१-२०१५ रोजी सदरील वाहन क्रमांक एम.एच.१७-ए.जी.-४१४९ हे तक्रारदाराला १५ दिवसांचे आत देण्याचा आदेश सामनेवाले क्रमांक ३ यांना मे. आयोगातर्फे करण्यात आला आहे. तरीसुध्दा सामनेवाले क्रमांक ३ यांनी पालन केले नाही व सदरचे वाहन ताब्यात ठेवले व सामनेवालेने सदरील वाहन ताब्यात दिले नाही. त्याच प्रमाणे सामनेवाले क्रमांक ३ यांनी आर्बीट्रेटर अवॉर्ड या प्रकरणात दाखल केला आहे. परंतु सदरील अवॉर्डचे अवलोकन केले असता सदरील अवॉर्ड संदर्भात कोणतीही नोटीस तक्रारदाराला दिलेली नाही, असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. त्या संदर्भात सामनेवाले क्रमांक ३ यांनी तक्रारदाराला लवाद प्रकरणाची नोटीस मिळाली याबाबत कोणताही दस्त या प्रकरणात सामनेवाले क्रमांक ३ यांनी दाखल केलेले नाही. सदरहु लवाद प्रकरण हे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अहमदनगर यांचेकडे प्रकरण झाले असतांना सामनेवाले क्रमांक ३ यांनी दाखल केलेले आहे असे सामनेवाले क्रमांक ३ यांनी दाखल केलेल्या आर्बीट्रेशन अवॉर्डमध्ये नमुद परिच्छेद एक मधील नमूद १६ मे २०१३ या तारखेवरून दिसुन येते. यात दिनांक १६-०३-२०१३ रोजी सामनेवाले क्रमांक ३ यांनी लवाद दाखल केल्याबाबत लवाद अधिकारी यांनी म्हटले आहे. म्हणजेच सदर प्रकरण या अहमदनगर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांचेकडे सुनावणीसाठी असतांना सामनेवाले क्रमांक ३ यांनी लवाद प्रकरण दाखल केलेले आहे व त्याचा निकाल झालेला आहे, असे स्पष्ट होते.
सामनेवाले क्रमांक ३ यांनी वाहन ताब्यात घेतले. सदरहु वाहन सामनेवाले क्रमांक ३ यांचेच ताब्यात आहे, ही बाब कागदपत्रावरून स्पष्ट होते. वरील विवेचनावरून सामनेवाले क्रमांक ३ यांनी तक्रारदाराप्रती अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असुन तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे, या निष्कर्षाप्रत आयोग येत आहे. यास्तव मुद्दा क्रमांक ३ व ४ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे. तसेच तक्रारदाराने भरलेले कर्जापोटीचे मासिक हप्ते रक्कम रूपये ४,११,८०५/- व डाऊन पेमेंट रूपये १,०५,५३४/- अशी एकुण रक्कम रूपये ५,१७,४३९/- ही सामनेवाले क्रमांक ३ यांचेकडे जमा आहे. त्यामुळे तक्रारदार हे त्यांनी सामनेवाले क्रमांक ३ यांचेकडुन वाहनाचे हप्त्यापोटी भरलेली रक्कम रूपये ५,१७,४३९/- व त्यावर तक्रार दाखल तारखेपासुन संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे. ९ टक्के दराने व्याज मिळण्यास तक्रारदार पात्र आहे. सबब मुद्दा क्रमांक ३ व ४ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
९. मुद्दा क्र. (५) : मुद्दा क्र.१ ते ४ चे विवेचनावरून आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्रमांक ३ यांचेविरूध्द मंजुर करण्यात येत आहे. २. सामनेवाले क्रमांक ३ यांना असा आदेश देण्यात येतो की, त्यांनी वादात नमुद असेलेले त्यांचे कडील वाहन नं.MH17AG4149 या निकालाचे आदेशापासून ३० दिवसाचे आत तक्रारदार यांना सुस्थितीत परत द्यावे. मुदतीत वाहन परत न दिल्यास तक्रारदाराने सामनेवाला क्रमांक ३ यांचेकडे वाहनाचे हप्त्यापोटी भरलेली रक्कम रूपये ५,१७,४३९/- (रूपये पाच लाख सतरा हजार चारशे एकोणचाळीस फक्त) त्यावर द.सा.द.शे. ९ टक्के दराने व्याज तक्रार दाखल तारखेपासून ते रक्कम फिटेपावेतो तक्रारदार यांना द्यावेत. ३. सामनेवाले क्रमांक ३ यांनी तक्रारदार यांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी रूपये १०,००० (रूपये दहा हजार फक्त) व या तक्रारीचे खर्चापोटी रूपये ५,०००/- (रूपये पाच हजार फक्त) अदा करावेत. ४. सामनेवाला क्रमांक १ व २ यांचेविरूध्द प्रस्तुत तक्रार खारीज करण्यात येत आहे. ५. या आदेशाची प्रत उभय पक्षकारांना मोफत देण्यात यावी. |